गुरुवार, १७ जुलै, २०१४

आठवणींचा कोलाज - पाऊस

धो-धो पाऊस कोसळतोय. पाठीवर दप्तर आणि रेनकोट घालून मी आणि माझा भाऊ आम्ही शाळेत जातोहोत. थोडीशी थंडी वाजतेय पण आईने आताच भरून दिलेल्या डब्यातील खाऊ मधल्या सुट्टीत खाणार आहोत या कल्पनेने ऊब वाटतेय. छोटा भाऊ पाण्याने भरलेल्या डबक्यात उड्या मारतोय, पाणी उडवतोय  आणि मी मोठेपणाचा समंजस आव आणून त्याला दटावतोय. मला पण त्या पाण्यात उड्या मारायच्या आहेत पण काल बाईंनी सांगितलेलं अजून डोक्यातून गेलेलं नाही की या पाण्यात किती प्रकारचे जीव जंतू असतात आणि त्यांच्यामुळे पायाला infection होऊ शकतं वगैरे. बाईंनी आमच्या डोक्यात ते जीव जंतूंच खूळ घातल्यामुळे लहानपणी पाऊस नीट एन्जोयचं करू शकलो नाही.
                                                                              ***

मुसळधार पावसामुळे शाळा लवकर सोडली की मग धमाल.  मुद्दाम भिजत घरी यायचं. आईसमोर मुद्दाम शिंका काढायच्या मग आपली सरबराई कशी होते ते पहायचं. आई पावसाला दूषणं देत राहणार. मग गरम गरम मुगाची खिचडी किंवा कुळथाच्या पिठाची पिठी आणि भात खाताना background ला बाहेर कोसळणारा पाऊस असायचा. चार गरम घास पोटात गेल्यावर 'याच साठी केला होता अट्टाहास' असे वाटे.
                                                                               ***

नी. गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धेचा दुसरा दिवस.  उत्स्फूर्त फेरी. मला  चिट्ठीत  मिळालेला विषय होता 'ये रे ये रे पावसा'.
compulsorily ललित बोलायचं होतं, डोळ्यासमोर मेघ दाटले. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. इतक्या लोकांसमोर बोलताना वाटलेली भिती आठवली कि जाम हसायला येतं.  कशीतरी वेळ मारून नेली - राधेच्या वत्सल डोळ्यांतला पाऊस, ग्रेस ची 'पाऊस कधीचा पडतो' ते 'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' वगैरे बोललेलो आठवतेय. पावसाने जाम गोची केली होती तेव्हा.बक्षीस मिळालं नाही पण याच भीतीमुळे आणखी चांगली भाषणे करण्याची उर्जा दिली.

                                                                                ***
२६ जुलै, २००५. अकरावीचं कॉलेज नुकतच सुरु झालेलं. आणि त्या दिवशी पावसाचा नूर काही वेगळाच. रात्री पडला तो पडलाच पण सकाळी पण उसंत नाही. छत्रीवर  बंदुकीच्या गोळ्या येताहेत  असा आवेग.  दुपारपर्यंत सर्व मुंबई जलमग्न झाली. कॉलेज लवकर सोडलं. घरी कळवावं तर कसं. फोन करावा तर मोबाईल नाही. वाटेत गुडघाभर पाणी. हायवे वर पिवळ्या रंगाचा  एकच PCO आणि त्यापुढे किमान २० लोक रांगेत. रांगेत उभा राहून अर्ध्या तासाने नंबर आला. घरी आईला कळवलं की सुरक्षित आहे, काळजी नसावी. त्या दिवशी  पावसाने भयंकर रूप दाखवलं. माणसांनी एकमेकांना या परिस्थितीत खूप मदत केली, कुणी बिस्कीटचे पुडे वाटले, कुणी राहायला जागा दिली. संध्याकाळी थंडीने कुडकुडत घरी पोहोचलो.  आज त्याच कॉलेजमध्ये मी ग्रंथपाल आहे. हायवेवरचा तो PCO आता नाही, त्या दिवसाच्या आठवणी अजून अंगावर काटा आणतात.
                                                                              ***
एका टप्प्यावर कॉलेज हेच दुसरं घर झालं होतं. फेस्टिवल्स, स्पर्धा, NSS, मराठी वाड्ग्मय मंडळ, स्वतः jointly स्थापन केलेला 'कॉलेज कट्टा' यामुळे घरी फक्त पहाटेची अंघोळ आणि रात्रीची झोप याचसाठी जावं लागे. आपण हे सर्व व्यक्तिमत्व विकासासाठी करतो आहोत अशी तद्दन फालतू समजूत नव्हती. त्या दिवसांनी चिरकाल टिकणाऱ्या आठवणी दिल्या. त्या दिवसांत शिकलेल्या गोष्टी आणि मूल्ये अजूनही जगताना कामी येतात. पावसात कॉलेज कॅन्टीन गप्पांचा अड्डा बने.  कॉलेजच्या गेटबाहेर प्रभाची टपरी आहे त्याला लागून अण्णाची चायची गाडी आहे. पावसात चायची तल्लफ झाली तर तिथे कटींग मारायची आणि आल्याच्या तिखटजाळ चायने तोंड पोळून घ्यायचं. आयुष्यात पुढे काहीच नाही झालं तर अण्णा सारखी चायची टपरी टाकता येईल अन जगता येईल असा आत्मविश्वास दिला. त्याच्याकडे काचेच्या बरण्या भरून खारी, बिस्किटे असायची. एक खारीचा तुकडा आणि आणि एक कटिंग असा नाश्ता केल्यावर किमान दोन लेक्चर्स काळजी नसायची. कधी जिवलग मित्र चायचा वाटा उचलायचे कधी 'खारीचा'.

                                                                               ***
पाऊस खूप पडला तर बाल्कनीत कुडकुडनाऱ्या चिमण्या येउन बसायच्या. त्यांना लांबूनच पहावे लागे, जवळ गेल्यास  पुन्हा पावसात जायच्या घाबरून. काही धीट तशाच थांबायच्या. आईने आणि मी विचारांती निर्णय घेतला-
बाल्कनीत चिमण्यांसाठी लाकडी खोका ठेवला उंचावर.  घरटं बांधायला.  पावसाची सर त्यांच्या घरट्यावर पडू नये म्हणून काळजी घेतली.  त्यात चिमणं जोडपं राहायला आलंय. हे आमचे नवीन शेजारी पहाटे चिवचिवाट करून उठवतात. मग त्यांना तांदळाच्या कण्या घालायच्या. त्या निमित्ताने बऱ्याच चिमण्या खिडकीत जमा होतात.


                                                                               ***
मध्यंतरी इंद्रायणीने पुण्याला जाऊन आलो. मुंबईपासून पावसाने जी सोबत केली ती शिवाजीनगर येईपर्यंत.  साडेपाचचा अंधार आणि तो हळू हळू वितळत चाललेला. पावसामुळे खिडकीच्या काचांवर थेंब थेंब जमा व्हायचे आणि त्यांची सलग धार बनून खाली पडायची. माझ्या शेजारी बसलेल्या बाईंसोबत लहान मुलगी होती. तिची आणि माझी छान ओळख झाली. ती माझ्यासमोर उभी राहून त्या दंवाने भिजलेल्या काचेवर नक्षी काढत होती.  त्या नक्षीत ती काय काढतेय हे मी निरखून पाहू लागलो. पहिल्यांदा तिने स्वतःच नाव काढलं. पुन्हा दंव जमा झाल्यावर तिने होडी काढली. आणि थोड्या वेळाने घर. मी तिला विचारलं- 'होडी चालवणार कोण?' त्यावर तिचं उत्तर 'त्यात काय अवघड आहे.  ती आपोआप चालते' आपण फक्त पाणी द्यायचं'. 'मग तू होडीनेच का नाही जात पुण्याला?' तर तिने आईकडे बोट दाखवत म्हटलं 'हिच्यामुळे. ही खूप घाबरट आहे म्हणून'.

                                                                             ***
मित्रांचा अड्डा जमलेला. जुने दोस्त बऱ्याच वर्षांनी भेटलेले. रात्री जेवणं झाली तरी गप्पा थांबेनात. पाऊस खूप पडतोय म्हणून सर्वांनी थांबायचं ठरवलं . ज्याच्या घरी थांबलो होतो त्याने घरी कुणी नाही म्हणून आमंत्रण दिलेलं. त्याला बहुतेक याचा पश्चाताप होत असावा. रात्रभर फालतुगिरी चाललेली. अडीच वाजता कॉफी पिता पिता एकमेकांच्या जमलेल्या, फसलेल्या प्रेमकहाण्या चर्चेला आल्या आणि ज्यांच्या डोळ्यावर झोप आली होती ते पण जागे झाले.  घरभर कॅप्स्टनचा धूर दाटलेला. एक छोटा ढगच जणू.
'तुला बाहेर पडणाऱ्या पावसाची शपथ, खरं सांग. . कोणय ती?'
'अरे पावसाची शपथ घालू नको. . आपल्याला दुष्काळात राहावं लागेल.'
पावसाची गाणी रात्रभर चाललेली.  सातारी भाषेत 'नुसता राडाच'. 

२ टिप्पण्या: