रविवार, २८ डिसेंबर, २०१४

Software

माझ्या एका इंजीनीअर मित्राला म्हटलं,
तू एवढे program लिहितोस,
computer ला कमांड वगैरे देऊन मनासारखे software बनवतोस,
चिंधी गोष्टींसाठीही आहेत तुमच्याकडे software
मग वेळेलाच मागं नेता येईल असं काही करता येईल का?
Ctrl  Z करून पहिल्यासारखं करता येईल का?
एखादी घटना थांबवता येईल का?
to be specific, पृथ्वीची चक्रे मागे फिरवून थांबवता येईल का त्या निरागस मुलांच्या मृत्यूला?
किंवा मानवी मेंदूतील या हिंसेलाच उखडून काढता येईल का मुळासकट ?
Please  बनवच तू एखादा program जो run करताच सगळीकडे नांदू लागेल शांतता
ज्या program ने आम्ही एकमेकांना ओळखू लागू फक्त माणूस म्हणून
हिंदू - मुसलमान, काळे गोरे, वरची जात खालची जात असे नसतील भेद
रक्त फक्त रक्त असेल RBC, WBC, plasma यांनी बनलेलं
असा program जो मुल जन्माला आल्याबरोबर लगेच install करायला पाहिजे त्याच्या मेंदूत
हळूहळू update करत त्यात रुजवली पाहिजेत शाश्वत मुल्ये
सगळ्या चांगल्या ग्रंथांतून तयार केलं पाहिजे मूल्यांचं universal package
जे सतत धीर देत राहील आणि bugs fix करत राहील जगताना अनुभवायला येणारे
जे  replace करेल द्वेषाला प्रेमाने
बनवच असे software, पण एक काळजी घे याचं manual राजकारण्यांच्या हाती लागू देऊ नकोस !

शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

आठवणींचा कोलाज : दिवाळी

लहानपणी दिवाळी म्हटलं की, दिवाळीची सुट्टी आठवते. शाळा बंद पण अभ्यास चालू. बहुतेक सहामाही परीक्षा संपलेली असायची, शेवटचा पेपर लिहिल्यानंतर जरा कुठे मोकळा श्वास घेतोय तोच 'दिवाळीच्या सुट्टीतील अभ्यास' गळ्यात पडायचा. रोज वर्गातील फळा सजवायची जबाबदारी सरांनी वाटून दिलेली असायची. फळ्यावर दिनांक, वार आणि आजचा सुविचार लिहायचा आणि ते पण पहिल्या तासाच्या आधी. हे सर्व हजेरीपटावरच्या नंबरनुसार. ज्याचा आज नंबर असेल त्याला सुविचार काय लिहू असा प्रश्न पडायचा. बहुतेक सुविचार लिहून झालेले असायचे त्यामुळे नवीन सुविचार बनवले जायचे उदा. 'गुलाबावरून गेली रिक्षा, जवळ आली सहामाही परीक्षा'. (वि. स. खांडेकरांनी एके ठिकाणी म्हटलंय, 'बालपणी परीक्षा, तरुणपणी प्रेम आणि म्हातारपणात मृत्यू ह्या अन्न गोड लागू न देणाऱ्या गोष्टी होत' एकदम खरंय).
सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर लिहिल्यानंतर 'दिवाळीच्या सुट्टीतील अभ्यास' लिहून घ्यावा लागायचा. बारा विषयांचा भरमसाठ अभ्यास. मुलांनी ही सुट्टी आनंदात घालवूच नये याचसाठी ही उपाययोजना असावी. ही अभ्यासाची वही सजवण्यासाठी आम्ही आमची सारी कल्पकता पणाला लावायचो, म्हणजे त्यात दिवाळीच्या फराळाने सजलेल्या ताटाचे चित्रच काढ, कुठे जगविचित्र कंदील काढ, शेजारच्या ताईकडून रांगोळीचं चित्र काढून घे, वहीला चांगलं कव्हर घाल असं. सगळा अभ्यास सुरुवातीच्या दोन दिवसात पूर्ण करून नंतर उंडारायचे ही strategy असायची. बाकीचे लोक सुट्टी संपायच्या दोन दिवस आधी अभ्यासाला लागायचे आणि अशा आणीबाणीच्या वेळी हुशार मुलांच्या वह्यांना जाम मागणी असायची.

***


दिवाळीचा किल्ला बनवायला मुंबईत जागा नाही, पण गावी किल्ला बनवायला मजा येई. आधी जमीन साफ करून घ्यायची, विटा, भुसभुशीत माती जमा करून ठेवायची. मग विटांनी, बारीक दगडांनी किल्ल्याला आकार द्यायचा. पर्वतासारखा आकार आला पाहिजे. विटांच्या मधली पोकळी चिखलाच्या गिलाव्याने भरून काढायची. शिवाजी महाराजांसाठी सिंहासन बनवायचं. किल्ल्यावर गहू पेरायचा,आणि कोंबड्यापासून गव्हांकुरांना वाचवायचं सुद्धा. शिवाजी महाराज, मावळे यांच्या छोट्या मूर्त्या तालुक्याच्या बाजारातून आजी आणायची. पोळ्याच्या सणाला आणलेली मातीची बैलजोडी किल्ल्यावर चरायला लावून द्यायची. नागपंचमीला केलेला मातीचा नाग पायथ्याला ठेवायचा. शेजारच्या मित्रांनी बनवलेल्या किल्याच्या पायथ्याशी खेळण्यातील छोटा ट्रक पण असायचा. शिवरायांच्या काळात ट्रक नव्हते याचे तेव्हा सोयर सूतक नव्हते. आणि तेही योग्यच. कॉमन सेन्स वापरून आज नवीन काही बनवताना धापा लागतात.
किल्ल्याचे  बांधकाम पूर्ण होईपर्यंत आळीपाळीने सुरक्षारक्षकांची फौज निगराणीसाठी असे. घरातून माऊलीने जेवणासाठी हाका मारल्या तरी अशा वेळी मावळे जागचे हलत नसत. किल्याला लाईटिंग करण्यासाठी कॉलेजला जाणाऱ्या दादाची मदत घेतली जायची. त्याने मग भाव खायचा. मग तो घरातून अंगणात एक्शटेन्शन टाकून लाईटिंग करून द्यायचा. आपल्याला हवी तशी लाईटिंग झाल्यावर कधी एकदा रात्र होतेय आणि आपण किल्ला उजळून टाकतोय असे व्हायचे.
संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावल्यावर किल्ल्याची रोषणाई सुरु करायची. महाराजांची मूर्ती फोकसमधे आली पाहिजे. मावळे पण चमकले पाहिजेत, अशी मांडणी चेहऱ्यावर जे आमच्या चेहऱ्यावर जे तेज येई ते काय विचारता !
दिवाळीच्या दिवसांत मग आल्या-गेलेल्या पाहुण्यांना आमचा किल्ला पाहण्यावाचून आणि आमच्या वास्तुकलेचे कौतुक करण्यावाचून गत्यंतर नसे. गाईडची भूमिका कोण करणार यावर भांडणे होत, त्यावेळेला आम्ही पाहुणे वाटून घेऊ.

***

दिवाळीच्या पहिल्या अंघोळीच्या दिवशी सगळं जग पहाटे लवकर उठतं तेव्हा मी डाराडूर झोपलेलो असतो. भल्या सकाळी चारला उठून, उटणं लावून अंघोळ करणं माझ्या तब्येतीला कधीच मानवलं नाही. सगळेजण फटाके वगैरे फोडून इतरांच्या झोपा मोडतात. काय ती पहाटेची साखरझोप. अहाहा !! माझी ही सवय मोडण्याचा प्रयत्न करून सगळे फसले.
लहानपणी तुमचा इलाज नसतो, ऐकावं लागतं. आता मोठेपणी वाद घालता येतो. हे असंच का? ते तसंच का?
लोक आजकाल इतक्या पहाटे दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला जातात तेही अंघोळ वगैरे करून, कुर्ता घालून (specifically कुर्ता घालून), मला त्याचं कायम नवल वाटत आलंय. मला दिवाळी पहाटचा कार्यक्रम म्हटला कि तो सादर करणारे कलाकार किती वाजता उठत असतील बिचारे, किती लांबून येत असतील, बहुतेक पहिली ट्रेन पकडत असतील, आणि कुणाचा गजर वाजलाच नाही तर आणि उठायला उशीर झाला तर ? असले हजार प्रश्न.
मी उठेपर्यंत सगळ्यांच्या अंघोळी उरकलेल्या असतात. फराळाच्या दोन चार प्लेटी रिचवलेल्या असतात. उटण्याने अंघोळ केल्यावर चिरोटे फोडायचे आणि ते पण एका दणक्यात डाव्या टाचेखाली. आपण साक्षात नरकासुराच्या मानेवर पाय देत आहोत असा अविर्भाव करायचा.
फराळ करताना इतरांच्या चेहऱ्याकडे पाहावं. आपली झोप पूर्ण झालेली असते पण इतरांच्या जांभया चालू असतात तेव्हा जो आसुरी आनंद होतो (नरकासुरी म्हणूया) काय वर्णावा.

***

दिवाळीचा फराळ हा स्त्रियांच्या चर्चेचा खास विषय. खाण्याचा कमी आणि टीका करण्याचा जास्त. कुणाची करंजी आतून पोकळच कशी होती, सारण नीट भाजलंच नव्हतं, कुणाचे अनारसे आतून कच्चेच कसे राहिले, कुणात तेल किती जास्त अशी समीक्षा सगळीकडे आढळून येते. एखादीच्या चकल्या तेलात विरघळल्या असतील तर पुढच्या दिवाळीला कशा चकल्या करायच्या यावर दहा बारा वेगवेगळी उत्तरे येतात, कुणी म्हणतं पिठात तेलाचं मोहन फार कडक नसावं तर कुणी म्हणतं कडक असावं. ती सुगरण बिचारी ऐकत बसते.
चाळीतल्या बायका फराळ बनवायला एकमेकांच्या घरी मदतीला जातात. इमारतींच्या बंद घरांत राहणारी माणसे शेजारच्या घरातील खिडकीतून तुपाचा वास येतोय म्हणजे शंकरपाळ्या चालल्यात हे ओळखतील, पण "काय मोरेकाकू कुठवर आलाय फराळ? आज शंकरपाळ्या करताय वाटतं. नंतर वेळ मिळाला तर आमच्याकडे या, तुमच्या हातचे रव्याचे लाडू अविला फार आवडतात हो, करूया थोडे. कसं ?" हे विचारणार नाहीत.  करंजी (ज्याला कानावलं असे पण म्हणतात) बनवायला वेळ लागतो म्हणून चाळीत बायका आपापलं पोळपाट लाटणं घेऊन एकमेकींच्या घरी जात. सर्व करंज्या बनवून झाल्यावर प्रत्येकीला दोन करंज्या मिळत. शेवटच्या राहिलेल्या सारणातून चंद्र-सुर्य बनवले जायचे. त्यावर मात्र माझे  लक्ष असे.  कधी कधी फराळाच्या मदतीला आईच्या मैत्रिणी घरी यायच्या, त्यांच्यासोबत त्यांच्या मुली. आणि त्या कर्मधर्मसंयोगाने माझ्याच वर्गातल्या निघायच्या.  आईला मदत करतोस की नाही या त्यांच्या प्रश्नावर "कसली मदत करतोय तो. उलट काम वाढवून ठेवलंय बघ, मघाशी सांगितलं की सारणात पिठीसाखर घाल अर्धा किलो, तर मैदा घातला." मी बराच वेळ काय रिएक्शन द्यावी या विचारात.

***
शाळेत असताना एका मैत्रिणीच्या घरी फराळाला गेलो होतो . म्हणजे तिनेच बोलावलं होतं म्हणून. चहाचा ट्रे आणि फराळाची प्लेट आली. घरी करंज्या चहात बुडवून खायची सवय. इथे कशी खायची. मैत्रीण प्लेट हातात देऊन आत स्वयंपाकघरात गेलेली. आम्ही एक करंजी उचलली आणि बुडवली चहात, आणि खाण्यासाठी परत उचलतोय वर तर पारलेच्या बिस्किटाप्रमाणे मोडून पडली चहात. आता ? घरी असतो तर बिनदिक्कत अंगठा आणि  तर्जनी चहात घालून बाहेर काढली असती करंजी. आणि हे काही आपले घर नाही. माझी कैफियत तिने जाणली आणि चमचा आणून दिला. आपल्याला एवढी साधी गोष्ट सुचू नये याचं आजही आश्चर्य वाटतं.

***

 एका मित्राला घरी फराळाला बोलावलं होतं. त्याला म्हटलं बेसनाचे लाडू मस्त झालेत खाऊन बघ. तो म्हणाला, "नको रे".
"अरे घाबरू नकोस, खरंच छान झालाय सगळा फराळ" मी.
त्यावर तो "तसं काही नाही रे, पण बेसनाचा लाडू सोडून सगळं खातो."
"का पण?" मी.
 "एका दिवाळीला आई गेली, मग तिच्या आठवणीसाठी बेसनाचा लाडू खायचं सोडलं. आई होती म्हणून दिवाळी होती रे. मला अजून आठवतंय ती लाडवासाठी बेसन भाजायची तेव्हा अभ्यासातून मन उडायचं. लाडू वळल्यानंतर परातीत काढून ठेवल्यावर माझ्या स्वयंपाकघराच्या वाऱ्या सुरु व्हायच्या. तिला बरोबर कळायचं. मग तीच म्हणायची "बघ जरा चाखून, साखर व्यवस्थित आहे का?". साखर व्यवस्थित आहे का ते एक लाडू खाऊन कसं कळणार, दोन तीन व्हायचे".
मित्राच्या डोळ्यांत पाणी तरळलं. आठवणी अशाच छोट्या छोट्या गोष्टींशी  निगडीत असतात. सण निमित्तमात्र असतात नात्यांना उजाळा देण्यासाठी.

 ***

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०१४

"आमानधमकी"ची गोष्ट

चिऊ त्यादिवशी घरी आली होती. ( चिऊचं पाळण्यातलं नाव 'अर्पिता' आहे, पण तिला सगळे चिऊच म्हणतात. आता तर अशी  परिस्थिती आहे कि चिऊ हे आपलं खरं नाव आहे असे तिला वाटतेय, तिने तिच्या ज्यु. केजीतल्या बाईंना तिचं पूर्ण नाव चिऊ उत्तम पाटील असे सांगितल्यावर त्याही जरा संभ्रमात पडल्या होत्या) ती घरी येणार कळताच अक्षरक्ष: दंगलीची परिस्थिती असल्यासारखी आवराआवर सुरु होते. तिच्या हाताला लागेल अशी महत्वाची वस्तू जवळपास नाही ना याची खात्री केली जाते, तिची नवचित्रकला माझ्या संग्रहातील  पुस्तकांच्या पानांवर दिसेल. ज्याला सर्व जण रेघोट्या म्हणतो अशा abstract चित्रकलेचं प्रात्यक्षिक तिने माझ्याकडच्या  पुस्तकांवर केलंय. बर्याच वस्तूंनी शेवटचा श्वास सोडलाय. तर मुद्दा असा चिऊ घरातून जाईपर्यंत आम्ही घाबरेघोबरे असतो. त्या दिवशी आई तिला रागाने उद्देशून म्हणाली,"तिला आमानधमकी पाहिजे आता".
आईच्या तोंडून तो शब्द ऐकताच आत्याची आठवण झाली एकदम. खरं म्हणजे ती माझ्या वडिलांची आत्या, पण आम्ही नातवंडेपण तिला आत्याच म्हणायचो. "आमानधमकी हा तिचाच शब्द." ती फार गोष्टीवेल्हाळ होती. कमरेत पोक काढून चालायची. तिला पहिल्यांदा पाहिल्यावर लहान मूल घाबरून रडलंच पाहिजे, पण नंतर त्याचे तिच्याशिवाय अजिबात चालायचे नाही.  लहान मुलाला तेल लावून अंघोळ घालण्यापासून रात्री झोपवेर्यंत त्या मुलांच्या आयांना आत्या हवीच असे. तिला स्वतःला मूल नव्हतं, पण त्याची कसूर तिने आम्हाला वाढवून पूर्ण केली.
रात्री सगळ्यांची जेवणे उरकली, अंथरुणं पडली कि सगळा लहान मुलांचा गोतावळा आत्याच्या अंथरुणाशेजारी जमायचा. घरात एकूण तीन म्हातार्या होत्या, पण आत्यासारखी popularity त्यांना नव्हती. वयोमानाने येणारी अस्वस्थता,बैचेनी तिच्यात दिसायची नाही. "आत्या गोष्ट सांग ना" चा गजर व्हायचा. घरातल्या इतर बायका मुलांना आत्याकडे पिटाळून झोपून जायच्या. कंदिलाच्या पिवळ्या उजेडात बालफौज आत्याजवळ जमायची.
त्या बालफौजेत दोन ते दहा वयोगटातले सगळे असायचे, त्यात रांगणारे, नुकतेच चालायला शिकलेले (ज्यांच्या पायात पैजण असायचे, व त्याच्या आवाजावरून त्यांच्या detective आया त्यांना शोधून काढायच्या.) असे श्रोते असायचे. आत्या कुठली गोष्ट सांगू असे विचारायची, मग आम्ही एकसुरात म्हणायचो, "आमानधमकीची". जसे तमाशाला सुरुवातीला नमन असतं, तसंच इथे सुरुवातीला "आमानधमकी"ची गोष्ट असलीच पाहिजे असा आमचा आग्रह असायचा.
मग गोष्ट सुरु व्हायची. "एक होता राजा, तो एकदा जंगलात शिकारीला गेला."
तिच्या प्रत्येक पूर्ण वाक्याला "हुं" करून साद दिलीच पाहिजे असा अलिखित नियम होता.
"दिवसभर भटकला तो, पण शिकार काही सापडेना. कंटाळला बिचारा, अशात रात्र झाली. करावं काय आता. राजवाडा कोसो दूर. जवळ प्रधानजी नाही. कुठे राहायचं, काय खायचं, कुठली झोपडी दिसेना आसपास?"
"रात्र अशी किर्र, प्राण्यांचे आवाज येताहेत"
अशा वेळी खिडकीतून दिसणारी बाहेरची झाडे विचित्र हालचाल तरी करत किंवा विचित्र आकार तरी निर्माण करत.आणि मग पुरते घाबरून  आम्ही तिकडे न पाहता आत्याच्या गोष्टीकडेच ध्यान केंद्रित करीत असू. पण आपण जे पाहिलंय ते दुसर्याला इशार्याने दाखवून त्यालापण घाबरवत असू.
"तेवढ्यात राजाला एका झाडाच्या टोकावर एक छानशी जागा दिसली कि तिथे तो लपून राहू शकेल, तो झाडावर चढून जाऊन बसला, चढताना त्याने एक भला मोठ्ठा दगड सोबत घेतला.  थोड्यावेळाने काय झालं, एक मोठं अस्वल आलं आणि नेमकं त्या झाडाखाली बसलं. आता काय करावं, झाडावरून उतरू तर शकत नाही, उतरलं तर अस्वल खाऊन टाकणार"
आमच्यापैकी कुणीही अस्वल पाहिलं नव्हतं तेव्हा. त्यामुळे त्याचं चित्र मनावर पक्कं नव्हतं, त्याला काळे घनदाट केस असतात आणि ते उंच असतं या वर्णनामुळे कुणीही अशा टाइपचा इसम दिसल्यास आम्ही घाबरून जात असू.
"राजाने मग नेम साधला आणि जवळचा मोठ्ठा दगड त्याच्या पाठीत घातला. आणि जोराने म्हणाला "कशी पडली आमानधमकी?" बिचारं अस्वल जीवाच्या आकांताने पळत सुटलं. राजा मग सकाळ होताच घरी परतला."
ही गोष्ट सांगून होईपर्यंत अर्धेअधिक श्रोते झोपेच्या अधीन झालेले असत. कुणी आत्याच्या मांडीवर, कुणी तिला बिलगून झोपी गेलेले असायचे. मग अशा बहाद्दरांना हलकेच उचलून बाजूला ठेवण्यात येई. आणि मग  आमच्यासारख्या चिवट श्रोत्यांसाठी दुसरी गोष्ट सुरु होई, त्यात कधी गरीब शेतकरी आणि त्याची शहाणी मुलगी असे. शेतकर्याला अचानक  मोठा धनलाभ होतो. राजाला हे कळतं, राजापासून वाचण्यासाठी मग ती सोन्याच्या मोहरा शेणाच्या गोवर्यात लपवून ठेवते. अशा अनेक गोष्टी.
तिच्या काही गोष्टी तर दोन तीन दिवस चालायच्या. कुठलातरी राजा परदेशभ्रमंतीसाठी निघायचा आणि रस्त्यांत त्याला अनेक संकटे यायची. तिने सांगितलेल्या गोष्टींपैकी फार थोड्या आता आठवताहेत, पण आमानधमकीची गोष्ट मनात पक्की आहे,  मूल जरा जास्त दंगा करत असेल तर कुणी वडीलधार्याने म्हटलं कि "आमानधमकी हवीय का ?" तर ते सुमडीत गप्प बसायचं. शाळेतून आल्यावर न बोलता कुणी अभ्यासाला बसलं कि "शाळेत आज आमानधमकी पडलेली दिसतेय!" असा टोला असायचा.
***
कॉम्पुटरवर गेम खेळणाऱ्या घरातील नव्या पिढीला भेटण्याचा योग आला.आता कुटुंब विखुरलेले. त्यामुळे सततचा संपर्क नाही.  ही नविन पिढी आमच्यापेक्षा फार सतर्क. रात्री जेवणानंतर मी सर्वांना गोष्ट सांगणार असे आधीच जाहीर केल्यामुळे बिछान्याजवळ गर्दी. मुलांना 'आमानधमकी'ची गोष्ट सांगूया म्हणून सुरुवात केली "एक असतो राजा. . . "
तर त्यावर "असा राजा बिजा नसतो काही" अशी प्रतिक्रिया.
मुलांचे हिरोही बदललेले.
"काका तुला गर्लफ्रेंड आहे का रे?" वय वर्ष साडेपाच असलेल्या माझ्या पुतण्याचा प्रश्न.
"तू Asphalt 8 खेळणार का?"
आता त्यांना आवडणार्या गोष्टींविषयी बोलत गेलो. हळू हळू गोष्टीतल्या राजाची जागा Hugh Jackman ने घेतली. त्याने एका alien ला कशी आमानधमकी दिली इथपर्यंत आल्यावर मी सुटकेचा श्वास घेतला.
त्यांना "आमानधमकी" शब्द व ती गोष्ट लक्षात राहील की नाही कुणास ठावूक? निघताना मात्र,आम्हाला कुणीच गोष्ट सांगत नाही तेव्हा तू थांब बरेच दिवस असा आग्रह झाला. मुलांना रात्री झोपताना गोष्ट सांगायला त्यांच्या आई वडिलांना वेळ नाही. त्यांचे आई वडीलही एका  जगावेगळ्या आनंदाला मुकताहेत हे नक्की.

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

असंबद्ध

"तू कविता करतोस ?"
"लिहायचो पण खूप आधी, कॉलेजला होतो तेव्हा !"
"मला वाचायला आवडतील तुझ्या कविता, काही हरकत नसेल तर . . ."
". . . ती एक मोठी दर्दभरी कहाणी आहे.. माझ्या कवितांची वही २६ जुलैच्या पावसात वाहून गेली.  ( हुश्श !!)
"अरेरे !"
"त्यानंतर कविता लिहावीशी वाटली नाही, पण आता वाटतेय."

***

 "वुडहाउसला मानलं पाहिजे यार, काय लिहितो !"
 "छे काहीतरीच. त्याच्या आजूबाजूला काय चाललंय याची त्याने साधी दखल घेतली नाही कधी , फक्त जुनं लंडन शहर रंगवत गेला. "
"पण, लोकांना हसवणं सोपं काम नाही."
"मान्य. पण साहित्यात जीवनाचं प्रतिबिंब पडलं पाहिजे."
"कुठल्या मुर्खाने सांगितलं की साहित्यात जीवनाचं प्रतिबिंब पडलं पाहिजे? आणि ऐक. . वुडहाउस ग्रेट आहे. वाद संपला. आजूबाजूला काय चाललंय याची त्याने दखल घेतली नाही म्हणून तो ९३ वर्षं जगला."



***

"काय शोधतोयस त्या सुभाषितांच्या पुस्तकात?"
"एक छानसं वाक्य, One liner जे मी स्टेटस म्हणून टाकू शकेल. "
"कसं वाक्य पाहिजे तुला ?"
"एकदम catchy, भरपूर likes मिळतील असे, आवडलं पाहिजे सगळ्यांना."
"घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलायस असं लिही, तुझ्या सगळ्या पुरुषमित्रांना आवडेल ते, कुणी एक शूर वीर म्हणून. "

***
"एकदा का नातं स्वीकारलं कि, त्या माणसाचा पण पूर्णपणे स्वीकार केला पाहिजे. . त्याच्या गुणदोषांसकट.  आपल्या निर्णयाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे . नातं लोणच्यासारखं असतं, मुरायला वेळ द्यावा लागतो. "
"आणि नातं जपताना दमछाक, मनस्ताप  होत असेल तर?"
"तर. . . ते नातं जपण्याइतकं गरजेचं आहे का याचा पुन्हा विचार करावा. उगाच मनात कुढत राहू नये "
" छान सल्ले देतोस. वपुंच्या कथांतून ढापतोस वाटतं अशी वाक्ये.  काही म्हणा ते लोणच्याचं बोललास ते आवडलं बाकी आपल्याला !!"

***

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०१४

रोजच्या जगण्यापल्याडचं जग

"ऐक ना नव, खूप मस्त अनुभव असतात रे या भटकंतीचे ! आम्ही सध्या खेड्यापाड्यातल्या शाळांत जातोहोत, जिथे पोचायला धड रस्ता नाहीये, तालुक्याच्या ठिकाणापासून अगदी आतमधे असणार्या या शाळा. तिथल्या मुलांपर्यंत विचार पोचवतो आहोत. या भेटींत नवी जागा पाहायला मिळते, माणसे भेटतात. . मुलं तर मुलंच. कुठलीपण. आपलं बालपण आठवायला लावणारी. दंगामस्ती करणारी.
त्यांच्याशी गप्पा मारताना एक वेगळाच दृष्टीकोन मिळतो. मी माझ्या सत्राची सुरुवात खेळीमेळीने करतो, त्यांना त्यांच्या भाषेतच बोलतं करतो. हळू हळू मुलं त्यात गुंतत जातात. तेव्हा त्यांच्या चेहर्यावरचं समाधान पाहून मजा येते यार. आपण बोललेलं कुणीतरी लक्ष देऊन ऐकतंय हे कळलं, की आपल्याला पण बोलण्याचा हुरूप येतो. या गप्पांत मुलं जे प्रश्न विचारतात ते तू ऐकलेस ना तर तुला पण आश्चर्य वाटेल. एका सातवीतल्या मुलीने मला विचारलं "सर, हे मन नेमकं असतं कुठे?" मी तर क्लीन बोल्ड. आपण मारे मनाच्या स्वास्थाविषयी बोलायचं, मनाच्या श्लोकाचा दाखला द्यायचा भाषणात, पण मन कुठे असतं, शोधलं का कधी?
ती मुलं सात आठ किलोमीटर चालत येतात शाळेत आजूबाजूच्या गावांतून. संध्याकाळी साडे पाच वाजले कि यांचा घोळका काट्याकुट्यातून वाट काढत दिवेलागणीपर्यंत घरी पोचायला निघतो. पहिल्यांदा original सूर्यास्त आणि सूर्योदय  पाहिला या दौर्यात आणि कातरवेळ कशी असते तेही अनुभवलं रे मित्रा. मस्तच.
आपण फार मोठे वक्ते आहोत या माझा गर्व मोडला या भटकंतीत. आपण शब्दांच्या फुलोर्यांनी भले महाराष्ट्रातल्या अनेक वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या असतील पण नि:शब्द करायला लावणारे प्रेम आणि आपुलकी काय असते, इथे कळलं. रात्री निवांत घोंगडी पांघरून मोकळ्या आभाळात तारे पाहण्यात अजब मजा आहे.
शाळेत माझं व्याखान संपलं कि, मी मुलांकडे उगाच गुरुदक्षिणा मागतो, मस्करीत. त्यांनी मला काही द्यावं ही अपेक्षा नाही पण त्यांची reaction पाहण्यासारखी असते. सधन तालुक्याच्या शाळांतली मुले सहज तयार होतात, "देऊ की, काय हवंय सांगा सर?" म्हणतात. परवा एका शाळेतली मुलं मात्र वेगळी होती. आई-वडील मजुरीवर जाणारे. त्यांच्याकडे गुरुदक्षिणा मागताच त्यांचा चेहरा सपशेल पडला. अगदी शांतता. आता सरांना काय द्यायचं असा विचार त्यांच्या मनात आला असेल. मी पण हे समजून लगेच विषय बदलला.
शाळेच्या मुख्याध्यापकांच्या छोट्याशा खोलीत गुळाने गुळमाट ठाण केलेला चहा कसाबसा संपवायच्या बेतात असताना आणि सरकारी निधी कसा मिळत नाही यावर हो हो करत असताना एक शिक्षक आत आले आणि मला म्हणाले. "सर, एका मुलीला तुम्हाला भेटायचंय". मी म्हटलं, "पाठवा कि तिला आत". एक धीट मुलगी आत आली. शिक्षक म्हणाले,"सर ही नववी 'अ' मधे आहे, तिला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायचीय." तिने आपल्या मुठीत दुमडलेली दहाची नोट मला देऊ केली. मला काय बोलू कळेनाच. अरे या मुलांसाठी दहा रुपये म्हणजे फार मोठी रक्कम. सगळ्या हौसमौजा पैशापाशीच येउन थांबतात. लिनेनचा आठशेचा शर्ट सहज विकत घेतो आपण दर महिन्याला, येथे वर्षाला दोन युनिफोर्म वापरायचे शाळेसाठी. इस्त्री हा प्रकार नाही. basic गरजाच भागवायला इतके कष्ट घ्यावे लागतात.  अशा वेळी एक चिमुरडी मला गुरुदक्षिणा म्हणून दहा रुपये देतेय, जे की तिने किती दिवस जपले असतील काहीतरी घेण्यासाठी. मला तिला दुखवायचं नव्हतं पैसे नाकारून. मी ते घेतले आणि तिला एक पुस्तक भेट दिलं.
मी ती दहाची नोट जपून ठेवलीय. धाड्कन मी जमिनीवर येतो ती नोट पाहून. degree चा आणि शहाणपणाचा संबंध नाही हे कळलंय."
***


"ऐक ना नव Counselling करताना ज्याम धमाल येते यार."
 ही जी मुलं आहेत ना, कसली हलकट आहेत. पण तितकीच गोड. त्यांच्याशी बोलणं सुरुवातीला कठीण गेलं. पण नंतरच्या sessions ला जेव्हा काही games घेतले तेव्हा त्यांची कळी खुलली. तुला तर idea आलीच असेल त्यांना गेल्यावेळी भेटलास तेव्हा. एकदम व्यक्त होत नाहीत रे  कुणाशीही. आपलं माणूस कुणी नाही म्हणून किंवा आई वडील नसल्याचं दु:ख असेल. त्यांची पार्श्भूमी संस्थेच्या register मधे आहे. पण मला ती मुलं त्यांच्या भूतकाळाला कशी पाहतात हे पहायचं होतं, मनात काही शल्य आहे का?, न्यूनगंड आहे का?, तिरस्कार आहे का? हे जोखायचं होतं. मग मी आताच्या session ला प्रत्येकाला एक चित्र काढायला सांगितलं. रंग दिले, कागद दिला. चित्रात एक निळी नदी काढायचीय, आणि ही नदी म्हणजे तुमचं आयुष्य आहे असं सांगितलं.  आता या सरळ प्रवाही नदीला कुठे वळण लागलं, कुठे खूप मोठा  बदल घडवणारा प्रसंग घडला ते काढायचं.  आणि ते त्या वळणाच्या बाजूला थोडक्यात लिहायचं. साल आठवत असेल तर ते पण लिहा. काही चांगलं घडलं असेल, ते पण लिहा. वळणावळणाची नदी.निळीशार. खडूने काढलेली रखरखीत.
मुलं गुंतली चित्र काढण्यात. आता चित्र काढून झाल्यावर एकेकाला बोलावलं आणि चित्र explain करायला लावलं.

एकाने सुरुवातीलाच नदीच्या उगमाजवळच लिहिलेलं "आई जन्म देतानाच मेली"
पुढचं वळण दोन वर्षांनी "बाबा मेले".
पुढचं वळण आठ  वर्षांनी "काका काकूंच्या त्रासाला कंटाळलो आणि मुंबईला आलो"
मग आता संस्थेत.

एकाने काढलेलं पहिलं वळण - "आईला बाबांनी मारलं"
मला वाटलं domestic violence असेल, पण नाही रे.  इथे खून केला होता, तोही चिमुरड्या मुलासमोर. भयानक.
मग "बाबा तुरुंगात"
मग मोठं वळण "बाबांचा मृत्यू".  बाबांविषयी तिरस्कार नाही. त्यांनी दारूच्या नशेत आईला मारलं, तसे ते चांगले होते असा म्हणाला. वाढदिवसाला सायकल आणली होती ही चांगली गोष्ट.
आई जेवण चांगलं बनवायची. संस्थेतल्या जेवणाला तिच्या हातची चव नाही.
संस्थेत येउन चांगल्या विद्यार्थ्याचा पुरस्कार मिळणं हे आताचं आयुष्याला मिळालेलं मोठं वळण.

एका दंगेखोर मुलाने नदीत मासे काढले होते, बोट काढली होती. आजूबाजूला निसर्ग म्हणता येईल अशा गोष्टी पण काढल्या होत्या. इथे नदी सरळ होती. एकही वळण नाही. कसं शक्य आहे. त्याला बोलावलं. तेव्हा त्याचा डायलॉग  "दीदी, अपुन कि जिंदगी एक खुली किताब है, ऐसे एक painting मे नही आयेगी" एक नंबर चाप्टर. बघतेच त्याला नंतरच्या session ला.
काही जण गुन्हेगारी background चे. अनाथ म्हणून गुंडांच्या तावडीत सहज सापडलेले.  आपण चोरी करायचो हे accept केलं काहींनी. बहुतेकांच्या नदीला संस्थेत मोठं वळण मिळालं होतं.

त्यांच्याशी बोलून कळलं की जगणं सोपं नाहीये. तू एक शेर सांगितलेलास सुरेश भटांचा "मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते".

आपल्या सरळसोप्या आयुष्याला इतकी वळणं परवडणार नाहीत. साध्या साध्या गोष्टीनी खचणारे आपण.
या मुलांनी हे कसं पचवलं असेल? कल्पना नाही करवत.
एक मात्र नक्कीय, या मुलांनी जगण्याचा धीर दिलाय मला."
 ***

सोमवार, १५ सप्टेंबर, २०१४

बसरातील ग्रंथपाल (The Librarian Of Basra)

२००३ सालापासून सुरु असलेल्या इराक युद्धाच्या कहाण्या वाचनात आल्या. त्यात 'The Librarian Of Basra' हे जेनीट विंटर यांनी लिहिलेलं छोटेखानी पुस्तक वाचनात आलं. लहान मुलांसाठी लिहिलेलं पुस्तक. इराक मधील बसरा या शहरात तेथील ग्रंथालयाच्या ग्रंथपाल असलेल्या आलिया मुहम्मद बेकर यांनी युद्धकाळात तीस हजार पुस्तकांचं ग्रंथालय कसं वाचवलं याची ही कथा. युद्धकाळात ब्रिटिश आणि अमेरिकी फौजा जेव्हा इराक वर आक्रमण करणार अशी चर्चा सुरु झाली तेव्हा पुस्तकांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या बेकर यांनी ग्रंथालय स्थलांतरित करण्याची मागणी तेथील गवर्नर यांना केली, अपेक्षेप्रमाणे त्यांनी ती धुडकावून लावली. सरकारचं सहकार्य नाही, सद्दाम हुसेनविषयी जनमनात प्रचंड असंतोष. सर्वत्र लुटीचं वातावरण. अशात पुस्तके वाचवण्याची पर्वा कुणाला? ग्रंथालयात काही प्राचीन हस्तलिखिते,इतिहास, तत्वज्ञान यावरची मोल्यवान पुस्तके, त्यातील एक तर मुहम्मद पैगंबरचं तेराव्या  शतकातील चरित्र. हवाई बॉम्बहल्ल्यात ग्रंथालय नष्ट होण्यापूर्वी बेकर यांनी रोज थोडी थोडी पुस्तके गाडीतून घरी न्यायला सुरुवात केली. शेजाऱ्यांकडे मदत मागितली. शेजारी असलेल्या रेस्टारंटच्या मालकाला विनंती करून तिथे काही पुस्तके हलवली.
हळू हळू ग्रंथालयात फौजांनी बस्तान मांडलं. आकाशात अमेरिकी सैन्याची विमाने घिरट्या मारू लागले. अशा वेळी सर्व पुस्तके एका ट्रक मधे लादून त्यांनी स्वतच्या घरी हलवली. घरी सर्वत्र पुस्तकेच पुस्तके. युद्ध सुरु झालं आणि काही दिवसातच ग्रंथालयाची इमारत बेचिराख झाली. बेकर युद्ध संपेपर्यंत वाट पाहत राहिल्या.पुस्तकांची घरी काळजी घेत राहिल्या.
                                          

आता युद्ध संपल्यावर पुन्हा नव्याने ग्रंथालयाची इमारत बांधली गेलीय आणि पुन्हा बेकर ग्रंथपाल म्हणून रुजू झाल्यात.
त्यांच्या ग्रंथालयात रोज शहरातील विद्वजन,कलाकारांची हजेरी असते. त्या म्हणतात पवित्र कुराणात अल्लाने मुहम्मदला पहिली आज्ञा जर कुठली केली असेल तर ती म्हणजे "वाच". ग्रंथालये लिखित, मौखिक स्वरूपातील ज्ञान, त्या त्या भूभागाचा इतिहास, पुढील अनेक पिढ्यांसाठी जतन करतानाच हे सर्व त्यांच्यापर्यंत कसे पोहचेल याचीही काळजी करतात. एखाद्या समाजाची बौद्धिक जडणघडण करण्यात ग्रंथालयाचा महत्वाचा वाटा असतो. चांगला ग्रंथपाल ग्रंथालयाला लाभणे हे ही तितकेच महत्वाचे असते. ९ ते ५ कार्यालयीन वेळेच्या पल्याड वाचकांपर्यंत पोचणारा, पुस्तकांची भेट घडवून देणारा ग्रंथपाल जरी कुबेराच्या संपत्तीचा रखवालदार असला तरी ही संपत्ती लुटण्यासाठीच आहे असं मानणारा पाहिजे.

रविवार, २४ ऑगस्ट, २०१४

वाचायची राहून गेलेली पुस्तके

घरात पाऊल टाकलं की टेबलावर असलेला पुस्तकांचा ढीग नजरेस येतो. कितीक दिवसांपासून ती अशीच पडली आहेत. त्यातील बरीचशी अर्धी वाचून ठेऊन दिलेली, काही संदर्भासाठी कपाटातून काढलेली, काहींचं पहिलं पानही न उघडलेलं. वीस - तीस असावीत. आईची सतत भुणभुण की पसारा आवर. पसारा आवरायला घेतला कि मी हटकून एखाद्या पुस्तकाच्या पुन्हा प्रेमात पडणार, एखादा paragraph वाचता वाचता एक तास त्यात जाणार. पुलंनी लिहिलेला 'निळाई' लेख, फक्त एकदा नजरेखालून घालतो म्हणून वाचायला लागलो तर थेट वेनिसला जाऊन पोहोचलो. आईने तासाभराने आठवण करून दिली तेव्हा कुठे भानावर आलो.
आम्हा पुस्तकवेड्यांना स्थळ, काळ याचं भान राहतच नाही. फोर्टच्या रस्त्यांवर पुस्तके विकणाऱ्या माणसांना आम्ही परग्रहावरचे वाटत असू. त्याने प्रदर्शनाला ठेवलेल्या पुस्तकांच्या एकदम तळाशी असलेलं एखादं पुस्तक आम्ही मागणार, त्याचा ब्लर्ब वाचणार, मुखपृष्ठ कौतुकाने पाहणार, किती जुनी आवृत्ती आहे हे बारकाईने पाहणार, मधली पाने व्यवस्थित आहेत ना, पानांचा वास घेऊन अंदाजपंचे किती जुनं आहे याचे मनोमन गणित करणार, कुणी बरं लिहिलं होतं / सुचवलं होतं या पुस्तकाबद्दल ? हे आठवत बसणार, तोपर्यंत उभ्याने दोन पायांच्या कवायती करून झालेल्या असतात, अर्धा एक तास पुस्तक आपण न्हाहाळत असतो. विक्रेता साड्यांच्या दुकानातील सेल्समनसारखा डोक्यावर बर्फ ठेवून विचारतो, 'लेने का है क्या?' मग आपण किंमत विचारणार, त्याने सांगितलेली किंमत अर्थातच आपल्याला पटलेली नसते. मग त्यावर घासाघीस. कुठल्याही परिस्थितीत पुस्तक हातून जाऊ द्यायचं नसतं आपल्याला. शेवटी तडजोड होते. चांगल्या पुस्तकाची किंमत नाही करता येत असा विचार करून आपण समाधान करून घेतो. नवीन पुस्तक प्रवासात वाचत घरी येतो, पुढचे दोन तीन दिवस अर्धं वाचून होतं मग कामाच्या व्यापात अर्धं तसंच राहून जातं. अशी अर्धी वाचून झालेली पुस्तके कपाटातून आपल्याकडे रागाने पाहत आहेत असे वाटते. 

एखादं पुस्तक इतकं खिळवून ठेवणारं असतं की एक - दोन दिवसातच वाचून पूर्ण होतं. फोरसिथ, ग्रिशमच्या कादंबऱ्या अशापैकीच. रात्र रात्र जागून कादंबऱ्या संपवण्याची नशा वेगळीच असते. गोनिदा, पेंडसे, यांच्या कादंबऱ्या रात्री जागून वाचलेल्या, 'पडघवली' वाचून संपवली तेव्हा पहाट होत होती आणि बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि योगायोगाने कादंबरीच्या शेवटीही तशाच पावसाचे वर्णन आहे.
पुलंच 'अपूर्वाई' मला पूर्ण वाचायचंय, पण कधीचा मुहूर्त येईल ठाऊक नाही, गेल्या चार वर्षात मी ते चारदा विकत घेतलंय. कधी मित्रांनी ढापलं, कधी कुणाला वाचायला दिलं त्यांनी परतच केलं नाही.
काही पुस्तके गेल्या काही वर्षांपासून माझ्या रीडिंग लिस्ट वर आहेत. एका कुंद पावसाळी संध्याकाळी वाचण्यासाठी मी Eliot च्या कविता ठेवल्यात, गावी आमराईत बसून निवांत दुपारी वाचता येईल म्हणून फास्टर फेणे, फेलूदा घेऊन ठेवलेत. अधेमधे त्यातल्या काही साहसकथा वाचतो पण अथ पासून इति पर्यंत नाही.
बालकवींच्या कविता पूरवून वाचतोय. कधी एखादी कविता एक दिवस पुरते कधी महिनोंमहिने डोक्यात घुमत राहते. सुनीताबाईंच्या 'सोयरे सकळ' 'मण्यांची माळ' तसेच  माधव आचवल यांच्या 'किमया' मधील ललितलेख एका बैठकीत नाही वाचता येत. प्रत्येक लेख मनात हळू हळू झिरपावा लागतो.  जी. ए. कुलकर्णी ( Genius GA असं आम्ही मानतो ) यांची कथा परत परत वाचावी लागते तेव्हा कुठे त्यांनी योजलेल्या शब्दकळेचं सामर्थ्य आणि सौंदर्य ध्यानात येतं.
 एकदा तर असं ठरवलं कि एक पुस्तक पूर्ण वाचून झाल्याशिवाय दुसऱ्या पुस्तकाला हात लावायचाच नाही. पण कितीही पक्का निर्णय केला तरी किमान तीन पुस्तके simultaneously (एकसमयावछ्चदेकरून) वाचायची सवयच लागली आहे. अशात बरीच पुस्तके अर्धी वाचायची राहूनच जातात. मित्र जेव्हा विचारतात कि इतकी पुस्तके वाचतोस केव्हा, त्यावेळेस वाटतं यांना सत्य परिस्थिती कुठे माहितेय?
 सध्या काय वाचतोयस? या प्रश्नाला मी अताशा खरं उत्तर देणे टाळतो, कारण हातातलं पुस्तक कधी संपवता येईल याची खात्री नाही. म्हणूनच ग्रंथालयातून ठराविक मुदतीसाठी पुस्तके आणणे मला जमत नाही.

पुस्तकांच्या बाबतीत मी आळशी आहे, पण काही झालं तरी पुस्तके  माझी कागाळी कुणाकडे करणार नाहीत, अबोला धरणार नाहीत किंवा रागावणार नाहीत, त्यांच्या पानांत दडवून ठेवलेली सुगंधी गुपिते सुरक्षित जपून ठेवतील. 




रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

चप्पल

काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमधे एक इमारत कोसळली तेव्हाची गोष्ट. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना  काढताना  प्रसारमाध्यमे Live दाखवत होती.  ७२ तास ढिगाऱ्याखाली असलेल्यांच्या जिवंत असण्याविषयीच साशंकता होती. त्यात या संकटातून वाचलेल्यांच्या मुलाखती चालू होत्या. 'आपको अब कैसा लग रहा है ?' सर्वात फालतू प्रश्न. जीवावरच्या संकटातून वाचलेल्याला काय वाटणार?
माणसे रडत होती. एकाने मोबाईल फोनमुळे आपण वाचलो असे सांगितले, एकाने आपण जगणार असल्याची आशाच सोडली होती, पण वाचलो असे सांगितले,  तेवढ्यात बचावदलाने आणखी एका जिवंत माणसाला बाहेर काढताच पत्रकारांचा आणि कॅमेरावाल्यांचा ओघ तिकडे सरसावला. त्या माणसावर फोकस करून परत तोच प्रश्न विचारला - 'आपको अब कैसा लग रहा है ?' त्या माणसाने बावचळल्यासारखे केले आणि बचावदलातील एका माणसाला विचारले 'मेरी चप्पल किधर है?'
Pause.
सगळे अचंबित.
इतक्या मोठ्या संकटातून वाचलेल्या माणसाला स्वतःच्या जीवाचे मोल नसून एका शुल्लक चपलेचे आहे असे वाटले. दुसऱ्या दिवशी बहुतेक सर्व वर्तमानपत्रांनी ही घटना प्रकाशित केली.
चपलांवरून असे अनेक किस्से आठवले.


***

पुलंच्या 'गुळाचा गणपती' चित्रपटात एका प्रसंगात मोठी जाहीर सभा घडतेय असे त्यांना दाखवायचे होते, पण इतकी माणसे आणणार कुठून ? त्यांनी एक शक्कल लढवली. शूटिंगला जमलेल्या सर्वांना त्यांच्या चपला काढून त्यांचा ढीग बनवायला सांगितला. सभेला येणारा प्रत्येकजण बाहेर चप्पल काढून आत जातोय असे दाखवले. background ला नेत्याचे भाषण ऐकू येतेय. खऱ्याखुऱ्या सभेचे चित्र उभे राहिले.

*** 

IBN लोकमत वर 'यंगिस्तान जिंदाबाद' हा चर्चासत्राचा  कार्यक्रम लागतो. आजच्या तरुणाईला भेडसावणारे प्रश्न त्यात मांडले जातात. ग्रामीण , शहरी भागातील तरुण मुले ह्यात आपले विचार मांडतात. मागे एकदा विषय होता 'देव आहे की  नाही?' यावर खडाजंगी झाली. बरीच मते मांडली गेली. मूळतः हा विषय फार प्राचीन आहे, आस्तिक, नास्तिक, विज्ञानवादी असे बरेच गट आहेत. एका मुलाने मी देव का मानत नाही याचे विश्लेषण करताना उदाहरण दिले कि. 'मी देवळात गेलो, देवाचे दर्शन घेतले. बाहेर आलो तर माझी चप्पल गायब ! जो देव माझ्या चपलेचे रक्षण करू शकत नाही तो माझे रक्षण कसे करणार ?'
यावर एक हशा आणि बऱ्याचशा सहमतीसाठी डोलावलेल्या माना.
 पांडुरंगशास्त्री आठवलेंनी एकदा म्हटलं होतं 'तुमच्या चपलांची रक्षा करायला देव आहे का? ज्याने ही भव्य, सुंदर सृष्टी निर्माण केली, जो तुमचे हृदय चालवतो, बाळ जन्माला येताच पहिला श्वास कसा घेते हे अजून विज्ञानालाही सुटले नाही असे कोडे आहे त्या चिद्घन शक्तीवर चप्पल चोरीला गेली म्हणून अविश्वास दाखवता?'

***
गेले ते दिन गेले जेव्हा मोठा भाऊ राम वनवासात गेला म्हणून धाकट्या भरताने प्रभू रामचंद्रांच्या पादूका सिंहासनावर ठेऊन राज्य केले. आता लोकशाही व्यवस्थेत निरंकुश सत्ता भोगणाऱ्या राज्यकर्त्यांकडे स्वतःच्या चपलांसाठीच वेगळे सदन असते.
राज्यकर्त्यांवर चप्पल फेकून मारणे ही आजच्या काळातील असंतोष व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. 

***

कमलेश्वर हे हिंदीतले नावाजलेले लेखक. त्यांची 'चप्पल' ही कथा माझी अत्यंत आवडती. उपहासात्मक कसं लिहावं याचा वस्तुपाठ त्यांचे लेखन वाचताना मिळतो. 'चप्पल' या कथेत लेखक त्याच्या आजारी नातेवाईकाला भेटायला हॉस्पिटलमधे जातो , तिथल्या रुग्णांच्या वेदनांनी तो हेलावून गेलाय, त्याला जन्म - मृत्यू - ईश्वर याबद्दल विचारमग्न केलंय.  लिफ्टमधे त्याची भेट एका सात - आठ  वर्षाच्या लहान मुलाशी होते, त्याला व्हीलचेअरवर बसवलंय आणि त्याच्या पायातील निळ्या हवाई चपलांवर त्याचे विशेष प्रेम आहे, लिफ्टमधून बाहेर पडताना जेव्हा त्याची एक चप्पल मागे पडते तेव्हा त्यासाठी तो बाबांना गळ घालतो. त्याच मुलाचे दर्शन तीन तासांनी लिफ्टमधे स्ट्रेचर वर होते, यावेळी त्याचा एक पाय कापला गेलाय, तो बेशुद्धावस्थेत आहे. त्याच्या निळ्या हवाई चपला बाबांच्या हातात आहेत. ते काहीतरी विचार करतात आणि लिफ्टमधून बाहेर पडल्यावर त्या कोपऱ्यात फेकून देतात आणि क्षणभरानंतर परत उचलतात त्यांना बहुतेक वाटत असावं शुद्धीत आल्यावर तो चपला मागेल. कमलेश्वर म्हणतात, तो परत शुद्धीत आल्यावर चपला मागेल कि स्वतःचा कापलेला पाय ?
एका प्राचीन संस्कृतीचा भाग असल्यामुळे वेदनांना सामोरं जाण्याचं धैर्य येतं किंवा त्या वेदनांना 'पुनर्जन्म' नावाचं गोंडस उत्तर देऊन मनाची समजूत घालता येते.

***

'व्यक्ती आणि वल्ली' मधे 'चितळे मास्तर' वाचताना शेवटची ओळ मनाला चटका लावून जाते -
''मुकुंदाच्या दारातल्या चपलांच्या स्टेंडवरून मास्तरांच्या चपला शोधून काढणे अवघड नाही गेले - - कुठल्याच चपलांच्या टाचा इतक्या झिजलेल्या नव्हत्या !''




गुरुवार, १७ जुलै, २०१४

आठवणींचा कोलाज - पाऊस

धो-धो पाऊस कोसळतोय. पाठीवर दप्तर आणि रेनकोट घालून मी आणि माझा भाऊ आम्ही शाळेत जातोहोत. थोडीशी थंडी वाजतेय पण आईने आताच भरून दिलेल्या डब्यातील खाऊ मधल्या सुट्टीत खाणार आहोत या कल्पनेने ऊब वाटतेय. छोटा भाऊ पाण्याने भरलेल्या डबक्यात उड्या मारतोय, पाणी उडवतोय  आणि मी मोठेपणाचा समंजस आव आणून त्याला दटावतोय. मला पण त्या पाण्यात उड्या मारायच्या आहेत पण काल बाईंनी सांगितलेलं अजून डोक्यातून गेलेलं नाही की या पाण्यात किती प्रकारचे जीव जंतू असतात आणि त्यांच्यामुळे पायाला infection होऊ शकतं वगैरे. बाईंनी आमच्या डोक्यात ते जीव जंतूंच खूळ घातल्यामुळे लहानपणी पाऊस नीट एन्जोयचं करू शकलो नाही.
                                                                              ***

मुसळधार पावसामुळे शाळा लवकर सोडली की मग धमाल.  मुद्दाम भिजत घरी यायचं. आईसमोर मुद्दाम शिंका काढायच्या मग आपली सरबराई कशी होते ते पहायचं. आई पावसाला दूषणं देत राहणार. मग गरम गरम मुगाची खिचडी किंवा कुळथाच्या पिठाची पिठी आणि भात खाताना background ला बाहेर कोसळणारा पाऊस असायचा. चार गरम घास पोटात गेल्यावर 'याच साठी केला होता अट्टाहास' असे वाटे.
                                                                               ***

नी. गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धेचा दुसरा दिवस.  उत्स्फूर्त फेरी. मला  चिट्ठीत  मिळालेला विषय होता 'ये रे ये रे पावसा'.
compulsorily ललित बोलायचं होतं, डोळ्यासमोर मेघ दाटले. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. इतक्या लोकांसमोर बोलताना वाटलेली भिती आठवली कि जाम हसायला येतं.  कशीतरी वेळ मारून नेली - राधेच्या वत्सल डोळ्यांतला पाऊस, ग्रेस ची 'पाऊस कधीचा पडतो' ते 'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' वगैरे बोललेलो आठवतेय. पावसाने जाम गोची केली होती तेव्हा.बक्षीस मिळालं नाही पण याच भीतीमुळे आणखी चांगली भाषणे करण्याची उर्जा दिली.

                                                                                ***
२६ जुलै, २००५. अकरावीचं कॉलेज नुकतच सुरु झालेलं. आणि त्या दिवशी पावसाचा नूर काही वेगळाच. रात्री पडला तो पडलाच पण सकाळी पण उसंत नाही. छत्रीवर  बंदुकीच्या गोळ्या येताहेत  असा आवेग.  दुपारपर्यंत सर्व मुंबई जलमग्न झाली. कॉलेज लवकर सोडलं. घरी कळवावं तर कसं. फोन करावा तर मोबाईल नाही. वाटेत गुडघाभर पाणी. हायवे वर पिवळ्या रंगाचा  एकच PCO आणि त्यापुढे किमान २० लोक रांगेत. रांगेत उभा राहून अर्ध्या तासाने नंबर आला. घरी आईला कळवलं की सुरक्षित आहे, काळजी नसावी. त्या दिवशी  पावसाने भयंकर रूप दाखवलं. माणसांनी एकमेकांना या परिस्थितीत खूप मदत केली, कुणी बिस्कीटचे पुडे वाटले, कुणी राहायला जागा दिली. संध्याकाळी थंडीने कुडकुडत घरी पोहोचलो.  आज त्याच कॉलेजमध्ये मी ग्रंथपाल आहे. हायवेवरचा तो PCO आता नाही, त्या दिवसाच्या आठवणी अजून अंगावर काटा आणतात.
                                                                              ***
एका टप्प्यावर कॉलेज हेच दुसरं घर झालं होतं. फेस्टिवल्स, स्पर्धा, NSS, मराठी वाड्ग्मय मंडळ, स्वतः jointly स्थापन केलेला 'कॉलेज कट्टा' यामुळे घरी फक्त पहाटेची अंघोळ आणि रात्रीची झोप याचसाठी जावं लागे. आपण हे सर्व व्यक्तिमत्व विकासासाठी करतो आहोत अशी तद्दन फालतू समजूत नव्हती. त्या दिवसांनी चिरकाल टिकणाऱ्या आठवणी दिल्या. त्या दिवसांत शिकलेल्या गोष्टी आणि मूल्ये अजूनही जगताना कामी येतात. पावसात कॉलेज कॅन्टीन गप्पांचा अड्डा बने.  कॉलेजच्या गेटबाहेर प्रभाची टपरी आहे त्याला लागून अण्णाची चायची गाडी आहे. पावसात चायची तल्लफ झाली तर तिथे कटींग मारायची आणि आल्याच्या तिखटजाळ चायने तोंड पोळून घ्यायचं. आयुष्यात पुढे काहीच नाही झालं तर अण्णा सारखी चायची टपरी टाकता येईल अन जगता येईल असा आत्मविश्वास दिला. त्याच्याकडे काचेच्या बरण्या भरून खारी, बिस्किटे असायची. एक खारीचा तुकडा आणि आणि एक कटिंग असा नाश्ता केल्यावर किमान दोन लेक्चर्स काळजी नसायची. कधी जिवलग मित्र चायचा वाटा उचलायचे कधी 'खारीचा'.

                                                                               ***
पाऊस खूप पडला तर बाल्कनीत कुडकुडनाऱ्या चिमण्या येउन बसायच्या. त्यांना लांबूनच पहावे लागे, जवळ गेल्यास  पुन्हा पावसात जायच्या घाबरून. काही धीट तशाच थांबायच्या. आईने आणि मी विचारांती निर्णय घेतला-
बाल्कनीत चिमण्यांसाठी लाकडी खोका ठेवला उंचावर.  घरटं बांधायला.  पावसाची सर त्यांच्या घरट्यावर पडू नये म्हणून काळजी घेतली.  त्यात चिमणं जोडपं राहायला आलंय. हे आमचे नवीन शेजारी पहाटे चिवचिवाट करून उठवतात. मग त्यांना तांदळाच्या कण्या घालायच्या. त्या निमित्ताने बऱ्याच चिमण्या खिडकीत जमा होतात.


                                                                               ***
मध्यंतरी इंद्रायणीने पुण्याला जाऊन आलो. मुंबईपासून पावसाने जी सोबत केली ती शिवाजीनगर येईपर्यंत.  साडेपाचचा अंधार आणि तो हळू हळू वितळत चाललेला. पावसामुळे खिडकीच्या काचांवर थेंब थेंब जमा व्हायचे आणि त्यांची सलग धार बनून खाली पडायची. माझ्या शेजारी बसलेल्या बाईंसोबत लहान मुलगी होती. तिची आणि माझी छान ओळख झाली. ती माझ्यासमोर उभी राहून त्या दंवाने भिजलेल्या काचेवर नक्षी काढत होती.  त्या नक्षीत ती काय काढतेय हे मी निरखून पाहू लागलो. पहिल्यांदा तिने स्वतःच नाव काढलं. पुन्हा दंव जमा झाल्यावर तिने होडी काढली. आणि थोड्या वेळाने घर. मी तिला विचारलं- 'होडी चालवणार कोण?' त्यावर तिचं उत्तर 'त्यात काय अवघड आहे.  ती आपोआप चालते' आपण फक्त पाणी द्यायचं'. 'मग तू होडीनेच का नाही जात पुण्याला?' तर तिने आईकडे बोट दाखवत म्हटलं 'हिच्यामुळे. ही खूप घाबरट आहे म्हणून'.

                                                                             ***
मित्रांचा अड्डा जमलेला. जुने दोस्त बऱ्याच वर्षांनी भेटलेले. रात्री जेवणं झाली तरी गप्पा थांबेनात. पाऊस खूप पडतोय म्हणून सर्वांनी थांबायचं ठरवलं . ज्याच्या घरी थांबलो होतो त्याने घरी कुणी नाही म्हणून आमंत्रण दिलेलं. त्याला बहुतेक याचा पश्चाताप होत असावा. रात्रभर फालतुगिरी चाललेली. अडीच वाजता कॉफी पिता पिता एकमेकांच्या जमलेल्या, फसलेल्या प्रेमकहाण्या चर्चेला आल्या आणि ज्यांच्या डोळ्यावर झोप आली होती ते पण जागे झाले.  घरभर कॅप्स्टनचा धूर दाटलेला. एक छोटा ढगच जणू.
'तुला बाहेर पडणाऱ्या पावसाची शपथ, खरं सांग. . कोणय ती?'
'अरे पावसाची शपथ घालू नको. . आपल्याला दुष्काळात राहावं लागेल.'
पावसाची गाणी रात्रभर चाललेली.  सातारी भाषेत 'नुसता राडाच'. 

सोमवार, २ जून, २०१४

निकाल शिक्षणाचा

आज बारावीचा निकाल लागेल आणि संध्याकाळी शेजार पाजारच्या यशस्वी मुलांकडून पेढे मिळतील. "किती टक्के मिळाले रे?"  अशी  विचारपूस होईल. ज्यांना  जास्त टक्के मिळाले असतील त्यांचा आणि त्यांच्या पालकांचा ऊर अभिमानाने भरून येईल. जे जेमतेम पास झालेत त्यांना 'सुटलो बुवा एकदाचे" या फीलिंग बरोबर आणखी थोडे मार्क्स जास्त पडायला हवे होते असे वाटेल. ज्यांचा फर्स्ट क्लास थोडक्यात चुकला किंवा अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स पडले त्यांचा चेहरा पडलेला असेल आणि जे नापास झाले असतील त्यांच्या घरी कुणीतरी गेल्यासारखं वातावरण असेल.

प्रसंग साधारणतः असा असेल :

मिलिंद कोपर्यात रडत बसलेला. किचन मधे आई भाजी चिरताना टिपं गाळत असेल, पदराने मधूनच डोळे पुसत असेल. धाकटा भाऊ आज TV बंद म्हणून पलंगावर एका बाजूला बसून काहीतरी वाचण्याच्या प्रयत्नात आणि बाबा शून्यात नजर लावून बसलेले.
घरात तीव्र स्मशानशांतता.  कुणीच कुणाशी बोलत नाही.
इतक्यात मिलिंदचा मित्र माधव पेढे घेऊन येतो. मिलिंदचे बाबा पेढा घेतात आणि मिलिंदकडे रागीट कटाक्ष टाकून माधवला म्हणतात "शिकव जरा आमच्या नालायकाला पण. नापास झालेत, आमच्या अख्ख्या खानदानात कुणीच नापास झालं नाही. अब्रू धुळीला मिळवली सगळी.  दिवे लावले ! आता बसा वार्या करीत बोर्डाच्या." माधवला काही बोलायचं सुचत नाही. तो दोन मिनिटे शांत ऐकून घेतो आणि "बराय येतो" म्हणून निघून जातो.

स्वगते:
बाबांना उद्या ऑफिसमधे सहकार्यांना काय सांगू असा प्रश्न पडलेला. जोश्याच्या मुलीला नेहमीप्रमाणे चांगले टक्के मिळाले असतील. उद्या तो सर्वांना पार्टी देईल. "तुमचाही मुलगा होता ना हो बारावीला? किती मिळाले?" असा प्रश्न विचारल्यावर काय सांगू? त्यापेक्षा उद्या ऑफिसला जातच नाही. मेडीकल बाकी आहेत, त्याच टाकूया. काय नाही केलं मुलासाठी? परवडत नसताना विलेपार्ल्याला भरभक्कम फी वाला क्लास लावला. परीक्षेच्या काळात त्याच्याबरोबर रात्र रात्र जागलो.  कॉफी करून दिली. ऑफिसमधे रजा टाकली.
आता काय होणार आहे पुढे देव जाणे! चांगला शिकून इंजीनिअर व्हावं इतकं साधं स्वप्न नाही पूर्ण करू शकत? काय कमी ठेवलं, जे मागेल ते दिलं. आमच्या वेळी नव्हत्या इतक्या सोयी, म्हणून आपल्या मुलांना काही कमी पडू द्यायचं नाही असं वाटतच ना आम्हाला.

मिलींदची आई शेजारी काय म्हणतील या विचारात.

आणि मिलिंद "नापास होणं हा इतका मोठा अपराध आहे का?" या विचारात. "आपल्याला या किचकट गणितात आणि सायन्समधे काडीचाही रस नाही, हे किती वेळा सांगितलं आपण यांना. अकरावीला प्रमोट झालो तेव्हाच सांगितलं, पण बाबांनी काही ऐकलं नाही. मोठा क्लास लावला. मला खरं तर इतिहासाची खूप आवड आहे, जुन्या काळाविषयी जाणून घ्यायला खूप आवडतं. त्यातला सन - सनावळ्या पण अचूक लक्षात राहतात. दहावीला समाजशास्त्रातच जास्त मार्क्स होते. बाबांनी सायन्स घेऊन दिलं, खानदानात अजीतकाका सारखा आणखी एक इंजीनिअर व्हावा असंच त्यांना वाटतंय. आता CET चा निकाल पण असाच असेल, तेव्हा पण ओरडणार.  मला का जाऊ देत नाहीयेत माझ्या मार्गाने?"

वरील प्रसंगात बारावीचा निकाल होता, त्याजागी कुठलीही परीक्षा ठेवा. फरक पडत नाही. प्रत्येक निकाल हा घरच्यांसाठी निकालच असतो. गुणवत्ता यादी जाहीर करण्याची अमानुष पद्धत बंद झाली हे एक बरं झालं. नाहीतर त्यात स्थान मिळालं नाही म्हणून खट्टू होणार्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा  मोठा वर्ग समाजात होता. गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांनी पुढे काय केलं यावर संशोधन झालं पाहिजे.

नापास झालेल्या मुलांकडे एकंदरीत समाजाचा दृष्टीकोण बदलायला हवा. नापास होणं हा काही अपराध नाही. नापास होण्याच्या भीतीने किंवा नापास झाल्यामुळे आत्महत्या करणार्यांची संख्या कमी नाही.
नापास झालो म्हणून जीवनच संपवूया असं यांना का वाटतं? हे तर शिक्षणाच्या मुलभूत उद्देशाच्या विरुद्ध आहे. शिक्षणाने तुम्हाला जगायला सक्षम बनवलं पाहिजे. तुमच्या क्षमतांची ओळख करून दिली पाहिजे. भोवतालच्या घटनांची जाणीव करून दिली पाहिजे जेणेकरून त्या परिस्थितीत कसं वागावं याचं आकलन होईल. असं घडतं का हो?

सध्याचं शिक्षण तुम्हाला फक्त डीग्री मिळवून देतं. त्यानंतर तुम्ही तुमच्या डीग्रीने काय करता याची ना तुमच्या शिक्षकांना फिकर ना समाजाला. विद्यापीठे म्हणजे मागणी तसा पुरवठा देणारे कारखाने झालेत.
बाजारात व्यवस्थापक हवेत, मग MBA चा कारखाना काढा. तंत्रज्ञ हवेत, मग काढा Technical Institutes.
अशा कारखान्यातून हजारो तरुण बाहेर पडतात नोकरी शोधायला. बाजाराची जितकी गरज असेल तितक्यांना नोकर्या मिळतात आणि बाकीचे बेरोजगार. कारण मिळालेल्या शिक्षणाने जगायला सक्षमच बनवलं नाही.
पोटार्थी शिक्षणाने हजारो बेरोजगार  B. Ed. आणि D. Ed. पदवीधारकांची पिढी घडवली, आता त्यात बेरोजगार इंजीनिअरही येताहेत.  B. Ed. आणि B. E. करून कॉल सेंटरमध्ये काम करणारे मित्र पाहिले की वाईट वाटतं. "अमुक एक कर त्याला भविष्यात स्कोप आहे" असे  सांगणाऱ्या उपदेशक मंडळींचा मला भयंकर तिटकारा आहे.
सब घोडे बारा टक्के पद्धतीचे शिक्षण एकाच छापाचे गणपती तयार करतेय. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे याची जाणीवच नाही.
नापासांना आपण "नालायक" आहोत असे वाटतंय तर बेरोजगारांना आपल्या शिक्षणाच्या उपयोगाबाबत संभ्रम आहे.

खूप पैसा मिळवणं हे काही शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट असू शकत नाही पण शिक्षणसम्राटांचे आहे. One time investment मुळे देशभर  विद्यापीठांचे पीक आलंय. कधी नव्हे ते लोकांना शिक्षणाचे महत्व पटलंय पण कुठल्या प्रकारचं शिक्षण गरजेचं आहे हे माहित नाहीये. पालक आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांच्या खांद्यावर ठेवताहेत. मुलाला कशात रस आहे हेच पाहत नाहीयेत. त्यात डॉक्टर, इंजीनिअर, MBA  वगैरे व्हावं अशी इच्छा. त्यांना सांगावं वाटतं की, खलिल जिब्रान वाचा. तो सांगून गेलाय -
"Your children are not your children.
They are the sons and daughters of Life's longing for itself.
They come through you but not from you,
And though they are with you yet they belong not to you."
… You may strive to be like them,
but seek not to make them like you.
For life goes not backward nor tarries with yesterday.
मुलाला चित्रकार व्हायचंय… होऊ द्या. . रंग विकत घेऊन द्या, आणि  त्याच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे रंग पहा.
मुलाला लेखक व्हायचंय. . होऊ द्या. . पुस्तके विकत घेऊन द्या, लेखक कसा घडतो ते जाणवून द्या.
करीअरच्या संधी वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, फक्त क्षेत्र निवडताना मुलाची आवड, अभ्यासाची क्षमता लक्षात घ्या. या निर्णयप्रक्रियेत मुलाला प्रत्यक्ष सहभागी करा. नापास झालेल्या मुलाला खर तर तुमच्या प्रेमाची जास्त गरज असते. विझू जात असलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी घरचांच्या मदतीची खरी गरज असते. नापास होणं म्हणजे काही इभ्रतीला लागलेला बट्टा नव्हे. अपयश येतंच. त्यात अडकून न पडता त्यावर मात करायला जिगर लागतं. यशस्वी माणसाची ओळख तो किती अपयशातून यशस्वी झाला यावरच ठरत असते. 

शनिवार, १० मे, २०१४

लोकलकथा - २

गाडीने भाईंदर सोडलं आणि डब्यात एक परिचयाचा आवाज ऐकू आला.  "मेरी आवाज की तरफ़ ध्यान दिजिये श्रीमान, सुनने का कुछ पैसा नहीं, देख़ने का कुछ पैसा नहीं" . पन्नाशीतला एक गृहस्थ आपल्या खर्जातल्या आवाजात हातातल्या प्रोडक्टच मार्केटिंग करत होता.  रोज तीच लोकल गाडी पकडत असल्यामुळे मी त्याला चांगलाच ओळखतो.  त्याच्याकडच्या वस्तू १० रुपये ते ३० रुपये या परवडेबल रेंज मधल्या असतात हे आपलं माझं निरीक्षण.  सूया, मुंबई दर्शन गाइड, रेल्वेचं टाइमटेबल, दंतमंजन, वह्या,  घरचा वैद्य नामक पुस्तिका, टॉर्च यातलं तो काहीही विकतो.   लोकांच लक्ष कसं वेधून घ्यावं, हे त्याला बरोबर जमतं.
"घर, दुकान सब जगह काम आनेवाली चीज. (आता या ठिकाणी वस्तूच नाव) अगर बाजार मे इसकी  किमत  पुछने जाओ तो करीबन ६० से ७० रुपया होगी, लेकिन कंपनी के प्रचार के हेतू वही चीज आपको कम से कम दाम मे केवल १० रुपये मे दी जा रही है, मात्र १० रुपये, फक्त १० रुपये, ओन्ली टेन रुपीज"
"जो भाईसाब देखना चाहते है, देख सकते है, जो पाना चाहते है प्राप्त कर सकते है" मग तो एकेक सीट वर लोकांना बघण्यासाठी ती वस्तू देणार. काही जण उत्सुकतेपोटी पाहतात, काहींच्या मनात घेऊ का नको अशी चलबिचल होते. "आजकल १० रुपये में क्या आता है भाईसाब, वडापाव भी १५ रुपये का आता हैं" या त्याच्या वाक्याने "बरोबर आहे, घेऊया तर खरं. नाही चांगलं लागलं तर गेले १० रुपये म्हणायचं" असा विचार करून बरेच जण विकत घेतात.  "पिछले दस साल से इसी लाईन पे सफर कर रहा हुं, कभी शिकायत नही आयी" हे वाक्य ज्यांनी वस्तू विकत घेऊनही ज्यांच्या मनात अजूनही शंका आहे त्यांना विश्वास देण्यासाठी.

गेली ४ - ५ वर्षे वेगवेगळ्या डब्यांत मला तो भेटलाय. बहुधा गर्दीच्या वेळा टाळून तो प्रवास करतो, पण गर्दी त्याला वस्तू विकण्याची चांगली संधी देते .  मराठी, हिंदी वर त्याची चांगलीच कमांड आहे. इंग्रजीतली एखाद दुसरी कामचलाऊ वाक्ये त्याला येतात.  तीच तो अधून मधून वापरतो. केसं पांढरी झालीयेत. दंतमंजन विकताना तंबाकू खाऊन लाल पिवळ्या झालेल्या दातांकडे तो सोयीस्कर दुर्लक्ष करतो. दाढीची खुटं थोडीफार वाढलेली आहेत. खांद्याला झोळी सारखी जड ब्याग आहे.
डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर. जिथे साध्या मुंगीलाही हलता येणार नाही अशा  गर्दीच्या वेळी "भाईसाब जरा अंदर जाने दिजीये" म्हणत अभिमन्युसारखा तो आत शिरतो. वयाने शरीर थकले आहे याच्या खुणा दिसताहेत पण मिश्कीलपणा जात नाही. एकदा 'मुंबई दर्शन गाइडबुक' विकत होता, डब्यात कॉलेजला जाणारी बरीच तरुण मुलं-मुली होती. अशा वेळी त्याने आपले निरुपण सुरु केले.
"मित्रांनो, घर दुकान सगळीकडे उपयोगी येणारी गोष्ट. मुंबई दर्शन गाईडबुक ! मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे, बाजार, सिनेमागृहे सगळ्यांची माहिती कुठे मिळेल? एकच उत्तर - मुंबई दर्शन गाईडबुक. समजा तुम्ही गर्लफ्रेंड बरोबर पिक्चर पाहायला जाताय. जवळच थिएटर कुठेय? कोण सांगेल?? एकच उत्तर - मुंबई दर्शन गाईडबुक.
गर्लफ्रेंड  म्हणाली, चौपाटीला जाऊ, तर तिथे कुठली बस जाईल ? कोण सांगेल?? मुंबई दर्शन गाईडबुक.
गर्लफ्रेंड  म्हणाली, बाहेर जेवूया, तर कुठले हॉटेल्स? कोण सांगेल?? मुंबई दर्शन गाईडबुक."
इतक्या विश्लेषणानंतर मुंबई दर्शन गाईडबुक खपलं नसतं तर नवल.
मी पण त्याच्याकडून बर्याच वस्तू विकत घेतल्या. त्याच्याकडच्या दंतमंजनाने दात शुभ्र होतात असे मला आढळले नाही, घरचा वैद्य कधीही मदतीला धावला नाही . पाठदुखी वरचा उपाय करताना जी घरगुती साधने म्हणून लिहिली होती ती सापडली नाहीत. पाठदुखी डॉक्टरच्या औषधानेच बरी झाली. मुंबईतच लहानाचा मोठा झाल्यामुळे मुंबई दर्शन गाईडबुक कधीही वापरले नाही. घरी पुस्तकांच्या कपाटात ते कोपर्यात पडलेले आहे. रेल्वेच्या वेळापत्रकाचा फारसा उपयोग झाला नाही कारण माझी एक मैत्रीण रेल्वेचं चालतं बोलतं वेळापत्रक आहे. कधी अडल्यास सरळ तिलाच कन्सल्ट करतो.(आणि खरं बोलायचं तर ट्रेन कुठे वेळेवर धावतात)  तरीपण या माणसाला जेव्हा भेटतो तेव्हा काही न काही विकत घेतोच. उपकार म्हणून नव्हे तर त्याच्या कौशल्याला दाद द्यावी म्हणून.
एकदा रात्री दहाच्या दरम्यान भेटला. शेवटची खेप असावी दिवसभराची. ओळखीचा चेहरा दिसल्यावर त्याने हात उंचावून ओळखल्याच दाखवलं. ट्रेन सोपार्याला रिकामी झाली तेव्हा त्याला विचारलं "कैसे हो?"
नेहमीचं उत्तर "बढीया". त्याची मुलं कॉलेजला जातात. मुलगा शेवटच्या वर्षाला आहे. त्याला बाबांनी आता आराम करावा असं मनात आहे. पण त्याने आधी शिक्षण पूर्ण करावं यावर हा ठाम.
"बच्चे अपने पैरो पे खडे हो जायेंगे तो फिर करेंगे आराम ! अब ट्रेन की भीड भी रोज बढती ही जा रही है, कभी सास फुल जाती है, देखते है कब तक चलती है सांसे. उपर वाले पे विश्वास है. ये भी दिन जायेंगे"

"हे ही दिवस जातील" हा सुखात संयम ठेवण्यास सांगणारं  आणि दुखा:त धीर देणारं वाक्य आज त्याच्या तोंडून ऐकत होतो. स्टेशन आल्यावर त्याचा निरोप घेतला. आता जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा त्याच्या धडपडीमागील कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर येतो. माझ्याकडे पाहिल्यावर ओळखीचं स्मित करतो.


बुधवार, ७ मे, २०१४

जिप्सी

फॉक्स ट्रैवलर वर एक मस्त शो आहे - "One Man and His campervan". मार्टिन डोरे हा खादाड, भटक्या, मनमौज्या प्राणी (ही विशेषणे माझ्या खास आवडीची) स्वत:च्या  १९७० च्या क्लासिक campervan मधून राणीच्या साम्राज्यात भटकत असतो.मनात येईल तिथे मुक्काम, स्वत: एक्सपेरिमेंट करणारा कुक म्हणून एखाद्या तलावाच्या काठी किंवा मोकळ्या रानात निळ्या आभाळाखालीं जी साधने उपलब्ध होतील त्यातून जिभेला पाणी सुटेल असे पदार्थ बनवतो.कधी त्यात गळाला लागलेला लॉबस्टर असतो तर कधी लोकल चीज़ फैक्टरीतलं ताजं चीज़  असतं.मोजक्या साधनांतून जे बनवतो ते मस्तच असतं.पण सर्वांत भावणारी गोष्ट म्हणजे निवांतपणा. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी निद्राधीन होईपर्यंत फक्त धावपळ करणार्या प्रत्येकाच्या मनात निवांतपणे, उनाडपणे जगावं असं वाटत असतं-ते स्वप्न मार्टिन स्वतः जगतोय याची थोडी असूया वाटतेच.त्याउपर तिथली छोटी  छोटी गावे, डोंगर दर्या, नजर जाईल तिथ पर्यंतचे हिरवेपण, वाटेत मधेच भेटायला येणारे छोटेसे ओढ़े, दूध देणार्या महाकाय गायी सगळं मनाचा ठाव घेणारं हे आपल्या शहरी निबिड जीवनात नाहीये याची खंत वाटते.

पाडगावकर म्हणतात ते अगदी खरंय-"एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून". प्रत्येकाच्या मनात एक जिप्सी दडलेला असतो,पण जसजसं मोठे होत जातो तसे टाईची गाठ मारता मारता त्यालापण मारून टाकतो.
लहानपणी मी आणि माझा भाऊ एक वेगळाच खेळ खेळायचो.  एक लहान वीट घ्यायची.  तिला रोज पाण्याने ओलं करायचं.  जास्त ऊन नसेल अशा कोंदट ठिकाणी ठेवायचं.  काही दिवसांनी मग त्यावर हिरवशार बारीक स्पंज सारखं गवत उगवायचं (ज्याला बॉटनीत मॉस म्हणतात)हे झालं आमचं अमेजॉनच जंगल.   मुद्दाम कर्कटकाने त्यावर चिरा काढायच्या-ह्या नद्या.   थोड्या दिवसांनी त्यावर लहान सहान सुश्मजीव फिरायचे.  मुंग्या असायच्या.  इथपर्यंत आल्यावर खरा प्लॉट सुरु व्ह्यायचा आमच्याकडे एक छानसं भिंग होतं.  त्यातून ह्या सर्व गोष्टी तासंतास पहायच्या.  स्वताला आपण हेलीकॉप्टरमधे बसलो आहोत आणि उंच आभाळातून हे जंगल दिसतय अशी कल्पना करायची.  लाल मुंग्या दुष्ट असतात (कारण त्या चावतात!) आणि काळ्या मुंग्या गरीब बिचार्या म्हणून त्यांना वाचवणं आपलं कर्तव्य आहे असे वाटायचे.

एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीत गावी जात असू.  त्यावेळी काय पाहू अन काय नको असे होई.  सकाळी एकदा पोटात भर पडली क़ी दुपारी घरात हजर आणि मग परत संध्याकाळी मोर्चा.  दिवसभर भटक भटक भटकायचं, पाय दुखेपर्यंत.   पाबळाच  गार पाणी चेहर्यावर मारल्यावर  सगळा क्षीण जायचा.  झाडाच्या सावलीत वरच्या आभाळातील ढगांचे बदलते आकार बघत पहुडायचं.  पाटाच्या कडेकडेने जाताना अवचित एखादी धामण सरकन डोळ्यासमोरून जायची.  पडलो, खरचटलं क़ी पांगळयाचा पाला चोपडायचा.  (ह्या गोष्टी घरी कधीच कळल्या नाहीत ) रात्री चांदण्या पहायच्या.  आजोबांच्या शिकारीच्या गप्पा ऐकायच्या.  आपले आजोबा आता इथे वाघ आला तऱी त्याला पळवून लावतील या निर्धास्तपणावर छान झोप लागे.
 सुट्टी संपल्यावर परत येताना पुढच्या वर्षासाठी सगळं नजरेत भरावे लागे.  नुकत्याच लावलेल्या चाफ्याच्या रोपट्याचे काय होणार याची चिंता असे.  गाडीत बसल्यावर भरलेल्या अंधारासोबत हे सगळं  गायब होई.  उजाडताच मुंबईत पोचलेले असू.  शाळा सुरु होताच वर्गपाठ आणि गृहपाठ करताना मनातला जिप्सी घाबरून जाई.  त्याला वर्ष संपायची ओढ लागे.


शनिवार, २९ मार्च, २०१४

नोकरीनामा


परवा वाटेत एक मित्र भेटला. त्याने बोलता बोलता खिशातून त्याचे विजिटिंग कार्ड काढून दिले. मी म्हणालो  "अरे बाबा कार्ड कशाला ? आहे माझ्याकडे. काही महिन्यांपूर्वीच नाही का तू दिलस !" तर त्यावर त्याचे उत्तर -"जॉब बदलला मी,  हे नवीन कंपनीचं". मी चकित.  कारण या आमच्या मित्राला हेवा वाटावा अशा पगाराची नोकरी.  त्यावर आईटी क्षेत्रातला जॉब.  न राहवून कारण विचारलं, तेव्हा म्हणाला "पॅकेज जास्त आहे" . आईटी क्षेत्रातली मंडळी एका जागी फार टिकत नाहीत हे ऐकून होतो.  चांगली संधी मिळवण्याच्या प्रयत्नात आपण सर्वच असतो, पण या क्षेत्रातल्या मंडळींचा एका ठिकाणचा कार्यकाळ हा तीन महीने ते जास्तीत जास्त दोन वर्ष असा असतो.  त्यातही सतत स्वताला अपडेट ठेवायची धडपड.  ऑटोमोबाइल क्षेत्रातल्या एका मित्राने सांगितलं, की हल्ली माणसं एका कंपनीत एखाद वर्ष काम करतात आणि तो अनुभव बांधून दुसर्या कंपनीत जातात. कंपनीशी त्यांना कुठलीही बांधीलकी असत नाही.  मग ही माणसे जाताना एका वर्षात या क्षेत्रात कमावलेले ज्ञान, बहुमोलाचे अंदाज सोबत घेऊन जातात.  जे कंपनीच्या दृष्टीने फार महत्वाचे असते.   नवीन नोकरदारांवर कामकाज शिकवण्यासाठी जो खर्च होतो तो वेगळाच.
माझ्या शेजारचे काका, इतकेच कशाला माझ्या बाबांनी देखील एकाच कंपनीत २५ वर्षे नोकरी केली.  कंपनीच्या उत्कर्षाच्या सर्व घटनांचे साक्षी राहिले.  त्यांना विचारलं तर आपण सुरुवात किती रुपये पगारापासून केली आणि आता मेहनतीने कुठपर्यंत आलो आहोत याचा सविस्तर आलेख सांगतील. पण पैसा कमावणं  हाच नोकरी करण्याचा महत्वाचा हेतू आहे का?
स्वताच्या आवडीच्या क्षेत्रात किती जण काम करतात?
मुळात आपण नोकरी, उद्योग कशासाठी करतो ? पैसा कमावण्यासाठी. हे खरं प्राथमिक उत्तर.  कारण त्याशिवाय उपजीविका करणं कठीण आहे.  (पैश्य़ाशिवायही रानावनात  नीट जगता येतं हे थोरोचं  वाल्डेन वाचताना पटतं आणि त्याचा खूप हेवा वाटतो)  रोज सकाळी उठून कामावर जाण्याची लगबग. तो सकाळचा दीर्घ प्रवास, दिवसभर ऑफिसमधे काम, संध्याकाळी थकल्या जीवांची घराची ओढ.  रात्रीची जरा झोप लागतेय तोच पुन्हा घड्याळाचा गजर.  पुन्हा तेच तेच.  कधी एकदा रविवार येतोय याची आस.  आणि रविवारच्या रात्री सोमवारची भीती.  जगण्यात एकसुरीपणा येत जातो . कामाच्या डेड लाइन्स पाळता पाळता आपणच डेड होऊन जातो कळतच नाही.  एंजॉयमेंटच्या नावावर वीकेंडला नविन लागलेला पिक्चर पाहतो, बाहेर जेवतो आणि आपलं सगळं सुरळीत चाललं आहे याचं स्वतःलाच आश्वासन देत राहतो.
माझ्या आईटी क्षेत्रातल्या मित्रासारखे काही झटपट नोकर्या बदलतात,तर काही दुसरी चांगली नोकरी शोधूया का? मिळेल का? याच प्रश्नाच्या उत्तरात आणि सुरक्षितता शोधत जगत असतात.  एका मित्राने सरकारी नोकरी मिळाल्यावर "Finally got a government job... आता आयुष्यभराची चिंता मिटली" असे म्हटल्यावर काय रिएक्शन द्यावी या विचारात  बराच वेळ होतो मी.  आवश्यकतेपेक्षा जास्त पगार, कामाचे कमी तास,दिवाळी बोनसची खात्री, केव्हाही संप करून व्यवस्थेला वेठीला धरण्याची मुजोरी आणि कामचुकारपणा ही व्यवछेदक लक्षणे असणार्या नोकर्यांसाठी जेव्हा लाखोंच्या संखेने अर्ज येतात,प्यून, क्लर्क सारख्या पोस्टसाठी जेव्हा मास्टर्स झालेली मुले मूली प्रयत्न करतात तेव्हा काळजी वाटते की  इतके शिकूनसुद्धा आपल्याला पुढे काय करायचे आहे हे न कळणं ही शिक्षणव्यवस्थेची शोकांतिका नव्हे का?
निव्वळ स्कोप आहे असा विचार करून इंजीनियर झालेला माझा मित्र जेव्हा कॉल सेंटरमधे कमी पगाराचा जॉब करतो,तेव्हा खंत वाटते.  करिअरिस्टिक धोरणातून इतरांच्या सांगण्यावरून  क्षेत्र निवडलेलं.  त्यात मनातून आवड नाही म्हणून रेटत रेटत केट्या  पास करत एकदाची हाती मिळवलेली डिग्री.  आणि त्याच क्वालिफिकेशनचे हजारो लोग.  नोकरी नाही म्हणून घरच्यांनी दाखवलेला अविश्वास हेच हल्लीच्या पिढीचे क्रंदन आहे.  बरं, वाट चुकली हे ध्यानात आल्यावरही आपल्या मनासारख्या क्षेत्रात न जाणार्या रिस्क घ्यायला घाबरणार्या लोकांची दया येते. आला दिवस ढकलला जातो.  पगार केव्हा वाढेल याच विचारात आयुष्य गुंतून जाते.
वपु काळे यांनी त्यांच्या वडिलांबद्दल लिहिलय की,उतारवयात ते असंबध्द बोलत . आयुष्यभर बॉसला एक शब्द उलटा न बोलता इमाने एतबारे  नोकरी केल्यानंतर उतारवयात ते बॉसला शिव्या देत.  आयुष्यभर दाबून ठेवलेला राग, अपमान, संताप याचा म्हातारपणी उद्रेक होतो.
याउलट आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा आनंद वेगळाच असतो.  मॉनेटरी फायदे हे मग बायप्रोडक्ट असतं.  आवडीच्या क्षेत्रातली कंटाळवाणी कामे पण कल्पकतने कशी करता येतील हे कळू लागतं.  प्यून, क्लर्क यांना मी अजिबात कमी लेखत नाहीये.  शेवटी प्रत्येक काम महत्वाचच असतं,पण प्रत्येकाने स्वतःची वाट शोधायला हवी.   At the end of the day समाधान महत्वाच असतं.  "मी तेव्हा हे करू शकलो असतो"  किंवा "मी तेव्हा हे केलं असतं तर किती बरं झालं असतं" ही वाक्ये  नंतर  खूप त्रास देतात मनाला.
आपलं आवडीचं क्षेत्र कसं निवडावं? माझा मित्र दिपची  theory असे  सांगते की, जे करताना तुम्ही देहभान विसरता त्याचसाठीच तुमचा जन्म झालेला असतो.  बर्याचदा त्याची मस्करी केली आम्ही.  पण आता ते पटतंय.
 शाळेत असताना निबंधांचा शेवट जसा आपण typical पद्धतीने करायचो तसाच शेवट एका मोठ्या माणसाचे वचन उद्गारून करतोय -
"And in the end, it’s not the years in your life that count. It’s the life in your years."
- Abraham Lincoln 

सोमवार, २४ मार्च, २०१४

लोकलकथा

माझा एक सहकारी प्राध्यापक मित्र पीएचडी करतोय. त्याचा विषय आहे की मुंबईतील रेल्वे कशा प्रकारे एक लहान विश्व आहेत -  स्वताचे वेगळेपण असणारे. या मोठ्या विश्वात आणखी लहान लहान विश्वे.  रेल्वेमुळे कशा पद्धतीने समाज आणि त्यातील घटक बांधले जातात वगैरे. या तत्सम तांत्रिक गोष्टी तो माझ्याशी बराच वेळ बोलत होता. तर या विषयावर बोलत असताना रेल्वेतील भिकारी, भजनी मंडळे, ग्रुप्स, पाकिटमार, भेळवाले असे अनेकविध विषय माझ्या डोळ्यासमोर आले. पुढे मागे यातील एका विषयावर आपणही पीएचडी करण्यास हरकत नाही.

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणार्या रेल्वेची ओळख फार लहानपणीच झाली.  त्यावेळी आणि आतापण हा प्रवास फारसा सुखकारक आहे असे कधी वाटले नाही.  दिवाळीला बाबांच्या ऑफिसमधे लक्ष्मीपूजेसाठी आम्ही जात असू, त्यावेळी कांदिवली ते चर्नी रोड हा तासभराचा प्रवास कधी संपेल असे वाटे. कंटाळा येई.  शाळेत असताना एकदा मी फर्स्ट क्लास ने प्रवास केला होता. टिकिट मात्र सेकंड क्लासचे होतं. त्यावेळी फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास काही माहित नव्हतं.  स्टेशनला टीसीने पकडलं आणि विचारलं 'टिकिट' ,  मग मी सेकंड क्लासचं टिकिट दाखवताच त्याने विचारलं की 'फर्स्ट क्लासने कशाला आलास?' मग मी  विचारलं की "फर्स्ट क्लास म्हणजे काय?" त्या बिचार्याला माझ्या अज्ञानाची दया आली असावी. त्याने मला सोडून दिलं.

कॉलेजमधे असताना पहाटे ५. ३० ची लोकल पकडायला लागायची. सातच्या ठोक्याला एप्रन घालून लॅबमधे हजर असलच पाहिजे असा दंडक होता.  उशीरा येणार्याना  कुलकर्णी सर अशा नजरेने पाहत की, अख्या वर्गात आपण 'होपलेस' आहोत आणि आपण रसायनशास्त्रावर काळिमा आहोत असे वाटे. सोबतीला आणखी एक जण असल्यावर हा काळिमा आणि होपलेस'पणा वाटून घेतल्यासारखे वाटे.  सकाळची ही लोकल सुटली की दहा मिनिटे थांबावे लागे.  पुलं म्हणतात तसे मुंबईकराचे घड्याळ हे त्याच्या नशिबालाच बांधलेले असते. 
नेहमीची लोकल चुकल्यानंतरचे दुःख फ़क्त मुंबईकरालाच अनुभवता येईल.  भल्या पहाटे देखील बसायला थर्ड सीट किंवा किमान चौथी सीट मिळणे कठीण. अशा वेळी ज्यांना विंडो सीट मिळते त्यांच्या नशिबात चांगले ग्रह असावेत.   सकाळच्या गर्दीच्या वेळी धावत्या ट्रेन मधे चढणार्याचे कसब पाहून कौतुक वाटे.

लोकलच्या या गर्दीतही ग्रुप असतात. रोज रोज एकाच ट्रेनने जाणारे अनोळखी चेहरे हळू हळू एकमेकांना नावाने ओळखू लागतात.  "आपला माणूस" म्हणून त्याच्यासाठी जागा धरली जाते.  त्याला  निदान नीट उभं राहायला मिळावं अशी अपेक्षा असते.  मग या जागा अडवून ठेवण्यावरून भांडणे होतात.  क्वचित प्रसंगी मारामारी होते.  इथे लोक ग्रुपने मार खातातही आणि मार देतातही ! इथे बहुतेक सर्व सण साजरे केले जातात.  एकमेकांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले जाते.  वयानुसार प्रत्येकाची यथोचित थट्टा मस्करी पण होते.  गटारीचे प्लान बनवले जातात, कधी कधी वडे समोसे आणले जातात.

या तास दीडतासाच्या प्रवासात काही भजनी मंडळी कोकलून इतर प्रवाशांचा जीव खातात.  निवडक काही अप्रतिम गाणारे असतात.  बाकी नुसता टाहो.  काही दिवसांपूर्वी विरार लोकलच्या लेडीज़ डब्यात एका बाळाचा जन्म झाला, तेव्हा लोकांना कोण आनंद ! गाडी वीस मिनिटे स्टेशन वर थांबली तरी एरवी सेकंदासाठी कुरबुरी करणार्या कुणीही तक्रार केली नाही. 

माधवनचा 'रहना है तेरे दिल में' आठवतोय ? त्यात तो दिया मिर्ज़ाचा हात हातात घेऊन तिचे भविष्य सांगताना म्हणतो की, "तेरे हातों में लम्बी रेखाएं नहीं है, सब लोकल ट्रेन की पटरियां ही है" किंवा लोकलच्या दरवाज्यात उभा राहून राणी मुखर्जी वर लाइन मारणारा 'साथिया'तला विवेक ओबेरॉय, शेवटची लोकल चुकल्यामुळे अनपेक्षित प्रसंगाना सामोरे जावे लागणारा 'एक चालीस की लास्ट लोकल ' मधला अभय देओल असो.  बॉलीवुडने लोकल ट्रेनला कथावस्तूचा एक भाग म्हणून स्वीकारलय.  'ह्यूगो' नावाच्या हॉलीवुड चित्रपटात तर रेल्वे स्टेशन वरच सर्व महत्वाच्या घटना घडतात.

विजय तेंडुलकरांची 'झपूर्झा' नावाची श्रुतिका आहे.  त्यात त्यांनी बॅकग्राउंडला लोकल ट्रेनचा प्लॉट घेतलाय. संध्याकाळी घरी परतणारा म्हातारा त्याच्या मनातले विचार, त्याचे कुटुंब, ट्रेनमधले प्रवासी या सर्वांचा त्यांनी ज्या शैलीने मिलाफ केलाय.. मानना ही पडेगा !!  ती श्रुतिका उत्तरोत्तर मनावर असा ताबा मिळवते की त्या ट्रेनमधील त्या कम्पार्टमेंट मधे आपणच आहोत असे वाटते.  वपुंचे 'कर्मचारी' पुस्तक लोकलकथांनी भरलेले आहे.

मुंबईवर जेव्हा दहशती हल्ला झाला तेव्हा लोकल ट्रेन्समधली निरागस माणसे हकनाक मारली गेली.  ते भयाण दिवस विसरणे कधीही शक्य नाही. पण या सर्व संकटांतूनही माणसे पुन्हा उभी राहिली.  पुन्हा जीवावर उदार होऊन स्टीलचा रॉड पकडत ऑफिसला जाऊ लागली.  "स्पिरिट ऑफ़ मुंबई"चे गोडवे गायले गेले, पण या सर्व धैर्यामागे शूरपणा नव्हताच. होती ती फ़क्त अगतिकता. एक दिवस कामावर गेलो नाही तर पगार बुडेल किंवा काहींच्या बाबतीत घरी चूलच पेटणार नाही ही परिस्थिती.

कष्टकर्यांच्या मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणार्या अस्सल मुंबईकराला अजूनही 'विंडो सीट'चच स्वप्न पडतं.

मंगळवार, ११ मार्च, २०१४

कथालेखन वगैरे

मरीन ड्राइवला पोचलो तेव्हा सहा वाजले होते. आणखी अर्ध्या तासात काळोख पडेल. वर्दळ नेहमीसारखीच.  मस्तपैकी जागा पकडली पाहिजे. निदान जवळपास डिस्टर्ब करणारं - काय करतोय म्हणून डोकावून पाहणारं कुणी नको. आज कुठल्याही परिस्थितीत रणजीतला कथेचा फर्स्ट ड्राफ्ट दिला पाहिजे.  गेला आठवडाभर आज देतो, उद्या देतो, कंटेंट रेडी आहे फ़क्त कागदावर उतरवायचय, उद्या पक्का - असं करून त्याला टाळत आलो. आणि आज सकाळी पावणे पाचला  त्याचा SMS आला की, 'I knw..u hvnt wrttn anythin..i'll KILL u'. सकाळी नऊला उठलो तेव्हा कुठे तो पाहिला.  मग अर्धा तास दात घासत, एक तास बाथरूममधे अंघोळ करताना आणि त्यानंतर १२ पर्यंत डोरेमॉन बघत काय लिहावं याचाच विचार करत बसलो आपण.  तरी काहीच srtike होत नव्हतं. रणजीतला हवीय एक लव स्टोरी.  मग त्यात पाणी घालून तो एकांकिका बनवणार किंवा अगदीच नाही जमलं तर शॉर्ट फ़िल्म.  त्याच्या अपेक्षाही भन्नाट असतात.  'अजून कुणालाही सुचली नसेल अशी प्रेमकथा लिही... रोजरोजचं नको त्यात...बस स्टॉप, ट्रेनमधली ओळख... मग ओळखीचं रूपांतर प्रेमात अशी रटाळ स्टोरी नकोच... काहीतरी फ्रेश हवं आणि सगळ्यांना अपील होणारं....' . एवढ सगळं हवय आणि ते पण सामान्य माणसाच्या बाबतीत. अशक्य ! आता इतक्या वर्षांत लोकं त्याच त्याच पध्दतीने प्रेमात पडत असतील तर आपण काय करणार ? CCD ला जाऊन कॉफ़ी पीत पीत  लिहूया असं ठरवलं दुपारी. कुणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी दीपक घेईल.  पण किती वेळ टेबल अडवून बसणार? आणि कुणी ओळखीचं भेटलं तर औपचारिक बोलावं लागणार.  त्यात आणखी वेळ जाणार.  त्यापेक्षा 'समुद्रकिनारी' खारे दाणे खात बसू.
आणि असा प्लान ठरला.

कठडयावर मांडी घालून बसलो, चपला नीट काढून पायाखाली घेतल्या.  बॅगेतून डायरी काढली.  दहा वेळा रिफिल बदललेलं montex चं लकी पेन.… त्याला एकदा ओठाला लावलं.  समोरच्या समुद्राकडे लॉन्ग पॉज घेऊन पाहिलं.  एक खोल दीर्घ श्वास आणि कागदावर लिहिणार तोच खांद्याला कुणी तरी हात लावला - "भाईसाब कुछ पैसा देगा?" एक सत्तर वर्षांची म्हातारी माझ्या बाजूला बसलीय.  पोशाखावरुन कॅथलिक वाटतेय.  चेहर्यावर सुरकुत्या आहेत.  बोलताना गाल आत ओढले जाताहेत.  केस पांढरेफटक.  ती पुन्हा म्हणाली "मेरा कोई नहीं है।  सब मर गया।  कुछ पैसा देगा?".
मी भिकार्यांना पैसे कधीच देत नाही.  म्हणजे आधी द्यायचो.  पण काही महिन्यांपूर्वी मंडळाच्या व्याख्यानमालेत एका समाजसेविकेचे लेक्चर ऐकले.  तिच्या मते भिकार्यांना पैसे देण्यापेक्षा खायला काही तरी द्या. बिस्किटचा पुडा द्या.  तिने इतक्या पोटतिड़कीने सांगितलं की, मी माझ्या बॅगेत पारले ग्लुको बिस्किटचे छोटे पुडे ठेऊ लागलो.  आला भिकारी की दे बिस्कीट.  एकदा एका लहान मुलाला तो पुडा  देताना त्याने सांगितलं "हम ये नहीं खाताय, क्रीम का दो ना".  मुलं ती मुलंच. रणजीतला ही गोष्ट सांगताच त्याने याच थीमवर शॉर्ट फ़िल्म केली.  त्या लहान मुलांचे कुरतडलेलं बालपण हास्याचा विषय होऊ नये असचं मला वाटत होतं.
त्यानंतर मी भिकार्यांना काहीच देत नाही. आपोआप ते कंटाळून पुढे जातात.
तरी पण त्या म्हातारीला म्हटलं 'पैसा नहीं है, कुछ खाओगी?"  तिने नकारार्थी मान हलवली. मग मी नायक आणि नायिका कुठे भेटतील या विचारात गुंतलो.  शाळा- कॉलेज - हॉस्पिटल - लाइब्रेरी - नाट्यगृह - चौपाटी - कॉमन भेळवाला.  किंवा असं केलं तर.… नायक आणि नायिका एकमेकांना फेसबुकवर ओळखतात चेहर्याने.
माझ्या बाजूला बसलेली म्हातारी दर थोड्या वेळाने बाजूच्या कपल्सकडे, इवनिंग वॉकला आलेल्यांकडे पैसे मागत होती "भाईसाब कुछ पैसा देगा?" हे वाक्य सारखं कानावर पडत होतं.  एकाने म्हातारीला सांगितल "आप मुझे बताओ आपकी कहानी'. मग म्हातारीने तेच "मुझे कोई नहीं है, अकेली हुँ, कुछ पैसा दोगे? दस रूपया?" हे सांगायला सुरवात केली.  त्या गृहस्थाने सर्व शांतपणे ऐकलं आणि तसाच निघुन गेला.  मग म्हातारीने तोंडातल्या तोंडात त्याला काही शिव्या दिल्या.

नायक आणि नायिका एकमेकांना भेटायचं ठरवतात.  पहिल्यांदाच भेटणार असतात.  वातावरण निर्मिती  करता येईल. कॉफ़ी शॉप की क्रॉसवर्ड ? क्रॉसवर्ड डन्.
माझ्या बाजूला बराच वेळ पासून एक माणूस फोन वर बोलतोय. ऐकायला स्पष्ट येतेय.
"जी मै मुकुल बात कर रहा हुँ। कपूर जी कैसे हो आप? पहचाना? सर मैं ऑडिशन के लिए आया था।  आपने कहा था, कुछ काम होगा तो बतावोगे।…जी सर, कल ही आये हो बैंगकॉक से ? कैसे रही आपकी ट्रीप ? जी बिजी हो.....ok सर कुछ काम हो तो बता दीजिये। …जी यही नंबर है मेरा।  बाय सर have a good day. "
मग दूसरा फ़ोन कॉल.
"जी क्या मैं शर्माजी से बात कर सकता हुँ? सर, मैं मुकुल, सेट पे मुलाकात हुई थी।  आपने कहा था कुछ काम होगा तो बतावोगे? हा..सर कैसी है अभी आपकी तबियत, ठीक है सर बाद में बात करेंगे। "
या संवादावरुन आणि वाक्यावाक्यागणिक टपकणार्या नम्रतेतून हे स्पष्ट कळत होतं कि ही व्यक्ती स्ट्रगलर आहे.
 मग आणखी काही फोन कॉल्स. तीच नकारघंटा. तो उदास चेहर्याने निघुन गेला.
नायिका शाळेत शिकवत असते. आपल्या नायिकेसाठी नायक एक नाटुकले लिहून देतो.  नायिका लहान मुलांना घेऊन ते नाटक बसवते. मग या सर्व घडामोडीत ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.
पुढे?
पुढे?
लग्न?
की इथेच शेवट करावा?
चटपटित संवाद नंतर लिहिता येतील. ब्लू प्रिंट ओकेय. पण तितकिशी भिड़त नाहीय मनाला.
ती म्हातारी कुठे गेली? आता तर इथे होती. 

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

उगाच हळहळते आपली शाई

सहावीत असतानाची गोष्ट. मराठीचा तास चालू होता. बाई सावरकरांची 'सागरा प्राण तळमळला' ही कविता शिकवत होत्या. सगळ्यांची डोकी बाकावरील पुस्तकांत होती. बाईंचा तसाच आदेश होता. या कवितेच्या पानावर निळ्या हिरव्या रंगातला समुद्र होता. वर्गात फ़क्त बाईंचाच आवाज घुमत होता. शेजारचा मित्र वर्गात असून नसल्यागत. त्याची छान समाधी लागलेली. मागे जरा वळून पाहिलं, मागच्या बाकावरचे पण समाधीत गुंतलेले.
बाई कविता शिकवताहेत. मुलं कठीण शब्दांचे अर्थ समासात लिहिताहेत. खिडकीतून येणार्या उन्हाची एक तिरिप कंपासपेटीवर पडलीय. अचानक खट  सारखा आवाज येतो अन धपदिशी काहीतरी माझ्या पुढ्यात पडतं.  त्या आवाजाने वर्गाची तंद्री भंगते. सगळे काय झालं म्हणून एकमेकांकडे पाहू  लागतात. माझ्या समोरील पुस्तकावर चिमणी मरून पडलेली असते. रक्ताचा एक मोठा ठिपका पानावर पडलेला असतो. रक्ताचे काही डाग कुणाच्या तरी यूनिफार्मवर उडालेले असतात.  एकंदरीत खिडकीतून आलेली एक चिमणी छताच्या पंख्याच्या तावडीत सापडून निष्प्राण झालेली असते.  एव्हाना माझ्या अवतीभोवती मुला-मुलींची गर्दी जमा होते.  शेजारी बसलेल्या मित्राची झोप खाडकन् उतरलेली असते. मग चारी बाजूंनी 'च्यक च्यक' सुरु होते. बाई गर्दीतून वाट काढत माझ्या बाकाजवळ येतात. मेलेल्या चिमणीला पाहतात अन् वर्गातील मागच्या बाकावरील धाडसी मुलाला तिला बाहेर फेकून यायला सांगतात. तो मुलगा मग ते पुस्तक सांभाळून उचलतो आणि वर्गाबाहेर पडतो मग वर्गाबाहेर जाता जाता मधल्या रांगांमधले आणि ज्यांना मेलेली चिमणी पाहता आली नाही ते तिला शेवटचं पाहण्याचा प्रयत्न करतात.
वर्ग परत सुरु होतो. माझं लक्ष आता उडालेलं. मी वरती पंख्याकडे पाहतो. तो गरगर फिरत असतो. माझं डोकं पण गरगरायला लागतं.  पुढचे दोन दिवस मी कुणाशीच फार बोलत नाही. इतक्या जवळून मृत्यू पाहण्याची ही पहिलीच वेळ.

त्याच वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी होतो. आजीची दुभती म्हैस आजारी होती. चार दिवस तिने चारा पाणी काहीच शिवलं नाही. एखादं माणूस आजारी असावं असं शोकाकूल वातावरण घरी होतं.म्हैस काही वाचणार नाही हे ही सगळ्यांना कळून चुकलेलं. अन् ती रात्रीच केव्हातरी वारली. आम्ही सगळे गाढ झोपेत होतो. अन् सकाळी जाग आली ती आजीच्या किंकाळीने. लहान होतो. आजी का रडतेय हे सुरुवातीला कळलं नाही. नंतर मेलेल्या म्हशीला पाहून कळलं. आजीच्या डोळ्याला पाण्याच्या नुसत्या धारा लागल्या होत्या. लहानशी चिमणी मरते तशी इतकी मोठी म्हैसपण मरते तर ! हालचाल थांबली, श्वास थांबले म्हणजे मृत्यू असंच असले पाहिजे. पण ही काहीतरी हरवल्याची जाणीव कसली? लोकं का रडतात?

शाळेच्या थोडं पुढे मुसलमानांच कब्रस्तान होतं. त्याला लागूनच खदान. त्यात आम्ही शाळा सुटल्यावर क्रिकेट खेळायचो.  कब्रस्तानमधले हे उंचवटे कसले, ही उत्सुकता होती. मित्राने सांगितलं, माणूस मेला की त्याला इथे पुरतात. पण जोपर्यंत डोळ्याने पाहत नाही तोवर विश्वास कसा ठेवायचा? एकदा खेळताना  कब्रस्तानमधे गर्दी दिसली, काहीतरी खांद्यावरनं आणलेलं दिसलं. मग खेळ तसाच ठेवून आम्ही सगळे जमलो अन् चर्चेतून कळले की कुणीतरी मेलयं. खेळ संपल्यावर संध्याकाळी वाट चुकवून आम्ही तिथे पोचलो. त्या उंचावट्यावर फुलांची चादर होती. असाच प्रकार एकदा शाळेतून घरी जाताना दिसला पण यावेळी माणसाला पांढरया कपड्यात गुंडाळून खांद्यावरुन नेत होते. आई माझ्यासोबत होती. तिने बजावलं की असं काही दिसलं की लांब उभं राहायचं. आणि नमस्कार करायचा. आईला प्रश्न विचारण्याचं धाडस झालच नाही तेव्हा. मग हिन्दुंमधे मेलेल्या माणसाला जाळतात हे पुढे कळलं. शाहरुखचा 'कुछ कुछ होता है' मधे सुरुवातीस राणी मुख़र्जीच्या दहनाचा सीन आहे, तेव्हा तीही शंका फिटली पिक्चर पाहून.

काही जवळच्या, काही शेजारच्या व्यक्तींचं अकाली जाणं पाहिलं. त्यांच्या जाण्याने होणारं दुःख अनुभवलं आणि हे सर्व निसर्गनियमाचा भाग आहे, जाणारा जातोच त्याला परत नाही आणता येत इत्यादि सांत्वन करणारं तत्त्वज्ञान कधी पिंडाचा भाग होऊन गेलं कळलं देखील नाही.  मन कोरडं नाही झालं हे नशीब.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. सकाळची दादर फ़ास्ट ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मला उभा होतो. गाडीला यायला तीन मिनिटे अवकाश होता म्हणून थोडं चालत जाऊया पुढे म्हणून प्लेटफार्मवर चालत होतो. गर्दी होती थोडीशी. अचानक मधे कबूतराचं पिल्लू तडफडत पडलेलं होतं. प्लॅटफॉर्मवरच्या पत्र्यांमधल्या पोकळीत कबूतराचं घरटे होते. बॅगेतून टिश्यू पेपर काढला आणि त्याला अलगद उचलून कोपर्यात नेलं. बारिकशी चोच हालत होती. पाण्याच्या बॉटल मधलं थोडस पाणी करंगळीने त्याला पाजलं. एव्हाना लोकं कुतूहलाने पाहत होतीच माझ्याकडे. ट्रेन आली. थोड्या वेळाने ते मेलं. त्याला आणखी एका टिश्यू मधे गुंडाळून कोपर्यात कुणाचाही पाय लागणार नाही असं ठेवलं. एवढ्यात माझे हे सर्व उद्योग बघणार्या एकाने असही म्हटले कि "पंछी चुतिया होते है किधर भी घोंसला बनाते हैं".  माझी ट्रेन एव्हाना सुटली होती  दूसरी ट्रेन कुठली लागलीय हे पाहूया म्हटलं. हे इंडिकेटर पण जाम मिजासखोर. थोड्या वेळाने मागे वळून जिथे पिल्लू ठेवलय तिथे पाहिलं तर त्या पिल्लाजवळ एक कबूतर येऊन थांबलं होतं. त्याचच पिल्लू असावं बहुतेक.  आप्त स्वकीयाच्या  मरणाचं दुःख पशू पक्षांनापण होतं असावं.
संजय चौधरीची ओळ आठवली एकदम 'जाणारा जातोच, थांबवता येत नाही.. पण उगाच हळहळते आपली शाई'

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०१४

द परसूट ऑफ़ हॅप्पीनेस

   
२००६ साली आलेला 'द परसूट ऑफ़ हॅप्पीनेस' हा सिनेमा नुकताच  पाहिला आणि  प्रचंड आवडला. साधी सोपी गोष्ट.  चित्तथरारक असे एक्शन आणि एडवेंचर नाही. पाहताक्षणी मनाला पटणारा आणि भिडणारा. विल स्मिथ हा ताकदीचा नट. याआधी मोहम्मद अलीच्या बायोपिक मधे त्याने भूमिका केली होती आणि MIB च्या मालिकांत तो असतोच.
     आपल्या आयुष्यातील सर्व संपत्ती  'बोन डेन्सिटी स्कॅनर' नामक एका मशीनच्या वितरणात खर्ची घातलेल्या ख्रिस गार्डनर (विल स्मिथ)ची ही गोष्ट.  बोन डेन्सिटी स्कॅनर ही मशीन हाड़ांचे अधिक परिणामकारक चित्र देते, पण सध्याच्या एक्स रे मशीन पेक्षा दुप्पट महाग असते. त्यामुळे बहुसंख्य डॉक्टरांना हा खर्च विनाकारण आहे असं  वाटतं. कुठल्याही परिस्थितीत महिन्याला किमान ३ मशीन विकणं हे त्याला चरिथार्थ चालवण्यासाठी आवश्यक आहे. त्याला सतत किटकिट करणारी बायको आहे, एक लहान मुलगा (ख्रिस्तोफर) आहे. एकंदरीत  त्रिकोणी कुटुंब.  आपण जबाबदार बाप बनण्याचे तो हरघडी प्रयत्न करतोय.
         हल्ली नवरा बायकोच्या नातेसंबंधात तणाव आहे.  त्याला मुख्य कारण म्हणजे ख्रिसला सेल्स मधे सतत येणारं अपयश. त्याला पार्किंगचे टिकिट्स भरता न आल्याने वाहतुक विभागवाले त्याची गाडी उचलून घेऊन जातात. घरमालकाचे भाडे थकलेले असते. कर भरण्यासाठी सरकार दरबारातून बर्याच नोटिशी घरात पडलेल्या असतात. सकाळी दोन्ही हातात एक एक अशा मशीन घेऊन तो त्याच्या मुलाला पाळणा घरात सोडतो.  त्यानंतर वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधे मशीन विकण्यासाठी डॉक्टरांच्या मुलाखती सुरु.  डॉक्टरांची अपेक्षाभंग करणारी उत्तरे.  या सर्वांतून संध्याकाळी बायकोचं तिरसट बोलणं, असा त्याचा नेहमीचा दिनक्रम.
       एकदा असंच वॉल स्ट्रीटवरून चालताना एका गगनचुंबी इमारतीकडे तो पाहत असतो. बाजूला एक श्रीमंत दिसणारा  गृहस्थ लाल पोर्शे पार्क करतो. ख्रिस त्याला विचारतो की तू हे कसं केलस आणि आणि तू काय नेमकं  करतोस? तो उत्तर देतो की तो स्टॉकब्रोकर आहे.  ख्रिसला या हलाखीच्या आयुष्याचा कंटाळा आलेला असतो, तो ठरवतो की असं काही तरी करावं. जॉब बदलाच्या त्याच्या निर्णयाला त्याच्या बायकोकडून अपेक्षेप्रमाणे कडवट प्रतिसाद मिळतो.
   त्याच दरम्यान एक स्टॉक ब्रोकिंग फर्म इंटर्नशिपसाठी उमेदवार घेत असते. सहा महिन्यांची इंटर्नशिप. शेकडो अर्जापैंकी वीस जणांनाच निवडणार आणि त्या वीस जणामधून एकाचीच नोकरी पक्की होणार. ख्रिस पण इंटर्नशिपचा अर्ज भरतो.  एकदा इंटर्न रिक्रूट करणारा HR  मॅनेजर -ट्विसल टॅक्सीची वाट पाहत असतो त्या वेळी ख्रिस  "मला पण त्याच ठिकाणी जायचे आहे" असे सांगून त्याला घरापर्यंत टॅक्सीतून लिफ्ट देतो. काही करून त्याला ही संधी गमवायची नसते. या प्रवासात तो रूबीक क्यूब सोडवून  दाखवतो आणि आपण बुद्धिमान आहोत हे सिद्ध करतो पण त्याच्याकडे टॅक्सीचे पैसे भरण्याइतपत पैसे नसतात. मग टॅक्सीवाल्याला बरेच फिरवून एका ठिकाणी तो टॅक्सीतून पळ काढतो. टॅक्सीवाला त्याच्या मागे ओरडत पळत असतो. शेवटी ख्रिस त्या टॅक्सीवाल्याकडून स्वताची सुटका करुन घेतो. या गडबडीत तो एक मशीन गमावतो. एक मशीन म्हणजे एका महिन्याचं राशन.  तो घरी उशीरा येईल असे सांगण्यासाठी फोन करतो तेव्हा त्याची बायको आपण घर सोडून चाललो आहोत असे सांगून त्याला आणखी मानसिक संकटात टाकते. ख्रिस तरीही ठामपणे बायकोला बजावतो कि त्याचा मुलगा ख्रिस्तोफर त्याच्याचसोबत राहील. अशा वेळी त्याला थॉमस जेफेरसनने अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्यात लिहिलेल्या "प्रत्येकाला जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि सुखाचा शोध घेण्याचा अधिकार आहे" या वाक्याची आठवण होते त्याला राहून राहून  प्रश्न पडतो की जेफेरसनने 'सुखाचा शोध' असं का म्हटलं असेल ? सुखाचा फ़क्त शोधच घेता येतो का ? खरोखर सुखासारखं  काही असतं का? सुख म्हणजे नक्की काय असतं?
      घरी आल्यावर बायको आणि मुलगा दोघेही घरी नसतात. बायको मुलाला घेऊन घर सोडून गेलेली असते. त्याचं मन नैराश्याने भरुन जातं. अशा वेळी ट्विसल (HR  मॅनेजर) त्याला फोन करुन  सांगतो की, त्याला उद्या ऑफिसमधे येऊन भेट- तो इंटर्नशिपसाठी सिलेक्ट झालाय. इथे  एक लोच्या असतो की या इंटर्नशिप दरम्यान कुठलेही मानधन मिळणार नसते, आणि सहा महिन्यांनंतरही नोकरीची हमी नसते, काय करावं आता? ख्रिस ही संधी स्वीकारतो.
    मग त्याचा अत्यंत खडतर असा प्रवास सुरु होतो. सकाळी उठून मुलाला पाळणा घरात सोडणं, त्यानंतर इंटर्नशिपवर, मग मशीन विकण्याचा प्रयत्न करणं संध्याकाळी परत येताना ख्रिस्तोफरला घरी आणणं. अशातच घरमालक भाड़े वेळेवर देता न आल्यामुळे त्यांना घराबाहेर काढतो, त्याचे बँक अकाउंट्स सरकारकडून गोठवले जातात. ख्रिस पुरता कफल्लक होतो  ख्रिसला आपल्या मुलासोबत एक रात्र रेल्वे स्टेशनवरील बाथरूममधे काढावी लागते. आता राहण्याचा मोठा प्रश्न उभा राहतो. त्याला कळते की एका चर्च मधे राहण्याची व्यवस्था होऊ शकते पण फ़क्त मर्यादित लोकांसाठीच. मग वेळेशी लढाई सुरु होते. इंटर्नशिप संपल्या संपल्या ख्रिस्तोफरला घेऊन चर्चजवळ रांगेत उभे राहवे लागे. जरा उशीर झाला तर रात्र उघडयावर काढावी लागेल ही भीती सदोदित मनी असे. आपण कफल्लक झाले आहोत हे तो ऑफिस मधे कुणालाच कळू देत नाही. एकदा त्याच्या बॉसकडे टॅक्सीवाल्याला द्यायला सुट्टे पैसे नसतात, तेव्हा पाच डॉलर उसने देतो.  पाच डॉलरही त्याच्यासाठी फार मोठी रक्कम असते त्यावेळी. ख्रिस त्याच्या इंटर्नशिप च्या काळात खूप शिकण्याचा प्रयत्न करतो. एकदा तर नियमांना डावलून एका बड्या कंपनीच्या CEO ला फोन करतो आणि गुंतवणुकीसाठी वेळ मागतो, त्या CEO सोबत एका रग्बी मॅचला जाऊन आपले कॉन्टेक्ट्स वाढवतो.
     अशातच त्याला त्याची हरवलेली एक मशीन सापडते. त्या मशीनला एक वेडा 'टाइम मशीन' असे मानत असतो. त्याच्याकडून तो ती परत घेतो, तिचे काही भाग मोडलेले असतात. तिला दुरुस्त करण्यासाठी पैशांची गरज असते. ख्रिस रक्तदान करून पैसे कमावतो आणि ती दुरुस्त करतो. त्या मशीनला विकून अडीचशे डॉलर मिळतात. आणखी काही दिवसांचा प्रश्न मिटतो. असे करता करता सहा महिने होतात. अंतिम परीक्षा पार पडते.
इंटर्नशिपच्या शेवटच्या दिवशी त्याचा बॉस त्याला केबिन मधे बोलावतो. ख्रिसने नविन शर्ट घातलेला असतो. तो त्याला म्हणतो की त्याने हाच शर्ट उद्या पण  घालावा. स्टॉक ब्रोकर म्हणून कामाच्या पहिल्या दिवशी. त्याची निवड झाल्याबद्दल तो त्याचे अभिनंदन करतो. ख्रिसला त्याचे अश्रु आवरत नाहीत. तो धावत पाळणाघरात जाऊन ख्रिस्तोफरला मिठी मारतो. आता त्याला कळतं सुख म्हणजे नेमकं काय!
     चित्रपटाच्या नावातील हॅप्पीनेसची स्पेलिंग जाणीवपूर्वक चुकीची लिहिलीय ख्रिस्तोफरच्या पाळणाघराजवळील भिंतीवरील ग्राफिटीवरुन ती घेतलीय. कुठल्याही परिस्थितीत स्वत: वर विश्वास ठेवायला हवा असा संदेश कुठल्याही उपदेशाचा बडेजाव न आणता हा चित्रपट देतो. चित्रपटात एके ठिकाणी ख्रिस आणि त्याच्या मुलाचा संवाद आहे तो  खूप प्रेरणादायी आहे "Hey. Don't ever let somebody tell you... You can't do something. Not even me. All right?"
Christopher: All right.
Christopher Gardner: You got a dream... You gotta protect it. People can't do somethin' themselves, they wanna tell you you can't do it. If you want somethin', go get it. Period."
    ख्रिस पुढे जाऊन एक यशस्वी स्टॉक ब्रोकर बनतो. या चित्रपटाची कथा ख्रिस गार्डनर यांच्या आयुष्यावरून घेतलीय. एकदा पहावाच असा हा चित्रपट आहे.

बुधवार, १५ जानेवारी, २०१४

पिंक फलॉयड द वॉल


कथेचा नायक पिंक. तो पाळण्यात असतानाच त्याचे वडील वारले. दुसर्या महायुद्धात मरणार्या सैनिकांपैकी एक त्याचे वडील. आपलं मरण जवळ आलय हे कळताच ते बैचैन झालेले.  तार करता करताच बॉम्बच्या हल्ल्यात जीव गमावला. आजूबाजूला तसेच शेकडो सैनिक पडलेत. निर्जीव.

तो बागेत खेळतोय. त्याला गोल गोल फिरणार्या पाळण्यात बसायचय. झोपाळ्यावर बसायचय. पण इतर मुलांसारखे त्याच्यासोबत त्याचे वडील नाहीत. तो कुठल्यातरी माणसाचा हात पकडतो व त्याच्यासोबत चालतो, तो माणूस हयाला झिडकारतो. हा घरी येतो. वडिलांच्या आठवणी असलेल्या काही वस्तू कपाटातून काढतो. त्यात त्यांचा सैनिकी वेषातला एक फ़ोटो , मेल्याबद्दल मिळालेलं एक मेडल व प्रशस्तीपत्रक आहे. त्याच्या जरासं बाजूला एक पिस्तूल आहे. काही बंदुकीच्या गोळ्या आहेत. तो त्यातील एक गोळी उचलतो आणि मित्रांसोबत बोगद्याजवळच्या रेल्वे ट्रॅक वर येतो. ती गोळी रेल्वे ट्रॅक वर ठेवतो. गाडी जवळ येते. ड्राईवर भोंगा वाजवतो. मित्र त्याला 'बाजूला हो' म्हणून ओरडत असतात. हा मात्र तल्लीन होऊन ती गोळी नीट ट्रैक वर ठेवतो व लगेच बाजूला जातो.  गाडी गोळीवरुन जाते आणि फुटते. त्याला आगगाडीच्या डब्यांतून युद्धकैदी जात असल्याचा भास होतो.  ते युद्धकैदी खिडकीतून हात बाहेर काढून वाचवण्याची आर्जवे करताहेत असं त्याला दिसतं.  हे सारे त्याच्या मनाचे भास !!

शाळेत अभ्यास न करता कविता करतो म्हणून शिक्षक त्याचा वर्गासमोर अपमान करतात.  त्याला वाटतं ही शाळा नाहीये तर एक असेंबली लाइन आहे आणि ही मुले म्हणजे एकाच बनावटीचे पुतळे. ज्यांच्या चेहर्यावर कुठलेही भाव नाहीत. ज्यांना कुठलेही स्वतंत्र विचार नाहीत. असेंबली लाइनवर चालताहेत आणि अल्टीमेट प्रोडक्ट म्हणून हातात डिग्री घेऊन बाहेर पड़ताहेत.  हे सारे त्याच्या मनाचे भास!!
 हीच मुले पुढे एका मोठया मिक्सरमधे कुस्करली जाताहेत. त्यांच्या मांसापासून हैमबर्ग बनवले जाताहेत. आणि अचानक ही मुले या व्यवस्थेविरुद्ध उठाव करतात. मोडतोड. हे सारे त्याच्या मनाचे भास !!

वडील लवकर गेल्याने आई त्याच्या बाबतीत फार काळजी करते . तो तिच्या या काळजीने आणखी कोमेजलाय.  तो आता एक नावाजलेला गायक आहे. सतत दौरे चालू आहेत. पुढे त्यात भर पडते ती अयशस्वी लग्नाची.  बायकोच्या प्रेमप्रकरणामुळे त्याला तिचा प्रचंड राग येतो. त्याला शरीरसुखाची घृणा वाटते.  तो स्वतःला एका खोलीत बंद करतो. बाहेरच्या जगापासून अलिप्त. त्याला वाटतं, तो लहान बनलाय आणि आता युद्धभूमीवर आहे रक्त आणि चिखलाने माखलेली जमीन आहे, प्रेतांचे पाट भरलेत, एका सैनिकाची गोळ्यांनी छिन्न झालेली छाती... त्यातून रक्त वाहतेय.  तो त्यावर कापड टाकतो.  हे सारे त्याच्या मनाचे भास!

तो अंगावरचे सर्व केस भादरतो. भुवयापण. त्याला सतत असं वाटतं की तो एका भिंतीत बंदिस्त आहे. तो भिंतीवर हात आपटतो. "कोण आहे का पलीकडे?" असं जोरजोरात ओरडतो. तिकडून काही उत्तर येत नाही.
तो निपचित पड़ून राहतो. त्याच्या मैनेजरला कुठल्याही परिस्थितीत शो करायचाय, तो त्याला ड्रग्स देऊन स्टेज वर उभा करतो. अंगात किडे वळवळताहेत असं त्याला वाटतं. शो मधे हा स्वतःला हुकुमशाहा समजून लोकांना हिंसेची चिथावणी देतो. प्रेक्षक भारले जाऊन हिंसक आंदोलन करतात. हा पोलिसांपासून वाचण्यासाठी  बाथरूममधे लपतो. बाथरूममधे कविता वाचत बसतो. हे सारे त्याच्या मनाचे भास !!

आणि एकदाची ती भिंत जमीनदोस्त केली जाते. सगळीकडे ढिगारा आहे आणि लहान मुले काहीतरी शोधताहेत. एक लहान मुलगा खेळण्यातील ट्रक घेऊन उभा आहे.  ढिगारा उपसतोय. त्यातील शाबूत विटा खेळण्यातील ट्रकवर लादून चालतोय. भिंती बांधण्याचं कौशल्य मानवजातीच्या रक्तातच असावं बहुतेक.

गेले काही दिवस या चित्रपटाने झपाटलं आहे  अजून तरी शब्दात नीट पकडता  येत नाहीय त्याची भयाणता.

गुरुवार, ९ जानेवारी, २०१४

दृष्टी

विरार रेल्वे स्टेशन वर फलाट क्र. १ च्या पुढे फलाट क्र ६ व ७ सुरु होतात. डहाणूला जाणार्या मेमू  इथून सुटतात. तासाभराच्या अंतराने गाडी सुटत असल्याने लोकांना फलाटावर असलेली गाडी पकडणे गरजेचे  वाटते.  नाहीतर मग पुढल्या मेलची वाट पाहावी लागते . गाडी सुटायच्या वेळी  तर जी धांदल उडते ती पाहण्यासारखी असते. गावी चाललेली मंडळी बाजाराचे सामानाचे गाठोडे डब्यात कोंबत असतात.  कुणाचे हमालाशी वाद चाललेले असतात, गाडी सुटणार म्हणून भेळवाल्याकडून कुणाला पटकन भेळ हवी असते, कुणाला आपण पाण्याची बाटलीच विसरलो आहोत याची जाणीव होते. काही बायका घाईत लेडीज डबा कुठे आहे ते शोधत असतात. तरणी पोरं दरवाज्यात उभे राहून काय सिद्ध करीत असतात देव जाणे ! पण त्यांची मस्ती चालू असते.
गाडीचा सिग्नल पडला आणि भोंगा वाजला की कुणीतरी फलाटावरच राहिलेला भिडू धावत पळत गेट पकडतो. दुसरा त्याला हात देतो. ज्याची गाडी सुटली असेल तो आपला हताश चेहर्याने थोडा वेळ गाडीकडे बघतो आणि मग नेहमीचा नसल्यास कुणाला तरी "या नंतर कितीची गाडी?"  असे विचारतो आणि वाट पाहणे सुरु. आणि समजा, गाडी आपल्यासोबत असलेल्या अर्धांगिनीच्या कृपेमुळे सुटली असेल तर तिचा उद्धार होतो. नविन लग्न झालेल्या जोडप्यांना याचा काहीच फरक पडत नाही. त्यांची आजन्म सोबत फलाटावर वाट बघण्याची तयारी  दिसून येते आणि ही जोडपी गर्दीत उठून दिसतात. विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत.
असचं काहीसं होते जेव्हा डहाणूवरुन सुटलेली मेमू  विरारला येते. अशा वेळी जर तुम्ही पूर्वेला जाताना  फलाट क्र ६ व ७ वर असाल तर शहाणपणाचा सल्ला म्हणजे पाच मिनिटं बाकावर बसा. गर्दीच्या विरुद्ध जाऊ नका. पूर्ण फलाट माणसांनी भरून जातो आणि जर तुम्ही या गर्दीतून जाण्याचे धैर्य दाखवत असाल तर  वाटेतील सामानाच्या ढिगाला पूर्ण वळसा घालून जावे लागणे, लोकांचे धक्के खाणे  इ  गोष्टी सहन कराव्याच लागतील.
मला तो मनस्ताप अजिबात नको असतो, म्हणून जर या फलाटावर गाडी येताना किंवा जाताना दिसली की मी लगोलग एक बाक पकडतो. कानात हेडफोन घालून एक पूर्ण गाणं ऐकतो. गर्दी गेली की आरामात जातो.
माणसं का अशी धावतात, कशाच्या पाठी  कळत नाही.  मोबाइलवर पण टेम्पल रन खेळतात.  जिवाच्या आकांताने आपणच पळत आहोत अशी समज करुन  घेतात. असो.
तर काही दिवसांपूर्वी असंच संध्याकाळी सहाच्या  सुमारास घरी परतत होतो. ६ नंबरच्या फलाटावर दूरुन मेमू  येताना दिसली आणि मनात म्हटलं 'चला आता पाच मिनिटं इथेच बसू.. धक्के खाण्यापेक्षा'.  गाडी फलाटाला लागली आणि माणसे नेहमीप्रमाणे धावू लागली.  इतक्यात माझं लक्ष दोन व्यक्तींकडे गेलं.  एक स्त्री आणि एक पुरुष. दोघांच्या हातातील लाल काठीमुळे आणि डोळ्यांवरील चष्म्यामुळे ते अंध आहेत हे लगेच कळलं. एकमेकांचा हात धरला होता आणि ते गर्दीच्या विरुद्ध जात होते. अचानक  दोघांचा हात सुटला आणि कुठे आणि कसं जावं ते त्यांना कळेना. मग मी माझा नियम मोडला. जागेवरून उठलो  आणि त्यांच्याकडे गेलो.  दोघांचाही एकेक हात माझ्या हातात घेतला आणि फलाटावर चालू लागलो.  बाजूने जाणार्या लोकांच्या धक्क्यांची त्यांना पर्वा नव्हती किंवा सवयीचं झाले असेल म्हणा.  आम्ही तिघे असे चाललो होतो.  तीन माणसांनी अशी वाट धरल्यामुळे समोरुन येणारे आधी गोंधळायचे मग लगेच मार्ग बदलायचे.  या दोघांच्या गप्पा चालल्या होत्या. त्या पुरुषांने त्या स्त्रीला विचारलं की  "आज बाईंनी शिकवलेलं कळलं का?" सौजन्याचे नियम दोघेही पाळत होते आणि म्हणूनच कि काय दोघेही नवरा बायको आहेत असं वाटत नव्हते.
 मी मनात म्हटलं की 'कुठल्या यांच्या बाई आणि कुठलं शिकवणं?" त्या स्त्रीने उत्तर दिलं "हो, कळलं की"
"काय शिकवलं आज?" तो.
"आज बाईंनी चपात्या भाजल्यात कि नाही ते ओळखायला शिकवलं, स्पर्श करून.  सकाळी  माझ्या  चपात्या नेहमी करपतात आणि मग मुलांना त्या तशाच डब्यात न्याव्या लागतात.  हे एक बरं झालं आता."
'चपात्या लाटायला केव्हा शिकवलं?" तो.
"डोळे जायच्या आधी मला यायच्या कि हो ! आता सहा महिन्यांपूर्वी नजर गेली.  चपात्या लाटता येतात अंदाजाने.  सुरुवातीला कळायचं नाही.  आता सवय झाली" ती.
एवढ्यात फलाट संपला त्यांना पूर्वेकडे आणलं. रिक्क्षास्टॅंड जवळ तो तिला "चला बाय" म्हणाला आणि गेला.ती पण रिक्क्षासाठीच्या रांगेत उभी राहिली.
आणि मी मात्र त्यांचे संभाषण मनात घोळवत चालू लागलो.
या बाईची दृष्टी आता सहा महिन्यांपूर्वी गेली होती तर.  कशामुळे गेली असेल? कुठला आजार?
म्हणजे सहा महिन्यांपूर्वी ही माझ्याच सारखं पाहू शकत होती.
अचानक दृष्टी  गेल्याने तिला त्रास नक्कीच झाला असणार.  डोळ्यापुढे एकदम अंधार आला असेल.
 घरी लाइट गेली तर क्षणभर बावरल्या सारखं करतो आपण, मेणबत्ती शोधेपर्यन्त.
इथे तर काळोख आता आयुष्याचा सोबती आहे ही जाणीव किती दुःख देणारी असेल?
तशाही परिस्थितीत ही बाई शिकतेय आणि यापुढे चपात्या करपणार नाहीत याचा तिला आनंद आहे.
अशी जगण्याची जिद्द असलेली माणसे कुठे आणि जराशा प्रतिकूल गोष्टीने हात पाय गाळून बसणारे आम्ही कुठे!   कुंतीने कृष्णाकडे असीम दुःख मागितलं होतं. तितकं दुःख मागायचं धैर्य नाहीय रे कुणात ! आमची दुःखे पण छोटीशीच. हसत हसत त्यांना भिडण्याची शक्ती दिलीस तरी पुरे!!