शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

गोष्ट

तारलई गावाच्या वेशीवर मंडपवाल्या केश्याचं घर आहे. गावापासून तसं घर दूरच. आजूबाजूला जेमतेम दोन तीन घरं. पण ती रिकामीच.  त्या घरातली माणसे मुंबई पुण्याला राहायला. जत्रेला दहा पंधरा दिवसांसाठी कुठे ती घरे माणसांनी भरून जायची. बाकी वर्षभर निरव शांतता असायची आसपास.  गावातल्या बायका केश्याच्या बायकोला रंजनाला विचारायचे कि कसे राहता इतक्या लांब? माणसाची चाहूल नाय आजूबाजूला. रात्री जरा खुट्ट झालं तरी आमचा जीव वरखाली होतो, तुम्ही राहता कसे बिनघोर? रंजी म्हणायची कि आत्याबाय हायता, गुरं हायती मग कशाला घाबरायचं. केश्याचे बरेच उद्योग असायचे. मंडपासोबत त्याने लाऊड स्पीकर भाड्याने द्यायला सुरुवात केली, मग लोकांना ने आणायला जीप घेतली. हे सारे उद्योग सण समारंभासाठी पूरक होते. पण यासर्वांमुळे त्याला घरी यायला नेहमी उशीर व्हायचा . कुठे सप्ताह, दिंडी वगैरे असली कि दोन तीन दिवस घरी फिरकणं नसायचं. केश्याची आई भीमाक्का वयाने थकलेली, पण अगदी काटक बाई. सकाळपासून कामात असायची. सकाळी न्याहारी झाली कि सून गुरांना घेऊन रानात जायची. म्हातारी भीमाक्का घर सांभाळायची. घराच्या आजूबाजूला फिरून हिरवाट आणायची. गुरांचा गोठा झाडलोट करायची. केश्याला आणि रंजनाला मुलबाळ नव्हतं.  केश्या घरी नसला तरी सासू सून गुण्यागोविंदाने राहायची. घरात नवीन टीव्ही घेतल्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत तो चालू असायचा.

पाली जत्रा जवळ आली होती. केश्या जीप घेऊन दोन दिवसांसाठी पाली गावाला सकाळीच निघाला. सोबत गावातील पाच सहा जण सोबत होते. म्हातारीला व बायकोला सांगून गेला कि नीट ऱ्हावा. घरात फक्त त्याच्याकडेच मोबाईल होता. जर गरज पडली तर कदमांच्या घरी राजुला फोन करायला सांगावं लागायचं. दुपारपासून म्हातारीचं अंग भरून आलं. संध्याकाळी म्हातारी सुनेला म्हणाली मला जेवाया नगं, भूक न्हाय. तरी बळेबळेच रंजीने तिला भाकरी भाजी खायला लावली. साडे नऊ वाजले असतील, म्हातारी आतल्या खोलीत झोपायला निघून गेली.  रंजीने सगळं आवरलं. झाकपाक केलं. नेहमीच्या सिरीयल बघितल्या. झोपायच्या आधी म्हातारीला विचारू म्हणून आतल्या खोलीत गेली तर म्हातारीची काहीच हालचाल नाही. आत्याबाय, झोपलाव का? तर एक नाही दोन नाही. अंग गरम आहे का बघायला तिने तिच्या कपाळाला हात लावला तर अंग थंडच पडलेलं. हलवून बघितलं तर म्हातारी गारच. रंजी भेदरली. रात्रीचे साडे अकरा वाजलेले. गावात डॉक्टर नाही. शेजारी कुणी गडीमाणूस नाही. नवऱ्याला फोन करून सांगावा धाडावा तर फोन नाही. म्हातारीला बरेच प्रयत्न करून जाग आली नाही तेव्हा तिला कळलं कि म्हातारीने जीव सोडला. आता करावं काय? तिने तडक पायात चप्पल सरकवली, दरवाजाला कडी कुलूप लावलं आणि गावात गेली. चांदणं टिपूर पडलेलं होतं. कुणाला काय सांगायचं हेच तिला कळत नव्हतं. रडायला तर येत होतं पण भीती जास्त वाटत होती. पहिल्यांदाच इतक्या रात्रीची ती गावाकडे निघाली होती. जत्रेच्या वेळेला रात्रीचा तमाशा असायचा गावातल्या शाळेसमोरच्या मैदानात, पण तेव्हा रस्त्याने माणसे असायची सोबत. भीती वाटायची नाही.

गावातील कुत्री अचानक भुंकायला लागली . गावात कदमांच्या घरी रंजी गेली आणि दार ठोठावलं. त्यांच्याकडे मंडळी जागीच होती. शुक्रवारचा पिच्चर लागलेला दूरदर्शनवर. तिने गेल्यावर सांगितलं कि आत्याबाय काय उठंनात. राजू, शेजारचे मारुती आण्णा, शेखरआप्पा केश्याचा घरी निघाले. राजूने केश्याला फोन करून निघायला सांगितलं. मारुतीआण्णा  जवळ चार्जिंगची बॅटरी होती. डुक्कराच्या शिकारीला जाताना वापरत. केश्याच्या घरी सगळे पोचले. अंगणात पिवळा बल्ब पेटत होता. घराच्या आत गोठ्यात गाय हंबरत होती. रंजीने कुलुप उघडलं आणि दार ढकललं तेव्हा सर्वांनी जे पाहिलं त्यांने त्यांना कापरं भरलं. म्हातारीचं प्रेत उंबरठ्यापर्यंत येऊन पोचलं होतं. रंजीने जाताना आतल्या खोलीत म्हातारीला झोपलेलं बघितलं असताना ती आता वटी, गोठा पार करून उंबरठ्यापर्यंत कशी येईल? कुणी काहीच बोलेना. म्हातारीचा जीव गेलाय याची सगळ्यांनी पुन्हा एकदा खात्री केली.  राजुने फोन करून गावात वर्दी दिली आणि तयारीला लागायला सांगितलं. केश्या येईपर्यंत मढं जागवायला पाहिजे. म्हातारीला भिंतीला टेकवून बसवलं. नाकात कापूस घातला. माणसं जमू लागली. अंगणात खुर्च्या टाकून माणसे बसली.  बायका आतल्या खोलीत रडू लागल्या. पुरुष मंडळी  बाहेर बसून पुढचं काय करायचं यावर बोलत होती.
म्हातारीचं प्रेत आतल्या खोलीतून बाहेर आलं कसं दबक्या आवाजात विचारू लागली. कुणी म्हटलं- असेल थोडी धुगधुगी जीवात. कुणी म्हटलं रंजीने नीट बघितलंच नसेल,म्हातारी जिवंत असेल तेव्हा. कुणी म्हटलं जर कुलूप लावलंच नसतं तर?

रात्री अडीच तीनला सगळीकडे सामसूम होती. अंगणात माणसे पेंगत दबक्या आवाजात रात्र जागवत होते. घरात आतल्या खोलीत रंजीचे डोळे आणि गाल रडून रडून दुखत होते. चुलीवर सगळ्यांसाठी चहा कढत होता. बाहेरच्या खोलीत म्हातारीचं मढं देवळीजवळ भिंतीला टेकवून बसवलं होत. बाजूला उदबत्त्या लावल्या होत्या. म्हातारीच्या चेहऱ्यावर एक हलकीच स्मितरेषा उमटली.

***

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

टाईम ट्रॅव्हल

मन स्वैर संचार करणारं आहे. एका क्षणात इथे तर एका क्षणात सात समुद्रापार- सात पर्वतांपलीकडच्या कुठल्यातरी गावी.
मनासारखंच शरीरालाही क्षणार्धात कुठेही जाता आलं तर? जसं टीव्हीवरच्या जुन्या पौराणिक मालिकांत दाखवायचे तसे.
टाईम ट्रॅव्हल करता आलं तर काय धम्माल येईल! बालपणात जाता येईल किंवा भविष्यातही. आपल्या जन्माच्या अगोदर कुठल्याही सालात जाऊन अनुभवता येईल तेव्हाचं समाजजीवन.

इतिहासातल्या भयानक घटना बदलता येतील.  लाखो ज्यूंचे शिरकाण थांबवता येईल. हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांना वाचवता येईल. काही महापुरुषांच्या हत्या थांबवता येतील.  (स्टीफन किंगची ११/२२/६३ कादंबरी याच विषयावर आहे. एक टाईम ट्रॅव्हलर जॉन एफ केनेडीची हत्या थांबवण्यासाठी टाईम ट्रॅव्हल करतो)

आयुष्यातले काही महत्वाचे प्रसंग पुन्हा जगता येतील.  पुन्हा शाळेच्या बाकांवर बसून धडे गिरवता येतील. गमावलेल्या जिवलग माणसाच्या मिठीत पुन्हा काही क्षण विसावता येईल.

माहितेय हे सर्व अवास्तव व काल्पनिक आहे.
आपण लिहितो म्हणजे नक्की काय करतो? आपल्या काळाचा एक दस्ताऐवज पुढच्या पिढ्यांसाठी तयार करून ठेवतो.
त्यातून त्यांना भूतकाळ अनुभवता येतो.  आणि चांगलं भविष्य घडवणं हे तर आपल्या आताच्या वर्तमानातील  वागण्यावर अवलंबून आहे.

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

ब्रँड

ब्रँड ही फार जूनी कल्पना आहे. काही शतकांपूर्वी मध्यपूर्वेत शाह अब्बास नावाचा आर्किटेक्ट होता. त्याची सर्वदूर ख्याती होती. त्याची वास्तुकला पाहून लोक म्हणायचे 'नक्कीच शाह अब्बास चं काम आहे हे. इतकी त्याच्या कंपनीची ब्रँड value होती.
मग लोक फिरता फिरता जिथे जातील तिथे काही सुंदर बघितलं कि  शाह अब्बास ! शाह अब्बास ! असे बोलू लागले.  (हा कदाचित प्रमोशनचा भाग असावा) मग दुसऱ्यांना वाटलं कि भाई शाब्बास म्हणताहेत म्हणजे प्रोत्साहन देताहेत, कौतुक करताहेत. तर असं शाह अब्बासचा ब्रँड एक नवीन शब्द भाषांना बहाल करून गेला.

महान नाटककार शेक्सपिअरने देखील स्वतःचा ब्रँड बनवला होता.  असं साहित्य लिहीन कि ते MA च्या अभ्यासक्रमाला लागलं पाहिजे, गाईड लिहून प्राध्यापकांची घरे व्यवस्थित चालली पाहिजेत अशी त्याची विस्तृत ब्रँड स्ट्रॅटेजी होती.

हल्ली सगळीकडे आपल्याला ब्रँड्स दिसतात. वापरात असलेल्या वस्तूंचे, सेवांचे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वापरत असलेल्या गोष्टी त्यांचा ब्रँड मिरवत असतात. फार पूर्वी रेडिओवर बिनाका गीतमाला यायची त्याचे किस्से ऐकून होतो. पण बिनाका हा टूथपेस्टचा ब्रँड आहे हे माहित नव्हतं (मला वाटलं, असेल काही अर्थ त्या शब्दाचा).  लाईफबॉय है जहाँ, तंदुरुस्ती है वहा म्हणत साबण, ऍक्शन का स्कूलटाइम म्हणत चपला, स्वाद भरे शक्ती भरे म्हणत बिस्किट ध्यानीमनी नसताना आपल्या रोजच्या व्यवहाराचा भाग होतात. काही माणसं ब्रँडेड वस्तू वापरण्यावर आग्रही (ब्रँड लॉयल ) असतात. त्या वस्तू आपल्या जवळ असल्याने आपण गर्दीत इतरांपेक्षा वेगळे उठून दिसू असं त्यांना उगाच वाटत असतं.

दोन रुपयांच्या पेनने जे लिहिलं जाऊ शकतं तेच महागड्या पार्करपेनने पण. काय लिहिलंय पेक्षा कशाने लिहिलंय, काय म्हटलंय पेक्षा कुणी म्हटलंय याला महत्त्व येण्याचा हा काळ आहे. तुही यत्ता कंची? च्या ऐवजी 'तुझा ब्रँड कोणता?' हा हल्ली जिव्हाळयाचा प्रश्न आहे.

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

कविता

तुम जब खाना पकाती हो
तब उसकी महक से
भर जाता है सारा घर
क्या पक रहा है आज स्पेशल?
पूछते है पडोसी आते जाते वक्त
मैं थका हुआ आ जाता हूँ आफिस से
खाने के समय सुन लेती हो मेरी
दिन भर की बोरिंग पॉलिटिक्स की बातें
अंत में पूछती हो
आज का खाना कैसा था ?
तब कही याद आता है
आज ख़ीर बनाई थी
मैं ख़ीर की प्रशंसा करने लगता हूँ
तब तुम कुछ समझकर हंस देती हो
खीर की मिठास धीरे धीरे घर में
घुलने लगती है 

शनिवार, २५ जुलै, २०२०

दूरदर्शन

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा केबल नेटवर्क ने आपली पाळेमुळे फार खोलवर रुजवली नव्हती. बहुतेकांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा(ओनिडा, BPL, सोनी, क्राऊन या कंपनीचे बहुतांशी). दूरदर्शनचं एकच चॅनेल दिसायचं.  नंतर त्यात डीडी मेट्रोची भर पडली. जेव्हा काही कार्यक्रम नसेल तेव्हा स्क्रीनवर सफेद मुंग्या दिसायच्या.जरा हवेने अँटेना हलला तर चित्र गायब. मग कोणतरी छपरावर चढून तो ऍडजस्ट करणार आणि त्याला घरातून 'दिसतंय' किंवा 'अजून थोडं सरकव' असा फीडबॅक देणार. कार्यक्रमही आतासारखे पाल्हाळ नसायचे. आठवड्यातून एकदा प्रसारीत होणारे. त्यांची खूप आतुरता असायची.  शक्तिमान, डक टेल्स, टेल्सपिन, सुराग, राजा अँड रँचो, कॅप्टन व्योम, सी हौक्स ही काही मोजकी नावे आता आठवतायेत. आतासारखी OTT सुविधा नसल्यामुळे एक जरी एपिसोड चुकला तरी फार वाईट वाटायचं. शाळेत मित्रांना विचारायचं काय दाखवलं काल? . मग ते हळहळ व्यक्त करत मिर्च मसाला लावून सांगत.  रविवारी संध्याकाळी चार वाजता मराठी चित्रपट लागायचा.  प्रेक्षकांचं आयुष्य सॉर्टेड होतं कारण पर्याय कमी होते.

मग केबल नेटवर्क आणि कलर टीव्हीचा जमाना आला. भरमसाठ न्यूज, सिने चॅनेल सुरु झाले.  २४ तास प्रक्षेपणाची सोय झाल्याने कंटेन्टचा दर्जा खालावला. सिरिअल्स वर्षानुवर्षे चालू लागल्या. 'चार दिवस सासूचे' मालिका चार हजार दिवस झाले तरी चालूच राहिली. मालिकांतली पात्रे मेल्यावर पब्लिक डिमांड वर परत जिवंत होऊ लागली. मधे एकदा प्लास्टिक सर्जरीची लाट येऊन गेली. लोकांच्या टीव्ही पाहण्याच्या सवयी बदलल्या. रात्री उशिरा पर्यंत जेवणं उरकू लागली. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या चॅनेल्स वर आवडती मालिका असेल तर एक दुपारी रिपीट टेलिकास्ट वर बघितली जाऊ लागली. या मालिकांतली मोठी मोठी घरं, उंची पेहराव मध्यम व नव-उच्चभ्रूवर्गासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत गेला. मध्यमवर्गाचं जगणं टीव्ही सिनेमाच्या जगात म्हणावं तसं रेखाटलं गेलं नाही.

हाय स्पीड इंटरनेट आणि OTT च्या काळात पुन्हा एकदा टीव्हीचा कायापालट झाला. नविन पिढीला (आणि जुन्यांनाही) कन्टेन्ट महत्वाचा वाटू लागला भले त्यासाठी जादा पैसे मोजावे लागले तरी. नेटफ्लिक्स, Prime, हॉटस्टार यासारखी अनेक प्लॅटफॉर्म्स प्रेक्षकांसाठी उबलब्ध झालीयेत. Netflix and Chill तरुणाईत पॉप्युलर झालंय. मल्टिमिडीया कन्टेन्टचा ओघ न संपणारा झालाय. तुम्ही युट्युबवर एक विडिओ बघता बघता असे काही वाहवत जाता कि आपण नेमकं काय पाहण्यासाठी युट्युब उघडलंय याचा विसर पडतो. नेटफ्लिक्सवर आता काय पाहावं हे शोधण्यातच बराच वेळ जातो. न्यूज चॅनेल्स ओपिनियन मेकर्स झालीयेत. एक ठराविक अजेन्डा राबवताना दिसतायेत.

अखंड वाहणाऱ्या माहितीच्या या स्रोतांनी आयुष्य कॉम्प्लिकेटेड केलीयेत.




शुक्रवार, १७ जुलै, २०२०

आठवणींचा कोलाज - घर




"मुझे एक मकान चाहिए 
जिसकी छोटी-सी क्यारी में
एक नन्हा-सा बिरवा रोप सकूँ 
जो केवल अपना हो 
जिसकी छत के नीचे लेटूँ 
तो सदियों से जगी मेरी आँखों में भी 
एक निजी सपना हो 
मैं एक छोटा-सा मकान खोज रहा हूँ 
ऊँची इमारतों वाले इस शहर में। 

- रामदरश मिश्र 


TIFR ला इंटर्नशीप करत असताना रोज समुद्राची गाठभेट व्हायची. तिथल्या लायब्ररीतून समुद्र दिसायचा. तिथल्या लोकांना मात्र त्याचं काहीच कौतुक नाही.(त्यांच्यासाठी नेहमीचाच तो) लंचच्या वेळेत तिथल्या कट्ट्यावर जाऊन बसायचो. संध्याकाळी घरी जाताना कुलाबा, कफ परेड फिरत बस चर्चगेटला यायची. आजूबाजूच्या उंच इमारती , समुद्राची जवळीक याचे अप्रूप वाटे. असाच एकदा संध्याकाळी परतत होतो. बसमध्ये माझ्या पुढच्या सीटवर एक नवविवाहित जोडपं बसलं होतं. बहुतेक मुंबादेवी, महालक्ष्मी, सिद्धिविनायकचे दर्शन करून आले होते.(लग्न झाल्यावर या ठिकाणी जोडीने जायलाच पाहिजे असा अलिखित नियम असावा , आता त्यात टिटवाळ्याच्या गणपतीची पण भर पडलीय) मुलीने साडी नेसली होती, हातातल्या प्लास्टिकचा पिशवीत प्रसादाच्या चुरमुर्याचे पाकीट, पेढ्याचा पुडा, कुंकवाची डबी होती. मुलगा थोडासा बावरलेला होता. खिडकीतून तिला बऱ्याच गोष्टी दाखवत होता.उदा. ही अमुक एक वास्तू, इथे अमुक एक होतं वगैरे. त्यात आपल्याला या शहराबद्दल खूप माहितेय हा अविर्भाव होता. इम्प्रेशन मारण्याची फेज.
एका उंच इमारतीकडे डोळे विस्फारून पाहत एकाएकी त्या मुलीने म्हटलं,
 'आपलं असेल का हो असं एखादं घर ?'
यावर त्या मुलाने थोडं हसत उत्तर दिले - "असेल की"
या महानगरात सोबतीने बघितलेल्या एका नवीन स्वप्नाची ती नांदी होती.

 मुळातच घर ही फार सुंदर गोष्ट आहे, नवीन घराचे किंवा स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणारी व त्यासाठी झगडणारी माणसे मला फार ग्रेट वाटतात. ग्रेट यासाठी कि त्यात एक दुर्दम्य आशावाद आहे. नोकरीच्या, पोटापाण्याच्या शोधात माणसं स्थलांतरित होतात. नवीन शहरात, गावात "आशियाना" शोधतात. ऍड्जस्ट करतात स्वतःला. आम्हाला मराठीच्या पुस्तकात उपमा अलंकाराचं उदाहरण म्हणून पुढील वाक्य होतं -"मुंबईतील घरे म्हणजे कोंबड्यांची खुराडीच ". अरुंद  गल्लीबोळातून जाणारी, अरुंद अशी एकावर एक इमले असलेली फार लहान लहान घरं मी पाहिली आहेत. एका मित्राच्या घरातून नारळाचे झाड उगवले होते ते थेट छपरातून बाहेर, किंवा असे म्हणूया या झाडाभोवतीच त्यांनी झोपडी बांधली होती. मग या झाडाच्या खोडाला पिशवी, दप्तर वगैरे वस्तू अडकवल्या जात. काही घरांच्या लादीतून पावसाळ्यात पाणी उफाळे. काहींच्या छपरातून पाणी गळे. पावसाळयाच्या सुरुवातीला मग पत्र्यांवर डांबराचा थर चढवला जाई.

घरांचा स्वभाव त्यांच्या घरमालकाप्रमाणे बदलतो. कुठे फक्त चहा मिळणार आहे आणि चहा पिल्यावर निवांत गप्पा मारता मारता जेवणाचा आग्रह कुठे होणार आहे हे घरमालकाच्या स्वभावावर ठरतं. काही घरांत आब राखून अवघडून बसावं लागतं, जीव गुदमरतो तर काही घरांत बिनदिक्कत जमिनीवर फतकल मारून बसता येतं. काही घरांत ओठातल्या ओठांत खोटं हसत समोरच्या श्रीमंतीकडे पाहावं लागतं तर कुठे गगनभेदी हसण्याने मन मोकळं होतं.

"No one realizes how beautiful it is to travel until he comes home and rests his head on his old, familiar pillow." हे जे लिन युतांगने म्हटलंय ते १००% खरंय.

माझ्या मते घर म्हणजे सोयी सुविधा नव्हेत. उंची फर्निचर नव्हे. स्केवर फूटचं गणित नव्हे. घर बनतं माणसांमुळे.
लहानपणी उन्हाळाच्या सुट्टीनंतर मुंबईला परतल्यावर आजी म्हणायची "तुम्ही होतात तेव्हा गजबजलेलं होतं, आता एकटं घर खायला उठतंय". अंगणात पायरीवर बसून रातकिड्यांचे आवाज ऐकत आम्ही आजीची गोष्ट ऐकत असू.  घर बांधताना माझे बाबा आणि काका किती लहान होते आणि तरीही खेळण्याच्या गाडीतून कसे वाळू आणायचे, कसे चिखलात खेळायचे, हा पायरीचा भला मोठा लाल दगड कसा आणला, कुठं उसाचं गुऱ्हाळ होतं वगैरे गोष्टी आम्ही तल्लीन होऊन ऐकत असू.
कुणास ठाऊक घरांना बोलता येत असतं तर त्यांनी सगळ्या पावसाळयांचा हिशोब मांडला असता. पणजोबांच्या वेळेची हकीकत पोक्त आजोबांप्रमाणे दाढी कुरवाळत सांगितली असती. लहान मूल दुडू दुडू धावताना पडल्यावर मायेची हाक घातली असती. माजघरातील नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा चोरटा प्रणय बघून गालातल्या गालात हसलं असतं.

विश्वास पाटलांच्या 'झाडाझडती' मध्ये एक प्रसंग आहे. धरणासाठी एक अख्ख गाव विस्थापित होणार असतं. गाव सोडून जाण्याच्या आदल्या दिवशी मध्यरात्री एक अधू म्हातारे आजोबा घराच्या भिंती चाचपडत असतात. घराला पारखं होण्याआधी त्यावर मायेचा हात फिरवत, त्याचा स्पर्श साठवत. आजी तिच्या शेवटच्या आजारपणात सतत गावच्या घराचा उल्लेख करी. मला मरण माझ्या घरात येऊ दे म्हणत राहिली. आता ती नसलेल्या घरात आम्हाला घर खायला उठतं.


***

शुक्रवार, १० जुलै, २०२०

स्माईल

मध्यंतरी एका रविवारी मी आणि बायको youtube वर पुलंचं 'वाऱ्यावरची वरात' बघत होतो. आमच्या पिढीला प्रत्यक्षात काही त्यांना पाहता आलं नाही. त्यांच्या रेकॉर्डिंग्स, पुस्तके हाच काय तो ठेवा.  संध्याकाळ फार मस्त गेली.  त्यातल्या 'एका रविवारची गोष्ट' मधले काही प्रसंग असे होते कि ते आठवून आम्ही खूप दिवस हसत होतो. पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय कि त्यांचा कुणी पुतळा वगैरे उभारला तर त्याखाली एवढंच लिहा "या माणसाने आम्हाला हसवले". रवींद्र नाट्यमंदिराच्या अंगणात जो पुलंचा पुतळा आहे त्याखाली हेच वाक्य लिहून ठेवलंय. 

हसणं ही मनुष्य प्राण्याला लाभलेली अद्भुत देणगी आहे. इतर कुठलेच प्राणी हसत नाहीत. आपणच 'हीही ते हाहा ते हाहाहा' हसत असतो. लहान बाळं किती गोड हसतात (अपवाद: मध्यरात्री सगळे झोपल्यावर  हसत असतील तर). माझ्या एका मैत्रिणीने तिच्या भाचीचा हसण्याचा आवाज रेकॉर्ड करून अलार्म टोन म्हणून ठेवला होता. एकदा ती निवासी कॅम्पला गेल्यावर भल्या पहाटे जेव्हा एका लहान मुलीचा हसण्याचा आवाज जंगलात घुमायला लागला तेव्हा त्या हसण्याच्या आवाजाने बाकी सगळ्यांना भीतीनं घाम फुटला होता. असो.

माझ्या पुस्तकसंग्रहात वुडहाऊस, पुलं, दमा मिरासदार यांची पुस्तके आहेतच, याशिवाय 'पंच' या कार्टूनविषयक मासिकाचा एक विशेष अंक आहे ज्यात 'पंच' मधील सर्वोत्तम कार्टून समाविष्ट आहेत. तो संग्रह न्याहाळत मी कितीही वेळ बसू शकतो. मध्यंतरी दूरदर्शनच्या भरभराटीच्या काळातील 'ये जो है जिंदगी', मालगुडी डेज, देख भाई देख, फ्लॉप शो हे कार्यक्रम पाहून बॅकलॉग भरून काढला.  किती छोट्या छोट्या गोष्टी आपल्या चेहऱ्यावर हसू आणू शकतात.

फ्रेंड्सचा एक एपिसोड बघत असताना Joey आणि Chandler च्या रूममध्ये दोन व्यक्तींचं  ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर दिसतं.  कोण ही दोघं? या प्रश्नाचा शोध घेत मी लॉरेल अँड हार्डी पर्यंत पोचलो आणि मी त्यांचा फॅन झालो.  लहानपणी कधीतरी जाड्या आणि रड्याची ही series सह्याद्रीवर मराठीत डब होऊन यायची ते आठवलं.
काही मालिका, चित्रपट यांनी खूप हसवलं. काहींनी हसता हसता अंतर्मुख करायला लावलं. श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेत वयस्क आबा (दिलीप प्रभावळकर) एकदा  लाफ्टर क्लब मध्ये जातात आणि तिकडच्या इन्स्ट्रक्टरच्या सांगण्यावर हसण्याचा सराव करायला लागतात. घरी जेव्हा ते चोरून हसण्याचा सराव करत असताना जी काही गम्मत होते ते पाहण्यासारखं आहे.

Humor कळणारा समाज (उदा : ब्रिटिश हुमर) फार प्रगतीशील असतो
माणूस जेव्हा स्वतः हसता हसता दुसऱ्यांना हसवायला लागतो तेव्हा त्याच्या पुण्याची बेरीज व्हायला सुरुवात होते.

.***

गुरुवार, २ जुलै, २०२०

विमानप्रवास

चांदण्या रात्री आकाशात एक प्रकाशाचा लुकलुकता ठिपका दिसला.. तो हळूहळू मोठा होत गेला.. मग कळलं विमान आहे ते. 
मी पाहिल्यांदा केव्हा विमानप्रवास केला हे मला आठवतंय. २०१६ सप्टेंबर मध्ये. जेव्हा मी नवीन ठिकाणी जॉबला लागलो आणि आठवडाभरात ट्रैनिंग साठी बंगळूरला पाठवायचं ठरलं. मी जरासा बुजलेला होतो. एअरपोर्टवर गेल्यावर काय करायचं, बोर्डिंग पास कसा मिळवायचा, सोबतच्या सामानात काय न्यायला परवानगी आहे, काय नाही  याबद्दल मी Quora वर बरंच वाचलं,मनात खूणगाठी केल्या आणि लढाईला निघाल्यासारखं 'हर हर महादेव' म्हणत घर सोडलं. काहीही झालं तरी बावळट दिसायचं नाही हा निश्चय ठाम होता. आपल्याला फर्राटेदार इंग्रजी बोलता येतं त्यामुळे कुठलाही शाब्दिक हल्ला आपण सहज परतवू शकू याचं मानसिक बळ गोळा करत मी एअरपोर्टवर पोचलो. माझ्या अपेक्षांना कात्री देत फार काही इंग्रजी न पाजळता मी  चेक-इन, security, बोर्डिंग पार करत विमानात जाऊन बसलो. विंडो सीटचा प्रेफरेन्स आधीच दिल्याने खिडकीतून बाहेरचं जग पहायला मिळणार याची उत्सुकता होती. आकाश पाळण्यात बसल्यावर जशी असते तशी. मग इतर सोपस्कार पार पडल्यावर सुरक्षेच्या सूचना झाल्या. रनवे वर विमान पोचलं. विमानाने टेक-ऑफ घेतल्यावर पोटात वर-खाली झालं. एकदाचं ते त्याच्या मनाजोगत्या उंचीवर पोचल्यावर कप्तान साहेबांनी 'खुर्ची की पेटी' बांधण्याचे 'संकेत' बंद केले. 
विमानातून खालच्या इमारती, रस्ते, डोंगर इवलुसे दिसत होते. हा पसारा केवढा भव्य आहे. आपण या सर्व पसाऱ्यात केवढेसे. माणसाने प्रयत्न करून आकाशात पण स्वतःच अस्तित्व तयार केलंय.  हे सर्व कुतुहूलमिश्रित डोळ्यांनी पाहत असताना अचानक ऐरहोस्टेस ने 'सर, Would you like to have something? विचारल्यावर भानावर आलो. मी त्या बयेच्या विनवण्या ऐकूनही काहीच घेतलं नाही. एक तर त्या सर्व वातावरणात आपण दबून गेलेलो असतो. आवाज आपसूक नरमाईचा होतो. दोन तासांनी जेव्हा बंगळूरला पोचलो आणि इतर सोपस्कार पार पडेपर्यंत पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. एअरपोर्टवर साधा चहाचा कप तुम्हाला शंभराला पडतो तेव्हा चहापत्ती दक्षिण ध्रुवावरून आणलेली असावी असं वाटतं. 
हॉटेलकडे जात असताना ड्राइवरला मधे एखादं बरं ठिकाण दिसलं तर सांग बाबा असं म्हटलं. त्याने एका ठिकाणी थांबल्यावर मस्तपैकी इडली खाऊन भूक शमवली. काही दिवसांनी जेव्हा ऑफिस मधील सहकाऱ्याने सांगितलं कि flight मधलं खाणं-पिणं ऑफिसने आधीच बुक केलेलं असतं तेव्हा मात्र त्या ऐरहोस्टेस बयेच्या विनवण्याचा अर्थ लागला. ऑफिसच्या induction प्रोग्रॅम मध्ये बऱ्याच फालतू गोष्टी नवीन एम्प्लॉयीला सांगता तेव्हा अशा  अत्यंत महत्वाच्या गोष्टी का बरे सांगत नाहीत?
गेल्या चार वर्षांत बरेच विमानप्रवास झाले. मी सराईतासारखा फिरायला लागलो. बरेचसे हॅक्स कळले. एकदा flight चुकल्यावर वेळेची गणिते कळली. हातात पुस्तक घेऊन बसल्याने विद्ववतेचा आव आणता येतो आणि कानात हेडफोन्स असले कि तुसड्यासारखं वागता येतं.  विमान लँड झाल्याझाल्या आपण पॅसेजमधे उभं राहून जणू जग जिंकायला निघालेल्या नेपोलियनचे वंशज आहोत आणि लढाईसाठी उशीर होतोय असं दाखवता येतं. 

मला जे हॅक्स कळलेत (एअरपोर्टच्या लाऊंजमध्ये जी ज्ञानप्राप्ती झालीय) त्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी फुकटात ज्ञान देत नसतो. सिद्धार्थाला देखील घर दार सोडून जावं लागलं होतं. तुमच्याही नशिबी खूप विमानप्रवास असावेत , त्यातून तुम्ही जग तुमच्या चष्मानं बघावं आणि या सर्व पसाऱ्याचा अर्थ लावावा ही सदिच्छा. 

***

शुक्रवार, २६ जून, २०२०

भाषा


मला शब्दांचं फार कुतुहूल आहे. एकच शब्द पण त्याचा दोन वेगळ्या भाषांत  वेगळा अर्थ. 'आवडे' या शब्दाचा मराठीत अर्थ आवडणे असा तर गुजरातीत 'येणे' किंवा 'समजणे' असा. तेलगू मध्ये 'वेडी' चा अर्थ 'गरम' असा होतो.
काही भाषा खास secretly गुफतगू करण्यासाठी. उदा. रफ ची भाषा किंवा 'च' ची भाषा. आपल्या दोघांना एक सीक्रेट भाषा येतेय आणि ती कुणालाही decode करता येत नाही हा केवढा आनंद. माणसांप्रमाणे कॉम्पुटरचीही वेगळी भाषा असते. पण त्याबद्दल नंतर कधीतरी.

भाषा माणसे जोडण्यासाठी असतात असा आपण मानून चालू. पण केव्हापासून भाषा आपल्या सामाजिक दर्जाच्या मापदंड ठरल्या? अमुक एक शुद्ध प्रमाण भाषा आणि अमुक एक अशुद्ध. कागदचं अनेकवचन कागदच (का पण?). एखादी भाषा श्रेष्ठ. एखादी हलकी. का पण?
सगळ्यांना कळण्यासाठी काही नियम हवेत हे मान्य. आपण व्याकरणाच्या चुकांत माणुसकी हरवत चाललो.
मेलेला हत्ती व्याकरणाने नाही चालवता येत किंवा जिवंतही. (त्याला माहूत लागतो)

जी भाषा आपली नाही तिला शिकून मातृभाषेचा तिटकारा करू लागलो.
लहान बाळाला 'गाय कशी करते?' च्या ऐवजी 'काऊ कशी करते?" 'ती बघ कॅट"
नंतरच्या टप्प्यात मग "होमवर्क फिनिश केला का?"
"आज आम्ही एग खाल्लं"

जगाच्या पाठीवर असेही काही पाडे असतील जिथे वैश्विक इंग्रजी भाषेचा गंधही नसेल. बदलत्या सामाजिक गणितांसोबत   स्थलांतर, जागतिकीकरण अशा अनेक कारणांमुळे भाषांचा मृत्यू ओढवतोय. एका अहवालानुसार तर दर दोन आठवड्यांनी एक भाषा मृत्यू पावते. भाषा मरते म्हणजे नेमकं काय होतं? तर त्या भाषेबद्दलची सामाजिक अवकाशातली माहितीच नष्ट होते. त्या भाषेतील शब्द, त्यांचे अन्वयार्थ, बोली साहित्य, लहजा सारंच गायब.  Wikitongues हा प्रकल्प जगातील हरेक भाषेचे  डॉक्युमेंटेशनच काम करतोय.  त्यांच्या संकेतस्थळावर विविध भाषांचे विडिओ पहायला मिळतात. ज्या भाषा आपण कधी ऐकल्याही नसत्या.


माझ्या एका मित्राने त्याच्या आईच्या आवाजातील जात्यावरच्या ओव्या संकलित केल्यात. हे खूप मोठं संचित आहे.
मातृभाषेला आईच्या पदराची उब असते.





शुक्रवार, १९ जून, २०२०

आठवणींचा पोत


कसुओ इशीगुरोच्या एका पुस्तकाचा review द्यायचा होता त्यावेळी त्याच्या लेखनप्रक्रियेविषयी खूप वाचलं होतं. एका लेखात त्याने असं सांगितलेलं कि त्याला 'texture of memory' सोबत खेळायला आवडतं . या शब्दाला आपण मराठीत 'आठवणींचा पोत' असं म्हणू. कथेतील पात्रांना कुठल्या गोष्टी बारकाईने आठवतील आणि कुठल्या आठवणार नाहीत, काहीक आठवणींना  भावनांचं असं आवरण असेल कि आठवतंय तसे कदाचित घडलेलं नसेलच (मनाचे खेळ वगैरे) किंवा अमुकच गोष्टी सिलेक्टिव्हली का आठवत असतील? अशा अनेक प्रश्नांनी आपण घेरले जातो. 

खऱ्या आयुष्यातही असे बऱ्याचदा घडते. अचानक एके दिवशी बालपणातील किंवा कॉलेजच्या दिवसांतील काही आठवतं आणि तेच का आठवलं याचा प्रश्न पडतो. बालपणी एखादी हरवलेली गोष्ट का प्रकर्षाने आठवावी ? हरवलेली छत्री, कंपासपेटी आणि माणसे! सणासुदीला लहानपणीच वारलेल्या मुलाची आठवण येऊन एखाद्या आजीचे डोळे या वयातही पाणावतात.
वर्षोनुवर्षं संपर्कात नसलेल्या किंवा आता कुठे असेल याची जराही कल्पना नसलेल्या मित्राचा / मैत्रीणीचा  चेहरा का डोळ्यासमोर यावा? बरं मग माणसांना मृत्युशय्येवर असताना नेमकं काय आठवत असेल? आयुष्याचा चित्रपट फास्ट फॉरवर्ड मध्ये डोळ्यांसमोरून जात असेल का? का काही वयस्कर माणसे लगेच हळवी होतात?  

आपल्या रोजच्या जगण्यातील सर्वच गोष्टी आठवणींचा भाग होतात असेही नाही. ज्या गोष्टींकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देतो त्याच गोष्टी हळूहळू अंतरी झिरपतात. Inattentional blindness म्हणून मानसशास्त्रात एक कन्सेप्ट आहे.  एखादी गोष्ट आपल्या नजरेच्या टप्प्यात असतानादेखील आपल्याला ती दिसत नाही कारण आपलं लक्षच नसतं किंवा लक्ष भलतीकडेच असतं. 
[उदा:
"आई, माझं घड्याळ कुठंय?"
"आहे तिथेच टेबलावर. "
"नाहीये इथे"
"नीट बघ. सापडेल" 
"नाहीये s"
"डोळ्यासमोर असलेली गोष्ट सापडत नाही तुला.. हे काय"]

हा एक छान विडिओ आहे Inattentional blindness समजावण्यासाठी. 

मन आपल्याला सांगत असतं खुश राहण्यासाठी अमुक अमुक गोष्टींची गरज आहे. घर, गाडी, चांगली नोकरी, खूप पैसा इत्यादी इत्यादी. पण या सर्वात आपण छोट्या छोट्या गोष्टी अनुभवत नाही ज्या चांगल्या आठवणी बनवू शकतात. आपल्याला खुश ठेऊ शकतात. 
मोकळं निरभ्र आभाळ, उडणारे पक्षी, फुललेलं एखादं टपोरं फुल, कॉफीचा वास या सर्व गोष्टी क्षुल्लक दिसतात वरवर.  शेवटचं केव्हा आपण त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलंय? 
चांगल्या आठवणी बनवता येतात.  
प्रयत्न करावा लागतो.