रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

चप्पल

काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमधे एक इमारत कोसळली तेव्हाची गोष्ट. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना  काढताना  प्रसारमाध्यमे Live दाखवत होती.  ७२ तास ढिगाऱ्याखाली असलेल्यांच्या जिवंत असण्याविषयीच साशंकता होती. त्यात या संकटातून वाचलेल्यांच्या मुलाखती चालू होत्या. 'आपको अब कैसा लग रहा है ?' सर्वात फालतू प्रश्न. जीवावरच्या संकटातून वाचलेल्याला काय वाटणार?
माणसे रडत होती. एकाने मोबाईल फोनमुळे आपण वाचलो असे सांगितले, एकाने आपण जगणार असल्याची आशाच सोडली होती, पण वाचलो असे सांगितले,  तेवढ्यात बचावदलाने आणखी एका जिवंत माणसाला बाहेर काढताच पत्रकारांचा आणि कॅमेरावाल्यांचा ओघ तिकडे सरसावला. त्या माणसावर फोकस करून परत तोच प्रश्न विचारला - 'आपको अब कैसा लग रहा है ?' त्या माणसाने बावचळल्यासारखे केले आणि बचावदलातील एका माणसाला विचारले 'मेरी चप्पल किधर है?'
Pause.
सगळे अचंबित.
इतक्या मोठ्या संकटातून वाचलेल्या माणसाला स्वतःच्या जीवाचे मोल नसून एका शुल्लक चपलेचे आहे असे वाटले. दुसऱ्या दिवशी बहुतेक सर्व वर्तमानपत्रांनी ही घटना प्रकाशित केली.
चपलांवरून असे अनेक किस्से आठवले.


***

पुलंच्या 'गुळाचा गणपती' चित्रपटात एका प्रसंगात मोठी जाहीर सभा घडतेय असे त्यांना दाखवायचे होते, पण इतकी माणसे आणणार कुठून ? त्यांनी एक शक्कल लढवली. शूटिंगला जमलेल्या सर्वांना त्यांच्या चपला काढून त्यांचा ढीग बनवायला सांगितला. सभेला येणारा प्रत्येकजण बाहेर चप्पल काढून आत जातोय असे दाखवले. background ला नेत्याचे भाषण ऐकू येतेय. खऱ्याखुऱ्या सभेचे चित्र उभे राहिले.

*** 

IBN लोकमत वर 'यंगिस्तान जिंदाबाद' हा चर्चासत्राचा  कार्यक्रम लागतो. आजच्या तरुणाईला भेडसावणारे प्रश्न त्यात मांडले जातात. ग्रामीण , शहरी भागातील तरुण मुले ह्यात आपले विचार मांडतात. मागे एकदा विषय होता 'देव आहे की  नाही?' यावर खडाजंगी झाली. बरीच मते मांडली गेली. मूळतः हा विषय फार प्राचीन आहे, आस्तिक, नास्तिक, विज्ञानवादी असे बरेच गट आहेत. एका मुलाने मी देव का मानत नाही याचे विश्लेषण करताना उदाहरण दिले कि. 'मी देवळात गेलो, देवाचे दर्शन घेतले. बाहेर आलो तर माझी चप्पल गायब ! जो देव माझ्या चपलेचे रक्षण करू शकत नाही तो माझे रक्षण कसे करणार ?'
यावर एक हशा आणि बऱ्याचशा सहमतीसाठी डोलावलेल्या माना.
 पांडुरंगशास्त्री आठवलेंनी एकदा म्हटलं होतं 'तुमच्या चपलांची रक्षा करायला देव आहे का? ज्याने ही भव्य, सुंदर सृष्टी निर्माण केली, जो तुमचे हृदय चालवतो, बाळ जन्माला येताच पहिला श्वास कसा घेते हे अजून विज्ञानालाही सुटले नाही असे कोडे आहे त्या चिद्घन शक्तीवर चप्पल चोरीला गेली म्हणून अविश्वास दाखवता?'

***
गेले ते दिन गेले जेव्हा मोठा भाऊ राम वनवासात गेला म्हणून धाकट्या भरताने प्रभू रामचंद्रांच्या पादूका सिंहासनावर ठेऊन राज्य केले. आता लोकशाही व्यवस्थेत निरंकुश सत्ता भोगणाऱ्या राज्यकर्त्यांकडे स्वतःच्या चपलांसाठीच वेगळे सदन असते.
राज्यकर्त्यांवर चप्पल फेकून मारणे ही आजच्या काळातील असंतोष व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. 

***

कमलेश्वर हे हिंदीतले नावाजलेले लेखक. त्यांची 'चप्पल' ही कथा माझी अत्यंत आवडती. उपहासात्मक कसं लिहावं याचा वस्तुपाठ त्यांचे लेखन वाचताना मिळतो. 'चप्पल' या कथेत लेखक त्याच्या आजारी नातेवाईकाला भेटायला हॉस्पिटलमधे जातो , तिथल्या रुग्णांच्या वेदनांनी तो हेलावून गेलाय, त्याला जन्म - मृत्यू - ईश्वर याबद्दल विचारमग्न केलंय.  लिफ्टमधे त्याची भेट एका सात - आठ  वर्षाच्या लहान मुलाशी होते, त्याला व्हीलचेअरवर बसवलंय आणि त्याच्या पायातील निळ्या हवाई चपलांवर त्याचे विशेष प्रेम आहे, लिफ्टमधून बाहेर पडताना जेव्हा त्याची एक चप्पल मागे पडते तेव्हा त्यासाठी तो बाबांना गळ घालतो. त्याच मुलाचे दर्शन तीन तासांनी लिफ्टमधे स्ट्रेचर वर होते, यावेळी त्याचा एक पाय कापला गेलाय, तो बेशुद्धावस्थेत आहे. त्याच्या निळ्या हवाई चपला बाबांच्या हातात आहेत. ते काहीतरी विचार करतात आणि लिफ्टमधून बाहेर पडल्यावर त्या कोपऱ्यात फेकून देतात आणि क्षणभरानंतर परत उचलतात त्यांना बहुतेक वाटत असावं शुद्धीत आल्यावर तो चपला मागेल. कमलेश्वर म्हणतात, तो परत शुद्धीत आल्यावर चपला मागेल कि स्वतःचा कापलेला पाय ?
एका प्राचीन संस्कृतीचा भाग असल्यामुळे वेदनांना सामोरं जाण्याचं धैर्य येतं किंवा त्या वेदनांना 'पुनर्जन्म' नावाचं गोंडस उत्तर देऊन मनाची समजूत घालता येते.

***

'व्यक्ती आणि वल्ली' मधे 'चितळे मास्तर' वाचताना शेवटची ओळ मनाला चटका लावून जाते -
''मुकुंदाच्या दारातल्या चपलांच्या स्टेंडवरून मास्तरांच्या चपला शोधून काढणे अवघड नाही गेले - - कुठल्याच चपलांच्या टाचा इतक्या झिजलेल्या नव्हत्या !''




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा