शनिवार, १८ एप्रिल, २०१५

विजू

बेळगावला मिळालेली मेडिकलची सीट सोडून मी प्लेन B.Sc करायचा निर्णय घेतला. घरात यावरून बरंच तांडव झालं. डॉक्टर असलेल्या काकांनी त्यांच्याकडे B.Sc झालेली मुलं औषधं विकायला येतात व आपण त्यांना कशी वागणूक देतो यावर भाष्य केलं. आईने तिचा मुलगा डॉक्टर असावा ही इच्छा व्यक्त केली. बाबांचा मात्र सपोर्ट होता. 'आवडेल ते कर, पण नंतर आम्हाला दोष देऊ नकोस' असा धोक्याचा इशाराही होता त्यात.
 पुढची तीन वर्षं  मनासारखी जगता यावी म्हणून घरापासून दूर उपनगरात असलेल्या मुंबईतल्या अस्सल मराठी कॉलेजमध्ये मग मी दाखल झालो.  आधीच मी मितभाषी त्यात नविन मित्र मिळवण्यासाठी जी सामाजिक कौशल्ये लागतात ती माझ्यात नाहीत. पण आपण 'माणूसघाणे' म्हणून राहू नये यासाठी कॉलेजच्या सगळ्या मंडळांत नाव नोदवलं. त्यांच्या meetings ला जात राहिलो. एके दिवशी फलकावर नाट्यमंडळाच्या नवीन एकांकिकेसाठी ऑडिशनची तारीख आली. शाळेत असताना शिवाजी आणि दादोजी कोंडदेव यांच्या संवादाचा एक प्रवेश आम्ही बसवला होता. त्यात मी शिवाजी झालो होतो. त्यानंतर रंगभूमीशी नाते नाही.  कुणास ठावूक आपण चांगले नट बनू पुढेमागे.  Try करने में क्या जाता है ? आम्ही मग ऑडिशनसाठी नाव नोंदवलं.
ऑडिशनच्या दिवशी सभागृहात नुसता कल्लोळ होता. हातात स्क्रिप्ट घेऊन अनेकजण वेगवेगळ्या कोपर्यात rehearsal करत होते. मी पक्का ठाम होतो. शिवाजी आणि दादोजी कोंडदेव दोन्ही साकारणार होतो. मग थोड्या वेळाने डिरेक्टरसाहेब आले. senior मंडळींनी त्यांच्या पाया  वगैरे पडून नवीन नियम घालून दिला. मग रीतसर ऑडिशन सुरु झाल्या. त्या दिवशी किमान पाच फुलराणी आणि किमान चार शिवराय आलेले. फुलराणींनी 'तुला शिकविल चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा' म्हणत त्या मास्तरासकट सगळ्यांना जेरीला आणलं. शिवरायांचा जन्म, शपथ आणि बाजीप्रभूंचा मृत्यू, गड आला सिंह गेला असे एकेक प्रसंग सादर होत होते. आता काय करायचं? दुसरं काय येतंच नाय ! क्या करे ? तेवढ्यात माझ्या शेजारीच उभ्या असलेल्या एकाने मला खुणावलं की जरा बाजूला ये.
"मी विजय, फर्स्ट यिअर, Physics - Chemistry - Botany"
"Chemistry - Botany - Zoology"  मी.
"काय करायचं ?"
"कशाचं?"
"स्क्रिप्टचं - मी पण शिवराय साकारतोय तुझ्यासारखाच."
"तुला कसं कळलं - मी शिवाजीची भूमिका करतोय ते?" मी गोंधळात.
"Simple. तुला स्वताशी बोलताना ऐकलं रे. कोण स्वतःला 'आम्ही' म्हणून संबोधणार?"
"जे आहे ते सादर करायचं, आणि काय ?"
"हे बघ अजून चार  performances   आहेत, तोपर्यंत आपण नवीन स्क्रिप्ट बनवू, एकत्र perform करू "
"नवीन स्क्रिप्ट, खाऊ आहे का ?"
"डिरेक्टर ज्याम भडकू आहे आणि आपला नंबर शेवटी आहे. आपण जे सादर करणार आहोत ते केलं तर selection तर होणार नाहीच, पण backstage पण मिळणार नाही. Believe me !"
ऑडीच्या पायर्यांवर बसून मग आम्ही स्क्रिप्ट पक्की केली. लिहायला वेळच नव्हता. इम्प्रोवाइज केलं.
बतावणी type स्कीट होतं. ते सादर केल्यावर जरा वेगळं काहीतरी पाहिल्याचा भाव डिरेक्टरच्या आणि senior मंडळींच्या चेहर्यावर उमटला आणि अशा प्रकारे आम्ही नाट्यमंडळाच्या नवीन एकांकिकेच्या ताफ्यात दाखल झालो.
विजयला त्यानंतर मी विजू, विज्या, विज्या *** अशीच हाक मारत आलोय. कॉलेजची तीन वर्ष आम्ही एकत्र ज्याम धमाल केली.  माझ्याहून थोडासा उंच, कुरळे दाट केस, गोरा रंग, सतत विचारमग्न तंद्रीत असलेले डोळे, शर्ट नेहमी ईन केलेला, हजरजबाबी.
शेवटच्या क्षणी महत्वाचा बदल करायची त्याची जुनी खोड मलापण लागली आणि पहिल्या वर्षीच मी zoology चा निरोप घेऊन त्याच्यासोबत Physics च्या वर्गांत बसू लागलो. एकदा आम्ही career मार्गदर्शन करणाऱ्या एका नामांकित व्यक्तीच्या भाषणाला गेलो. तिथे त्यांनी कुणाला काही प्रश्न आहेत का असे विचारल्यावर एकाने विचारलं - "मी B. E. केलंय Mechanical. आता पुढे काय करू?"
त्यावर त्या विद्वान व्यक्तीने "मला असं वाटतं आपण civil services कडे वळावं."असा सल्ला दिला.
त्या 'B.E. Mechanical' ने मान हलवत त्याचे आभार मानले.
च्यायला. या engineerला पुढे काय करू प्रश्न पडलाय?
मग एवढं शिकून फायदा काय? आपल्याला कशात आनंद मिळतो हेच कळत नसेल तर.
विजू आणि मी या तीन वर्षांत आपल्या जीवनाचं प्रयोजन काय याचा शोध लावण्याचा निश्चय केला.
नाट्यमंडळातून आमची हकालपट्टी तेवढी व्हायची बाकी होती. सगळ्यांना तिथे मुख्य भूमीका हव्या असायच्या. डिरेक्टर सतत कुणानाकुणाच्या नावाने शिव्या देत असायचा. एकदा आम्हा दोघांना मॉबमध्ये घेतलं, तिथेपण आम्ही माती केली. movements चुकवल्या. डिरेक्टरसाठी सिगारेट्स घेऊन ये, मुख्य नायिकेचे journal लिहिणे. property ची देखरेख करणे अशा कामांवर आमची नेमणूक झाल्यावर आम्हां दोघांचाही स्वाभिमान जागा झाला. आपला जन्म अभिनयासाठी झालेला नसून प्रयोगशाळेतील रसायनांसाठी झालेला आहे याची जाणीव होताच आम्ही रंगभूमीला रामराम ठोकला. इतिहास दोन नटसम्राटांना मुकला.
आता chemistryतलं नोबेल मिळवणं आमचं ध्येय झालं. तेही स्वप्न काही पूर्ण झालं नाही. पुस्तकाच्या बाहेरचं काही experiment करू नका असाच दम दिला होता. तरीही Lab मधून Sodium चोरून नेऊन आर्टस वाल्या मित्रांना जादू दाखवणे सारखे उद्योग केले. शंका विचारल्यावर "तुमचे फोटो त्या तिथे आईनस्टाईनच्या बाजूला लावले पाहिजेत. लक्ष असतं का वर्गात शिकवताना?" असं ऐकावं लागलं.
कॉलेज मध्ये व्याख्यानमाला चालवणे, NSS च्या रक्तदान शिबिराला इतरांना रक्तदान करायला लावून स्वतः कॉफी आणि पारले बिस्कीट हादडणे, कॅन्टीनच्या अण्णाचे बिल थकवणे असे उपक्रम आम्ही एकत्र केले.
विजूच्या घरी आई आणि मोठा भाऊ होता. बाबा दारूच्या व्यसनापायी वारले. घर एका दुमजली चाळीत शेवटचं. घराबाहेर डालडाच्या डब्यात लावलेली मूडदूस झालेली तुळस. एका बाटलीत लावलेलं मनी प्लांट. घरात भिंतीचे पोपडे निघालेले. आमच्याही घरी परिस्थिती ताज महाला सारखी नव्हती काही. उन्हाळात कमालीचं उकडायचं. त्याच्या घरातून लवकर सटकून आम्ही जवळच्या बुद्ध विहारात जाऊन बसत असू. तिथल्या थंडगार फरश्या आणि कमालीची शांतता अस्वस्थ करी. परिस्थिती बदलली पाहिजे असे वाटे.
यथावकाश शिक्षण पार पडलं. मी शहराच्या दूर टोकावर बस्तान बसवलं. विजूला नोकरी लागल्याचं कळलं. नवीन घर घेतलं त्याने.
 मध्ये एकदा त्याने फोन करून "सर मी B.Sc. झालो आहे, आता पुढे काय करू?" असा प्रश्न  विचारल्याचं आठवतं, ज्याम हसलो आम्ही. नंतर काही दिवसांपूर्वी लग्नाचं निमंत्रण देण्याचा फोन आला. "आईला आता काम जमत नाही, सारखी आजारी असते, आता तिला आराम" वगैरे. परवा लग्नाला गेलो. भेटताच "भले पठ्ठ्या !" म्हणून पाठीत गुद्दा हाणला. चेहऱ्यावरून वहिनी सोशिक असल्याचं जाणवलं. विजूसारख्या माणसाला सहन करायला ईश्वर तिला सहनशक्ती देवो. receptionच्या वेळी माझी ओळख आपल्या सहचारिणीला करून देताना म्हणाला, "My friend and philosopher. एकत्र होतो कॉलेजमध्ये."
आहेराचं पाकीट घेताना मला म्हणाला -
 "अरे आपण आपल्या जीवनाचं प्रयोजन काय याचा शोध घेणार होतो ना, काय सापडलं ?"
 "आनंदी राहणं हेच प्रयोजन. जे जगलो ते मजेत. स्वतःच्या मर्जीने. पुढे काय करायचं किंवा कसं जगायचं हा प्रश्न कुणाला विचारावा लागला नाही हेच विशेष." मी.
"सर मी B.Sc. झालो आहे, आता पुढे काय करू?" विजू.
 त्यावर आम्ही दोघेही मनापासून ज्याम हसलो. त्याच्या  बायकोला आम्ही का हसतोय हे कळलं नाही. 

गुरुवार, २ एप्रिल, २०१५

क्रिकेटचं वेड आणि करप्शन वाली चाय

१. भारत अपेक्षेप्रमाणे सेमीफायनल मध्ये हरला आणि लाखो क्रिकेटप्रेमींचा मूड गेला. काहींनी तर प्रेमभंग झाल्यासारखा चेहरा केला. संध्याकाळी साडेचार नंतर सर्वत्र काहीतरी दु:खद  घडलंय असाच माहोल होता. गजबजलेला चर्चगेटचा परिसरही त्या दिवशी संध्याकाळी दु:खद वातावरणात असल्यासारखा वाटत होता. अनेकांनी विराट आणि त्याची प्रेयसी अनुष्काला शिव्या घातल्या. या दिवसभरात अनेक व्यक्ती भेटल्या ज्या क्रिकेटच्या अक्षरक्ष: वेड्या होत्या. सकाळी अंघोळ करून TV ची पूजा करून मगच  स्टार स्पोर्टस लावणारा किरण ट्रेनमध्ये भेटला. कामावर न येण्याचे असंख्य बहाणे त्याने बॉसला सांगितले होते, पण बॉसने "आज आला नाहीस, तर घरीच बस" असा प्रेमळ ओरडा दिल्यामुळे तो नाराजीतच कामाला चालला होता. कानात रेडिओवरची कमेंट्री. मिनिटागणिक ऑस्ट्रेलियाचा वाढत चाललेला स्कोर पाहून त्याचा चेहरा पडला होता.
आमच्या ऑफिसमधील लिफ्टमन असलेल्या काकांनी दिवसभर लिफ्टमध्ये चढणाऱ्या प्रत्येकाला "स्कोर काय झाला?" विचारून भंडावून सोडले होते. संध्याकाळी सामना हरल्याचे दु:ख व्यक्त करताना मला म्हणाले, "सरांनु आज मी जेवलोच नाही"
"का ?"
"टेंशन"
"कशाचं ?"
"अहो म्याचचं टेंशन ! इंडिया हरली म्हणून आज जेवलोच नाही"
"अहो मामा, एवढं टेंशन त्या धोनीला पण आलं नसेल."
मग त्यांनी तरुणपणापासून आपण क्रिकेटपायी काय काय केलं ते सांगू लागले.
भारत - पाकिस्तानचा सामना पहायचाय म्हणून दहावीचा पेपर बुडवून घरी बसले. एकदा रस्त्यातून चालताना चपलेचा अंगठा तुटला म्हणून चप्पल हातात घेऊन अनवाणी चालू लागले. एका TVच्या शोरूम समोरील गर्दीत उभे राहून तासभर क्रिकेट बघितल्यावर निघताना लोकांना हे चप्पलचोर वाटले. तेव्हा लोकांना समजावताना ह्यांना नाकी नऊ आले.  क्रिकेटपायी आजूबाजूचे सगळे भान विसरणारी असली माणसे -आयुष्यात ह्यांनी कधी क्रिकेटची ब्याट हाती धरली नसेन पण क्रिकेटपटूंनी कसे खेळावे याचे धडे चारचौघात देणार.
माझ्या एका दूरच्या काकाने त्याच्या लहानपणी  कमेंट्री करणाऱ्या माणसांना पहायचय म्हणून  रेडिओ खोलला होता. त्यात  माणसे तर  सापडली नाहीतच मात्र ह्यांनाच मोठ्या माणसांनी आमानधमकी दिली.
यंदाचा विश्वचषक भारतच जिंकणार असे सुरवातीपासून सांगणाऱ्या माझ्या एका मित्राने भारत हरल्यावर "बरं झालं सेमी फायनल मध्ये हरलो ते. फायनलमध्ये जाऊन हरण्यापेक्षा हे बरं !" ही प्रतिक्रिया दिली.
त्या बिचार्या क्रिकेटपटूंच्या विरोधात निदर्शने केली गेली. माध्यमांत लोकांनी असंतोष व्यक्त केला. क्रिकेटपटूंच्या घराभोवतालची सुरक्षा वाढवावी लागली. हे दुर्देवाचे आहे. प्रेक्षक म्हणून आपण जसे नाट्य, सिनेमा याबाबत immature आहोत तसेच क्रिडारसिक म्हणूनसुद्धा.

२. 
ऑफिस मधील सगळ्यांचा उतरलेला चेहरा पाहून प्यूनला सगळ्यांसाठी  चहा आणायला सांगितला.
"इंडिया  की हार कि ख़ुशी में सर चाय मंगवा रहे है" शर्मा.
"हाहाहा" वातावरणात जरासे हास्य.
चहा नेहमीपेक्षा कडक होता.आमचे  कॅन्टीनवाले केव्हापासून असा चहा बनवायला लागले?
"ओ शर्माजी,आज चाय कहाँ से लाये?"
"सर, ये करप्शनवाली चाय हैं"
"तनिक मतलब बताय दो"
"सर इस चाय का पैसा कैंटीनवाले अन्ना के बजाय चाय बनानेवाले के पास गया है"
"मतबल ?"
"कैंटीनमें जो चाय बनाता है वो स्पेसल चाय बनाके देता हैं अदरक इलायची ज्यादा डालकर। अन्ना को पता नहीं रहता"
या चहाला "करप्शनवाली चाय" असे नामकरण करणाऱ्या प्यूनच्या कल्पकतेचे कौतुक वाटले.
भष्ट्राचार असा छोट्या छोट्या गोष्टींत सामावून आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालाय.