गुरुवार, २ एप्रिल, २०१५

क्रिकेटचं वेड आणि करप्शन वाली चाय

१. भारत अपेक्षेप्रमाणे सेमीफायनल मध्ये हरला आणि लाखो क्रिकेटप्रेमींचा मूड गेला. काहींनी तर प्रेमभंग झाल्यासारखा चेहरा केला. संध्याकाळी साडेचार नंतर सर्वत्र काहीतरी दु:खद  घडलंय असाच माहोल होता. गजबजलेला चर्चगेटचा परिसरही त्या दिवशी संध्याकाळी दु:खद वातावरणात असल्यासारखा वाटत होता. अनेकांनी विराट आणि त्याची प्रेयसी अनुष्काला शिव्या घातल्या. या दिवसभरात अनेक व्यक्ती भेटल्या ज्या क्रिकेटच्या अक्षरक्ष: वेड्या होत्या. सकाळी अंघोळ करून TV ची पूजा करून मगच  स्टार स्पोर्टस लावणारा किरण ट्रेनमध्ये भेटला. कामावर न येण्याचे असंख्य बहाणे त्याने बॉसला सांगितले होते, पण बॉसने "आज आला नाहीस, तर घरीच बस" असा प्रेमळ ओरडा दिल्यामुळे तो नाराजीतच कामाला चालला होता. कानात रेडिओवरची कमेंट्री. मिनिटागणिक ऑस्ट्रेलियाचा वाढत चाललेला स्कोर पाहून त्याचा चेहरा पडला होता.
आमच्या ऑफिसमधील लिफ्टमन असलेल्या काकांनी दिवसभर लिफ्टमध्ये चढणाऱ्या प्रत्येकाला "स्कोर काय झाला?" विचारून भंडावून सोडले होते. संध्याकाळी सामना हरल्याचे दु:ख व्यक्त करताना मला म्हणाले, "सरांनु आज मी जेवलोच नाही"
"का ?"
"टेंशन"
"कशाचं ?"
"अहो म्याचचं टेंशन ! इंडिया हरली म्हणून आज जेवलोच नाही"
"अहो मामा, एवढं टेंशन त्या धोनीला पण आलं नसेल."
मग त्यांनी तरुणपणापासून आपण क्रिकेटपायी काय काय केलं ते सांगू लागले.
भारत - पाकिस्तानचा सामना पहायचाय म्हणून दहावीचा पेपर बुडवून घरी बसले. एकदा रस्त्यातून चालताना चपलेचा अंगठा तुटला म्हणून चप्पल हातात घेऊन अनवाणी चालू लागले. एका TVच्या शोरूम समोरील गर्दीत उभे राहून तासभर क्रिकेट बघितल्यावर निघताना लोकांना हे चप्पलचोर वाटले. तेव्हा लोकांना समजावताना ह्यांना नाकी नऊ आले.  क्रिकेटपायी आजूबाजूचे सगळे भान विसरणारी असली माणसे -आयुष्यात ह्यांनी कधी क्रिकेटची ब्याट हाती धरली नसेन पण क्रिकेटपटूंनी कसे खेळावे याचे धडे चारचौघात देणार.
माझ्या एका दूरच्या काकाने त्याच्या लहानपणी  कमेंट्री करणाऱ्या माणसांना पहायचय म्हणून  रेडिओ खोलला होता. त्यात  माणसे तर  सापडली नाहीतच मात्र ह्यांनाच मोठ्या माणसांनी आमानधमकी दिली.
यंदाचा विश्वचषक भारतच जिंकणार असे सुरवातीपासून सांगणाऱ्या माझ्या एका मित्राने भारत हरल्यावर "बरं झालं सेमी फायनल मध्ये हरलो ते. फायनलमध्ये जाऊन हरण्यापेक्षा हे बरं !" ही प्रतिक्रिया दिली.
त्या बिचार्या क्रिकेटपटूंच्या विरोधात निदर्शने केली गेली. माध्यमांत लोकांनी असंतोष व्यक्त केला. क्रिकेटपटूंच्या घराभोवतालची सुरक्षा वाढवावी लागली. हे दुर्देवाचे आहे. प्रेक्षक म्हणून आपण जसे नाट्य, सिनेमा याबाबत immature आहोत तसेच क्रिडारसिक म्हणूनसुद्धा.

२. 
ऑफिस मधील सगळ्यांचा उतरलेला चेहरा पाहून प्यूनला सगळ्यांसाठी  चहा आणायला सांगितला.
"इंडिया  की हार कि ख़ुशी में सर चाय मंगवा रहे है" शर्मा.
"हाहाहा" वातावरणात जरासे हास्य.
चहा नेहमीपेक्षा कडक होता.आमचे  कॅन्टीनवाले केव्हापासून असा चहा बनवायला लागले?
"ओ शर्माजी,आज चाय कहाँ से लाये?"
"सर, ये करप्शनवाली चाय हैं"
"तनिक मतलब बताय दो"
"सर इस चाय का पैसा कैंटीनवाले अन्ना के बजाय चाय बनानेवाले के पास गया है"
"मतबल ?"
"कैंटीनमें जो चाय बनाता है वो स्पेसल चाय बनाके देता हैं अदरक इलायची ज्यादा डालकर। अन्ना को पता नहीं रहता"
या चहाला "करप्शनवाली चाय" असे नामकरण करणाऱ्या प्यूनच्या कल्पकतेचे कौतुक वाटले.
भष्ट्राचार असा छोट्या छोट्या गोष्टींत सामावून आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालाय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा