शनिवार, २९ मार्च, २०१४

नोकरीनामा


परवा वाटेत एक मित्र भेटला. त्याने बोलता बोलता खिशातून त्याचे विजिटिंग कार्ड काढून दिले. मी म्हणालो  "अरे बाबा कार्ड कशाला ? आहे माझ्याकडे. काही महिन्यांपूर्वीच नाही का तू दिलस !" तर त्यावर त्याचे उत्तर -"जॉब बदलला मी,  हे नवीन कंपनीचं". मी चकित.  कारण या आमच्या मित्राला हेवा वाटावा अशा पगाराची नोकरी.  त्यावर आईटी क्षेत्रातला जॉब.  न राहवून कारण विचारलं, तेव्हा म्हणाला "पॅकेज जास्त आहे" . आईटी क्षेत्रातली मंडळी एका जागी फार टिकत नाहीत हे ऐकून होतो.  चांगली संधी मिळवण्याच्या प्रयत्नात आपण सर्वच असतो, पण या क्षेत्रातल्या मंडळींचा एका ठिकाणचा कार्यकाळ हा तीन महीने ते जास्तीत जास्त दोन वर्ष असा असतो.  त्यातही सतत स्वताला अपडेट ठेवायची धडपड.  ऑटोमोबाइल क्षेत्रातल्या एका मित्राने सांगितलं, की हल्ली माणसं एका कंपनीत एखाद वर्ष काम करतात आणि तो अनुभव बांधून दुसर्या कंपनीत जातात. कंपनीशी त्यांना कुठलीही बांधीलकी असत नाही.  मग ही माणसे जाताना एका वर्षात या क्षेत्रात कमावलेले ज्ञान, बहुमोलाचे अंदाज सोबत घेऊन जातात.  जे कंपनीच्या दृष्टीने फार महत्वाचे असते.   नवीन नोकरदारांवर कामकाज शिकवण्यासाठी जो खर्च होतो तो वेगळाच.
माझ्या शेजारचे काका, इतकेच कशाला माझ्या बाबांनी देखील एकाच कंपनीत २५ वर्षे नोकरी केली.  कंपनीच्या उत्कर्षाच्या सर्व घटनांचे साक्षी राहिले.  त्यांना विचारलं तर आपण सुरुवात किती रुपये पगारापासून केली आणि आता मेहनतीने कुठपर्यंत आलो आहोत याचा सविस्तर आलेख सांगतील. पण पैसा कमावणं  हाच नोकरी करण्याचा महत्वाचा हेतू आहे का?
स्वताच्या आवडीच्या क्षेत्रात किती जण काम करतात?
मुळात आपण नोकरी, उद्योग कशासाठी करतो ? पैसा कमावण्यासाठी. हे खरं प्राथमिक उत्तर.  कारण त्याशिवाय उपजीविका करणं कठीण आहे.  (पैश्य़ाशिवायही रानावनात  नीट जगता येतं हे थोरोचं  वाल्डेन वाचताना पटतं आणि त्याचा खूप हेवा वाटतो)  रोज सकाळी उठून कामावर जाण्याची लगबग. तो सकाळचा दीर्घ प्रवास, दिवसभर ऑफिसमधे काम, संध्याकाळी थकल्या जीवांची घराची ओढ.  रात्रीची जरा झोप लागतेय तोच पुन्हा घड्याळाचा गजर.  पुन्हा तेच तेच.  कधी एकदा रविवार येतोय याची आस.  आणि रविवारच्या रात्री सोमवारची भीती.  जगण्यात एकसुरीपणा येत जातो . कामाच्या डेड लाइन्स पाळता पाळता आपणच डेड होऊन जातो कळतच नाही.  एंजॉयमेंटच्या नावावर वीकेंडला नविन लागलेला पिक्चर पाहतो, बाहेर जेवतो आणि आपलं सगळं सुरळीत चाललं आहे याचं स्वतःलाच आश्वासन देत राहतो.
माझ्या आईटी क्षेत्रातल्या मित्रासारखे काही झटपट नोकर्या बदलतात,तर काही दुसरी चांगली नोकरी शोधूया का? मिळेल का? याच प्रश्नाच्या उत्तरात आणि सुरक्षितता शोधत जगत असतात.  एका मित्राने सरकारी नोकरी मिळाल्यावर "Finally got a government job... आता आयुष्यभराची चिंता मिटली" असे म्हटल्यावर काय रिएक्शन द्यावी या विचारात  बराच वेळ होतो मी.  आवश्यकतेपेक्षा जास्त पगार, कामाचे कमी तास,दिवाळी बोनसची खात्री, केव्हाही संप करून व्यवस्थेला वेठीला धरण्याची मुजोरी आणि कामचुकारपणा ही व्यवछेदक लक्षणे असणार्या नोकर्यांसाठी जेव्हा लाखोंच्या संखेने अर्ज येतात,प्यून, क्लर्क सारख्या पोस्टसाठी जेव्हा मास्टर्स झालेली मुले मूली प्रयत्न करतात तेव्हा काळजी वाटते की  इतके शिकूनसुद्धा आपल्याला पुढे काय करायचे आहे हे न कळणं ही शिक्षणव्यवस्थेची शोकांतिका नव्हे का?
निव्वळ स्कोप आहे असा विचार करून इंजीनियर झालेला माझा मित्र जेव्हा कॉल सेंटरमधे कमी पगाराचा जॉब करतो,तेव्हा खंत वाटते.  करिअरिस्टिक धोरणातून इतरांच्या सांगण्यावरून  क्षेत्र निवडलेलं.  त्यात मनातून आवड नाही म्हणून रेटत रेटत केट्या  पास करत एकदाची हाती मिळवलेली डिग्री.  आणि त्याच क्वालिफिकेशनचे हजारो लोग.  नोकरी नाही म्हणून घरच्यांनी दाखवलेला अविश्वास हेच हल्लीच्या पिढीचे क्रंदन आहे.  बरं, वाट चुकली हे ध्यानात आल्यावरही आपल्या मनासारख्या क्षेत्रात न जाणार्या रिस्क घ्यायला घाबरणार्या लोकांची दया येते. आला दिवस ढकलला जातो.  पगार केव्हा वाढेल याच विचारात आयुष्य गुंतून जाते.
वपु काळे यांनी त्यांच्या वडिलांबद्दल लिहिलय की,उतारवयात ते असंबध्द बोलत . आयुष्यभर बॉसला एक शब्द उलटा न बोलता इमाने एतबारे  नोकरी केल्यानंतर उतारवयात ते बॉसला शिव्या देत.  आयुष्यभर दाबून ठेवलेला राग, अपमान, संताप याचा म्हातारपणी उद्रेक होतो.
याउलट आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा आनंद वेगळाच असतो.  मॉनेटरी फायदे हे मग बायप्रोडक्ट असतं.  आवडीच्या क्षेत्रातली कंटाळवाणी कामे पण कल्पकतने कशी करता येतील हे कळू लागतं.  प्यून, क्लर्क यांना मी अजिबात कमी लेखत नाहीये.  शेवटी प्रत्येक काम महत्वाचच असतं,पण प्रत्येकाने स्वतःची वाट शोधायला हवी.   At the end of the day समाधान महत्वाच असतं.  "मी तेव्हा हे करू शकलो असतो"  किंवा "मी तेव्हा हे केलं असतं तर किती बरं झालं असतं" ही वाक्ये  नंतर  खूप त्रास देतात मनाला.
आपलं आवडीचं क्षेत्र कसं निवडावं? माझा मित्र दिपची  theory असे  सांगते की, जे करताना तुम्ही देहभान विसरता त्याचसाठीच तुमचा जन्म झालेला असतो.  बर्याचदा त्याची मस्करी केली आम्ही.  पण आता ते पटतंय.
 शाळेत असताना निबंधांचा शेवट जसा आपण typical पद्धतीने करायचो तसाच शेवट एका मोठ्या माणसाचे वचन उद्गारून करतोय -
"And in the end, it’s not the years in your life that count. It’s the life in your years."
- Abraham Lincoln 

सोमवार, २४ मार्च, २०१४

लोकलकथा

माझा एक सहकारी प्राध्यापक मित्र पीएचडी करतोय. त्याचा विषय आहे की मुंबईतील रेल्वे कशा प्रकारे एक लहान विश्व आहेत -  स्वताचे वेगळेपण असणारे. या मोठ्या विश्वात आणखी लहान लहान विश्वे.  रेल्वेमुळे कशा पद्धतीने समाज आणि त्यातील घटक बांधले जातात वगैरे. या तत्सम तांत्रिक गोष्टी तो माझ्याशी बराच वेळ बोलत होता. तर या विषयावर बोलत असताना रेल्वेतील भिकारी, भजनी मंडळे, ग्रुप्स, पाकिटमार, भेळवाले असे अनेकविध विषय माझ्या डोळ्यासमोर आले. पुढे मागे यातील एका विषयावर आपणही पीएचडी करण्यास हरकत नाही.

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणार्या रेल्वेची ओळख फार लहानपणीच झाली.  त्यावेळी आणि आतापण हा प्रवास फारसा सुखकारक आहे असे कधी वाटले नाही.  दिवाळीला बाबांच्या ऑफिसमधे लक्ष्मीपूजेसाठी आम्ही जात असू, त्यावेळी कांदिवली ते चर्नी रोड हा तासभराचा प्रवास कधी संपेल असे वाटे. कंटाळा येई.  शाळेत असताना एकदा मी फर्स्ट क्लास ने प्रवास केला होता. टिकिट मात्र सेकंड क्लासचे होतं. त्यावेळी फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास काही माहित नव्हतं.  स्टेशनला टीसीने पकडलं आणि विचारलं 'टिकिट' ,  मग मी सेकंड क्लासचं टिकिट दाखवताच त्याने विचारलं की 'फर्स्ट क्लासने कशाला आलास?' मग मी  विचारलं की "फर्स्ट क्लास म्हणजे काय?" त्या बिचार्याला माझ्या अज्ञानाची दया आली असावी. त्याने मला सोडून दिलं.

कॉलेजमधे असताना पहाटे ५. ३० ची लोकल पकडायला लागायची. सातच्या ठोक्याला एप्रन घालून लॅबमधे हजर असलच पाहिजे असा दंडक होता.  उशीरा येणार्याना  कुलकर्णी सर अशा नजरेने पाहत की, अख्या वर्गात आपण 'होपलेस' आहोत आणि आपण रसायनशास्त्रावर काळिमा आहोत असे वाटे. सोबतीला आणखी एक जण असल्यावर हा काळिमा आणि होपलेस'पणा वाटून घेतल्यासारखे वाटे.  सकाळची ही लोकल सुटली की दहा मिनिटे थांबावे लागे.  पुलं म्हणतात तसे मुंबईकराचे घड्याळ हे त्याच्या नशिबालाच बांधलेले असते. 
नेहमीची लोकल चुकल्यानंतरचे दुःख फ़क्त मुंबईकरालाच अनुभवता येईल.  भल्या पहाटे देखील बसायला थर्ड सीट किंवा किमान चौथी सीट मिळणे कठीण. अशा वेळी ज्यांना विंडो सीट मिळते त्यांच्या नशिबात चांगले ग्रह असावेत.   सकाळच्या गर्दीच्या वेळी धावत्या ट्रेन मधे चढणार्याचे कसब पाहून कौतुक वाटे.

लोकलच्या या गर्दीतही ग्रुप असतात. रोज रोज एकाच ट्रेनने जाणारे अनोळखी चेहरे हळू हळू एकमेकांना नावाने ओळखू लागतात.  "आपला माणूस" म्हणून त्याच्यासाठी जागा धरली जाते.  त्याला  निदान नीट उभं राहायला मिळावं अशी अपेक्षा असते.  मग या जागा अडवून ठेवण्यावरून भांडणे होतात.  क्वचित प्रसंगी मारामारी होते.  इथे लोक ग्रुपने मार खातातही आणि मार देतातही ! इथे बहुतेक सर्व सण साजरे केले जातात.  एकमेकांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले जाते.  वयानुसार प्रत्येकाची यथोचित थट्टा मस्करी पण होते.  गटारीचे प्लान बनवले जातात, कधी कधी वडे समोसे आणले जातात.

या तास दीडतासाच्या प्रवासात काही भजनी मंडळी कोकलून इतर प्रवाशांचा जीव खातात.  निवडक काही अप्रतिम गाणारे असतात.  बाकी नुसता टाहो.  काही दिवसांपूर्वी विरार लोकलच्या लेडीज़ डब्यात एका बाळाचा जन्म झाला, तेव्हा लोकांना कोण आनंद ! गाडी वीस मिनिटे स्टेशन वर थांबली तरी एरवी सेकंदासाठी कुरबुरी करणार्या कुणीही तक्रार केली नाही. 

माधवनचा 'रहना है तेरे दिल में' आठवतोय ? त्यात तो दिया मिर्ज़ाचा हात हातात घेऊन तिचे भविष्य सांगताना म्हणतो की, "तेरे हातों में लम्बी रेखाएं नहीं है, सब लोकल ट्रेन की पटरियां ही है" किंवा लोकलच्या दरवाज्यात उभा राहून राणी मुखर्जी वर लाइन मारणारा 'साथिया'तला विवेक ओबेरॉय, शेवटची लोकल चुकल्यामुळे अनपेक्षित प्रसंगाना सामोरे जावे लागणारा 'एक चालीस की लास्ट लोकल ' मधला अभय देओल असो.  बॉलीवुडने लोकल ट्रेनला कथावस्तूचा एक भाग म्हणून स्वीकारलय.  'ह्यूगो' नावाच्या हॉलीवुड चित्रपटात तर रेल्वे स्टेशन वरच सर्व महत्वाच्या घटना घडतात.

विजय तेंडुलकरांची 'झपूर्झा' नावाची श्रुतिका आहे.  त्यात त्यांनी बॅकग्राउंडला लोकल ट्रेनचा प्लॉट घेतलाय. संध्याकाळी घरी परतणारा म्हातारा त्याच्या मनातले विचार, त्याचे कुटुंब, ट्रेनमधले प्रवासी या सर्वांचा त्यांनी ज्या शैलीने मिलाफ केलाय.. मानना ही पडेगा !!  ती श्रुतिका उत्तरोत्तर मनावर असा ताबा मिळवते की त्या ट्रेनमधील त्या कम्पार्टमेंट मधे आपणच आहोत असे वाटते.  वपुंचे 'कर्मचारी' पुस्तक लोकलकथांनी भरलेले आहे.

मुंबईवर जेव्हा दहशती हल्ला झाला तेव्हा लोकल ट्रेन्समधली निरागस माणसे हकनाक मारली गेली.  ते भयाण दिवस विसरणे कधीही शक्य नाही. पण या सर्व संकटांतूनही माणसे पुन्हा उभी राहिली.  पुन्हा जीवावर उदार होऊन स्टीलचा रॉड पकडत ऑफिसला जाऊ लागली.  "स्पिरिट ऑफ़ मुंबई"चे गोडवे गायले गेले, पण या सर्व धैर्यामागे शूरपणा नव्हताच. होती ती फ़क्त अगतिकता. एक दिवस कामावर गेलो नाही तर पगार बुडेल किंवा काहींच्या बाबतीत घरी चूलच पेटणार नाही ही परिस्थिती.

कष्टकर्यांच्या मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणार्या अस्सल मुंबईकराला अजूनही 'विंडो सीट'चच स्वप्न पडतं.

मंगळवार, ११ मार्च, २०१४

कथालेखन वगैरे

मरीन ड्राइवला पोचलो तेव्हा सहा वाजले होते. आणखी अर्ध्या तासात काळोख पडेल. वर्दळ नेहमीसारखीच.  मस्तपैकी जागा पकडली पाहिजे. निदान जवळपास डिस्टर्ब करणारं - काय करतोय म्हणून डोकावून पाहणारं कुणी नको. आज कुठल्याही परिस्थितीत रणजीतला कथेचा फर्स्ट ड्राफ्ट दिला पाहिजे.  गेला आठवडाभर आज देतो, उद्या देतो, कंटेंट रेडी आहे फ़क्त कागदावर उतरवायचय, उद्या पक्का - असं करून त्याला टाळत आलो. आणि आज सकाळी पावणे पाचला  त्याचा SMS आला की, 'I knw..u hvnt wrttn anythin..i'll KILL u'. सकाळी नऊला उठलो तेव्हा कुठे तो पाहिला.  मग अर्धा तास दात घासत, एक तास बाथरूममधे अंघोळ करताना आणि त्यानंतर १२ पर्यंत डोरेमॉन बघत काय लिहावं याचाच विचार करत बसलो आपण.  तरी काहीच srtike होत नव्हतं. रणजीतला हवीय एक लव स्टोरी.  मग त्यात पाणी घालून तो एकांकिका बनवणार किंवा अगदीच नाही जमलं तर शॉर्ट फ़िल्म.  त्याच्या अपेक्षाही भन्नाट असतात.  'अजून कुणालाही सुचली नसेल अशी प्रेमकथा लिही... रोजरोजचं नको त्यात...बस स्टॉप, ट्रेनमधली ओळख... मग ओळखीचं रूपांतर प्रेमात अशी रटाळ स्टोरी नकोच... काहीतरी फ्रेश हवं आणि सगळ्यांना अपील होणारं....' . एवढ सगळं हवय आणि ते पण सामान्य माणसाच्या बाबतीत. अशक्य ! आता इतक्या वर्षांत लोकं त्याच त्याच पध्दतीने प्रेमात पडत असतील तर आपण काय करणार ? CCD ला जाऊन कॉफ़ी पीत पीत  लिहूया असं ठरवलं दुपारी. कुणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी दीपक घेईल.  पण किती वेळ टेबल अडवून बसणार? आणि कुणी ओळखीचं भेटलं तर औपचारिक बोलावं लागणार.  त्यात आणखी वेळ जाणार.  त्यापेक्षा 'समुद्रकिनारी' खारे दाणे खात बसू.
आणि असा प्लान ठरला.

कठडयावर मांडी घालून बसलो, चपला नीट काढून पायाखाली घेतल्या.  बॅगेतून डायरी काढली.  दहा वेळा रिफिल बदललेलं montex चं लकी पेन.… त्याला एकदा ओठाला लावलं.  समोरच्या समुद्राकडे लॉन्ग पॉज घेऊन पाहिलं.  एक खोल दीर्घ श्वास आणि कागदावर लिहिणार तोच खांद्याला कुणी तरी हात लावला - "भाईसाब कुछ पैसा देगा?" एक सत्तर वर्षांची म्हातारी माझ्या बाजूला बसलीय.  पोशाखावरुन कॅथलिक वाटतेय.  चेहर्यावर सुरकुत्या आहेत.  बोलताना गाल आत ओढले जाताहेत.  केस पांढरेफटक.  ती पुन्हा म्हणाली "मेरा कोई नहीं है।  सब मर गया।  कुछ पैसा देगा?".
मी भिकार्यांना पैसे कधीच देत नाही.  म्हणजे आधी द्यायचो.  पण काही महिन्यांपूर्वी मंडळाच्या व्याख्यानमालेत एका समाजसेविकेचे लेक्चर ऐकले.  तिच्या मते भिकार्यांना पैसे देण्यापेक्षा खायला काही तरी द्या. बिस्किटचा पुडा द्या.  तिने इतक्या पोटतिड़कीने सांगितलं की, मी माझ्या बॅगेत पारले ग्लुको बिस्किटचे छोटे पुडे ठेऊ लागलो.  आला भिकारी की दे बिस्कीट.  एकदा एका लहान मुलाला तो पुडा  देताना त्याने सांगितलं "हम ये नहीं खाताय, क्रीम का दो ना".  मुलं ती मुलंच. रणजीतला ही गोष्ट सांगताच त्याने याच थीमवर शॉर्ट फ़िल्म केली.  त्या लहान मुलांचे कुरतडलेलं बालपण हास्याचा विषय होऊ नये असचं मला वाटत होतं.
त्यानंतर मी भिकार्यांना काहीच देत नाही. आपोआप ते कंटाळून पुढे जातात.
तरी पण त्या म्हातारीला म्हटलं 'पैसा नहीं है, कुछ खाओगी?"  तिने नकारार्थी मान हलवली. मग मी नायक आणि नायिका कुठे भेटतील या विचारात गुंतलो.  शाळा- कॉलेज - हॉस्पिटल - लाइब्रेरी - नाट्यगृह - चौपाटी - कॉमन भेळवाला.  किंवा असं केलं तर.… नायक आणि नायिका एकमेकांना फेसबुकवर ओळखतात चेहर्याने.
माझ्या बाजूला बसलेली म्हातारी दर थोड्या वेळाने बाजूच्या कपल्सकडे, इवनिंग वॉकला आलेल्यांकडे पैसे मागत होती "भाईसाब कुछ पैसा देगा?" हे वाक्य सारखं कानावर पडत होतं.  एकाने म्हातारीला सांगितल "आप मुझे बताओ आपकी कहानी'. मग म्हातारीने तेच "मुझे कोई नहीं है, अकेली हुँ, कुछ पैसा दोगे? दस रूपया?" हे सांगायला सुरवात केली.  त्या गृहस्थाने सर्व शांतपणे ऐकलं आणि तसाच निघुन गेला.  मग म्हातारीने तोंडातल्या तोंडात त्याला काही शिव्या दिल्या.

नायक आणि नायिका एकमेकांना भेटायचं ठरवतात.  पहिल्यांदाच भेटणार असतात.  वातावरण निर्मिती  करता येईल. कॉफ़ी शॉप की क्रॉसवर्ड ? क्रॉसवर्ड डन्.
माझ्या बाजूला बराच वेळ पासून एक माणूस फोन वर बोलतोय. ऐकायला स्पष्ट येतेय.
"जी मै मुकुल बात कर रहा हुँ। कपूर जी कैसे हो आप? पहचाना? सर मैं ऑडिशन के लिए आया था।  आपने कहा था, कुछ काम होगा तो बतावोगे।…जी सर, कल ही आये हो बैंगकॉक से ? कैसे रही आपकी ट्रीप ? जी बिजी हो.....ok सर कुछ काम हो तो बता दीजिये। …जी यही नंबर है मेरा।  बाय सर have a good day. "
मग दूसरा फ़ोन कॉल.
"जी क्या मैं शर्माजी से बात कर सकता हुँ? सर, मैं मुकुल, सेट पे मुलाकात हुई थी।  आपने कहा था कुछ काम होगा तो बतावोगे? हा..सर कैसी है अभी आपकी तबियत, ठीक है सर बाद में बात करेंगे। "
या संवादावरुन आणि वाक्यावाक्यागणिक टपकणार्या नम्रतेतून हे स्पष्ट कळत होतं कि ही व्यक्ती स्ट्रगलर आहे.
 मग आणखी काही फोन कॉल्स. तीच नकारघंटा. तो उदास चेहर्याने निघुन गेला.
नायिका शाळेत शिकवत असते. आपल्या नायिकेसाठी नायक एक नाटुकले लिहून देतो.  नायिका लहान मुलांना घेऊन ते नाटक बसवते. मग या सर्व घडामोडीत ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.
पुढे?
पुढे?
लग्न?
की इथेच शेवट करावा?
चटपटित संवाद नंतर लिहिता येतील. ब्लू प्रिंट ओकेय. पण तितकिशी भिड़त नाहीय मनाला.
ती म्हातारी कुठे गेली? आता तर इथे होती.