सोमवार, २१ सप्टेंबर, २०१५

एक अकेला ईस शहर में

त्याने दरवाजा उघडला. बूट काढून भिरकावले.  जरावेळ पलंगावर बसला. पंखा टॉप स्पीडला.  घड्याळात पाहिलं तेव्हा रात्रीचे  पावणे एक झाले होते म्हणजे साडे बारा वाजलेत. घड्याळ पंधरा मिनिटे पुढे ठेवलंय. बाकी घड्याळ कितीही मिनिटे पुढे ठेवा उशीर होणारच, खिशातला मोबाईल काढला आणि चार्जीगला लावला. उद्या शनिवार.  battery डेड झालेला फोन चालू झाल्यावर त्याने facebook आणि whatsapp uninstall केले. आता पुढचे दोन दिवस कुणाचेच updates नकोत.फुकटच्या गप्पा नकोत. पुढचे दोन दिवस  निवांत.
बेसिनचा नळ चालू करून त्याने चेहऱ्यावर सपासप पाणी मारले. ट्रेनमधे काय झोप लागली होती ! कशाला मरायला आपण इतक्या लांब राहायला आलोत. इतक्यात कुकरच्या शिट्टीचा आवाज आला. च्यायला !!यावेळेलापण माणसे जेवणाच्या तयारीत. बरंय. इतकं दमून घरी आल्यावर कुकर लावायचा stamina नक्की एका बाईतच असणार. अलार्म बंद करून त्याने पलंगावर स्वतःला फेकून दिले,
शनिवारचा दिनक्रम :
शनिवारची सकाळ अकरा वाजता उजाडली. आरामात ब्रश करत तो उघडाबंब घरभर फिरला. अंघोळीसाठी कडक पाणी तापवलं. विवस्त्र होऊन अर्धा तास अंघोळ केली. बादलीतलं पाणी संपलं तरी दिगंबर अवस्थेत तो बराच वेळ बसला. चहाचं आधण तापत ठेवलं. चहा कढस्तोवर पेपरातल्या बातम्या चाळल्या. संपादकीय पानावर कुठल्या विषयावर अकलेचे प्रदर्शन केलंय ते पाहिलं. कॉलेजला असताना डिबेटिंग सोसायटीच्या सभांत तो तावातावाने अमुक एका संपादकाने आजच्या संपादकीयात हे मांडलंय असं ठासून सांगायचा. लोकं काय आयतं ऐकायला मिळतंय म्हटल्यावर ऐकायची. जोरदार भाषण करायचा. आता अग्रलेख वाचायला घेतला कि झोप येते. चहा घेतला. दोन बिस्किटे चघळली.
बाल्कनीतल्या झाडांना पाणी घातलं. पिकलेली पाने खुडून टाकली. पेपराची जमलेली रद्दी नीट बांधून ठेवली.
कशाला हवेत घरात  दोन दोन पेपर. एक मराठी आणि त्याचा आंग्ल बंधू. रद्दीचा भाव चांगला येतो म्हणून ठीक आहे एकवेळ.
आठवडाभराचे कपडे मशीनला टाकले. पाच शर्ट, तीन पँट, तीन जोडी पायमोजे, तीन रुमाल. कपडे बाल्कनीत वाळत घातले. एका टोपात मुगाची खिचडी शिजायला टाकली.  फ्रीज आवरलं. खराब झालेल्या सॉसच्या बाटल्या कचऱ्यात टाकल्या. केव्हा आणल्या होत्या, देवास ठावूक. पुढच्या वेळेपासून त्यावर स्टीकर लावला पाहिजे. खिचडी झाल्यावर बकाबका जेवला. बटाटा साल न काढता खिचडीत टाकल्यावर वेगळीच चव येते. ओर्गनिक का काहीसी.
जेवल्यावर सुस्ती आली तेव्हा candy crush च्या दोन levels पार केल्या. मग लादीवर पहुडला. संध्याकाळी पाचला जाग आली. सकाळचाच उरलेला चहा गरम करून पिला. मग त्याने बाजारात जाऊन काही जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली उदा. कांदे, बटाटे, लसूण, ब्रेड, दूध  इत्यादी.
संध्याकाळी सातला देवासमोर दिवा लावला. आठवडयातून याच दिवशी देवाची सेवा घडते. भात शिजायला टाकला. दूध गरम केलं. दूधभात खाल्ला. दूधाला त्याची स्वतंत्र चव आहे. भाताला आहे. लोक साखर टाकून चव बिघडवतात. सकाळची आणि आत्ता जेवलेली भांडी एकदम घासली. साडे आठ वाजलेत आतासे. या वेळेला आपण काय करत असलो असतो? chatting, टीम मीटिंगचे भयाण minutes लिहून सगळ्यांना मेल पाठवत, किंवा कुठल्यातरी न दिसणाऱ्या client साठी माथेफोड करत.  
त्याने मोबाईलच्या playlist मधे जाऊन बेगम अख्तरची गाणी लावली. शनिवारची संध्याकाळ व्याकूळ आणि उदास व्हायला एकदम चांगली. या बाईच्या आवाजात असा काय जादू आहे कि आपण एकदम हळवे होऊन जातो. ये मुहब्बत तेरे अंजाम पे रोना आया. . असं का वाटत राहावं कि आपले शंभर ब्रेकअप झालेत आणि आपण तनहाईत आहोत. इन्सान बगैर रोये तो नही उठना चाहिये ।
केव्हा झोप लागली कळलं नाही. मधे रात्री जाग आली तेव्हा Yanni ची गाणी चालू होती म्हणजे गाण्यांनी पण B to Y चा प्रवास केला होता. मोबाईल मध्ये पाचाचा अलार्म लावला.
रविवारचा दिनक्रम : 
रविवारी पहाटे पाचला Wake me up ने झोप उतरवली. त्याने भराभरा दात घासले आणि पँट चढवली. रविवारचा सूर्योदय पहायची त्याची जुनी सवय. ट्रेनही रिकाम्या असतात. मरीन लाईन्सच्या त्या कठड्यावर बसून हळू हळू उगवतीस येणारा सूर्य पाहणे त्याला खूप आवडतं. आठवड्याच्या इतर दिवशी कळतही नाही सुर्य केव्हा अगवतो ते. नुसतं निवांत बसून राहायचं. कशाचाच फार विचार करायचा नाही. या महानगरातलं आपलं वास्तव्य किती दिवस असेल कुणास ठावूक. आपण पहिल्यांदा इथे आलो तेव्हा या समुद्रानेच मन मोकळं करायला जागा दिली. शेंगदाणे खात उद्याची काळजी करत इथेच किती रात्री घालवल्या. एकदाचे आपण इथले चाकरमानी झालो. ट्रेनच्या वेळापत्रकाशी जुळवून घेतलं. इथे सगळ्यांना जागा आहे. इथल्या ह्या उंच इमारती आणि त्यातले धनाढ्य लोक. प्रत्येकाच्या स्वप्नांना इथे वाव आहे.
नऊ वाजले तेव्हा त्याची तंद्री भंगली. स्टेशनवर पाणी कम चहा घेतला, घरी पेपर येणार आहे हे ठावूक असूनसुद्धा पेपरवाल्या समोर उभा राहून जमेल तितक्या हेडलाईन्स वाचल्या. इडलीवाल्या अण्णाकडे रस्त्यावर उभे राहून दोन प्लेट इडल्या खाल्ल्या. समाधानाची ढेकर दिली.
इडल्या खाल्ल्यावर आईची आठवण आली, तिला फोन करून इथे आपले कसे सुरळीत चालले आहे याची खात्री करून दिली.
घरी पोचल्यावर लादी पुसून घेतली. घरात बाईमाणूस नसताना केसांचे पुंजके कुठून येतात बरं. काही भुताटकी तर नसेल ना? गावी लोक सर्रास असे करायचे. कुणाची नखे चोरून ने तर कुणाची केसं. इथे सगळे सुसंस्कृत वाटतात. शेजारचा माणूस मेला तरी चौकशीस जाणार नाहीत. privacy महत्वाची.
भूक तर नाहीये इतकी. रेडीमेड सूप प्यावं. दोन मिनिटांत रेडी.
दुपारी घरातला पसारा आवरला. पुस्तकं नीट रचून ठेवली. कपड्यांच्या घड्या घातल्या. एका महान लेखकाची एपिक समजली जाणारी कादंबरी वाचायचा आटोकाट प्रयत्न केला. डोळ्यावर झोप आली तेव्हा झोपला.
संध्याकाळी मित्राने भेट दिलेली जास्मिन टी बनवली. त्याने चीनवरून आणली होती. चहाला मस्त वास येतो जास्मिनच्या फुलांचा. त्यानिमित्ताने सर्व मित्रांची आठवण काढून झाली. शिव्या देऊन झाल्या. काय करताहेत *** देव जाणे !!
 डिनरसाठी कर्ड राईस. साउथ इंडिअन बॉस कडून शिकलेली रेसिपी. खाणार तेवढा भात शिजवून घ्यायचा पहिल्यांदा. त्यात सढळ हाताने दही ओतायचं. जिरे,मोहरी, कढीपत्ता, मिरचीची कढत फोडणी द्यायची वरून. जमल्यास तुळशीची पाने टाकायची. झाला कर्ड राईस तयार.  दही गोड असेल तर भारीच.
जेवल्यावर भांडी घासताना U2 ची गाणी सोबतीला. त्याचं I still haven't found what I'm looking for फेवरेट.
आपल्याला तरी कुठे कळलंय काय शोधतो आहोत ते.
बिछाना टाकायचा. दोन दोन अलार्म लावायचे सोमवार साठी. झोपताना George Harrison चं All things must pass away ऐकायचं. येणाऱ्या आणखी एका दिवसासाठी  तयार व्हायचं.
All things must pass
None of life's strings can last
So, I must be on my way
And face another day.
All things must pass away

***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा