शुक्रवार, २६ जून, २०२०

भाषा


मला शब्दांचं फार कुतुहूल आहे. एकच शब्द पण त्याचा दोन वेगळ्या भाषांत  वेगळा अर्थ. 'आवडे' या शब्दाचा मराठीत अर्थ आवडणे असा तर गुजरातीत 'येणे' किंवा 'समजणे' असा. तेलगू मध्ये 'वेडी' चा अर्थ 'गरम' असा होतो.
काही भाषा खास secretly गुफतगू करण्यासाठी. उदा. रफ ची भाषा किंवा 'च' ची भाषा. आपल्या दोघांना एक सीक्रेट भाषा येतेय आणि ती कुणालाही decode करता येत नाही हा केवढा आनंद. माणसांप्रमाणे कॉम्पुटरचीही वेगळी भाषा असते. पण त्याबद्दल नंतर कधीतरी.

भाषा माणसे जोडण्यासाठी असतात असा आपण मानून चालू. पण केव्हापासून भाषा आपल्या सामाजिक दर्जाच्या मापदंड ठरल्या? अमुक एक शुद्ध प्रमाण भाषा आणि अमुक एक अशुद्ध. कागदचं अनेकवचन कागदच (का पण?). एखादी भाषा श्रेष्ठ. एखादी हलकी. का पण?
सगळ्यांना कळण्यासाठी काही नियम हवेत हे मान्य. आपण व्याकरणाच्या चुकांत माणुसकी हरवत चाललो.
मेलेला हत्ती व्याकरणाने नाही चालवता येत किंवा जिवंतही. (त्याला माहूत लागतो)

जी भाषा आपली नाही तिला शिकून मातृभाषेचा तिटकारा करू लागलो.
लहान बाळाला 'गाय कशी करते?' च्या ऐवजी 'काऊ कशी करते?" 'ती बघ कॅट"
नंतरच्या टप्प्यात मग "होमवर्क फिनिश केला का?"
"आज आम्ही एग खाल्लं"

जगाच्या पाठीवर असेही काही पाडे असतील जिथे वैश्विक इंग्रजी भाषेचा गंधही नसेल. बदलत्या सामाजिक गणितांसोबत   स्थलांतर, जागतिकीकरण अशा अनेक कारणांमुळे भाषांचा मृत्यू ओढवतोय. एका अहवालानुसार तर दर दोन आठवड्यांनी एक भाषा मृत्यू पावते. भाषा मरते म्हणजे नेमकं काय होतं? तर त्या भाषेबद्दलची सामाजिक अवकाशातली माहितीच नष्ट होते. त्या भाषेतील शब्द, त्यांचे अन्वयार्थ, बोली साहित्य, लहजा सारंच गायब.  Wikitongues हा प्रकल्प जगातील हरेक भाषेचे  डॉक्युमेंटेशनच काम करतोय.  त्यांच्या संकेतस्थळावर विविध भाषांचे विडिओ पहायला मिळतात. ज्या भाषा आपण कधी ऐकल्याही नसत्या.


माझ्या एका मित्राने त्याच्या आईच्या आवाजातील जात्यावरच्या ओव्या संकलित केल्यात. हे खूप मोठं संचित आहे.
मातृभाषेला आईच्या पदराची उब असते.





शुक्रवार, १९ जून, २०२०

आठवणींचा पोत


कसुओ इशीगुरोच्या एका पुस्तकाचा review द्यायचा होता त्यावेळी त्याच्या लेखनप्रक्रियेविषयी खूप वाचलं होतं. एका लेखात त्याने असं सांगितलेलं कि त्याला 'texture of memory' सोबत खेळायला आवडतं . या शब्दाला आपण मराठीत 'आठवणींचा पोत' असं म्हणू. कथेतील पात्रांना कुठल्या गोष्टी बारकाईने आठवतील आणि कुठल्या आठवणार नाहीत, काहीक आठवणींना  भावनांचं असं आवरण असेल कि आठवतंय तसे कदाचित घडलेलं नसेलच (मनाचे खेळ वगैरे) किंवा अमुकच गोष्टी सिलेक्टिव्हली का आठवत असतील? अशा अनेक प्रश्नांनी आपण घेरले जातो. 

खऱ्या आयुष्यातही असे बऱ्याचदा घडते. अचानक एके दिवशी बालपणातील किंवा कॉलेजच्या दिवसांतील काही आठवतं आणि तेच का आठवलं याचा प्रश्न पडतो. बालपणी एखादी हरवलेली गोष्ट का प्रकर्षाने आठवावी ? हरवलेली छत्री, कंपासपेटी आणि माणसे! सणासुदीला लहानपणीच वारलेल्या मुलाची आठवण येऊन एखाद्या आजीचे डोळे या वयातही पाणावतात.
वर्षोनुवर्षं संपर्कात नसलेल्या किंवा आता कुठे असेल याची जराही कल्पना नसलेल्या मित्राचा / मैत्रीणीचा  चेहरा का डोळ्यासमोर यावा? बरं मग माणसांना मृत्युशय्येवर असताना नेमकं काय आठवत असेल? आयुष्याचा चित्रपट फास्ट फॉरवर्ड मध्ये डोळ्यांसमोरून जात असेल का? का काही वयस्कर माणसे लगेच हळवी होतात?  

आपल्या रोजच्या जगण्यातील सर्वच गोष्टी आठवणींचा भाग होतात असेही नाही. ज्या गोष्टींकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देतो त्याच गोष्टी हळूहळू अंतरी झिरपतात. Inattentional blindness म्हणून मानसशास्त्रात एक कन्सेप्ट आहे.  एखादी गोष्ट आपल्या नजरेच्या टप्प्यात असतानादेखील आपल्याला ती दिसत नाही कारण आपलं लक्षच नसतं किंवा लक्ष भलतीकडेच असतं. 
[उदा:
"आई, माझं घड्याळ कुठंय?"
"आहे तिथेच टेबलावर. "
"नाहीये इथे"
"नीट बघ. सापडेल" 
"नाहीये s"
"डोळ्यासमोर असलेली गोष्ट सापडत नाही तुला.. हे काय"]

हा एक छान विडिओ आहे Inattentional blindness समजावण्यासाठी. 

मन आपल्याला सांगत असतं खुश राहण्यासाठी अमुक अमुक गोष्टींची गरज आहे. घर, गाडी, चांगली नोकरी, खूप पैसा इत्यादी इत्यादी. पण या सर्वात आपण छोट्या छोट्या गोष्टी अनुभवत नाही ज्या चांगल्या आठवणी बनवू शकतात. आपल्याला खुश ठेऊ शकतात. 
मोकळं निरभ्र आभाळ, उडणारे पक्षी, फुललेलं एखादं टपोरं फुल, कॉफीचा वास या सर्व गोष्टी क्षुल्लक दिसतात वरवर.  शेवटचं केव्हा आपण त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलंय? 
चांगल्या आठवणी बनवता येतात.  
प्रयत्न करावा लागतो.