मंगळवार, २३ सप्टेंबर, २०१४

रोजच्या जगण्यापल्याडचं जग

"ऐक ना नव, खूप मस्त अनुभव असतात रे या भटकंतीचे ! आम्ही सध्या खेड्यापाड्यातल्या शाळांत जातोहोत, जिथे पोचायला धड रस्ता नाहीये, तालुक्याच्या ठिकाणापासून अगदी आतमधे असणार्या या शाळा. तिथल्या मुलांपर्यंत विचार पोचवतो आहोत. या भेटींत नवी जागा पाहायला मिळते, माणसे भेटतात. . मुलं तर मुलंच. कुठलीपण. आपलं बालपण आठवायला लावणारी. दंगामस्ती करणारी.
त्यांच्याशी गप्पा मारताना एक वेगळाच दृष्टीकोन मिळतो. मी माझ्या सत्राची सुरुवात खेळीमेळीने करतो, त्यांना त्यांच्या भाषेतच बोलतं करतो. हळू हळू मुलं त्यात गुंतत जातात. तेव्हा त्यांच्या चेहर्यावरचं समाधान पाहून मजा येते यार. आपण बोललेलं कुणीतरी लक्ष देऊन ऐकतंय हे कळलं, की आपल्याला पण बोलण्याचा हुरूप येतो. या गप्पांत मुलं जे प्रश्न विचारतात ते तू ऐकलेस ना तर तुला पण आश्चर्य वाटेल. एका सातवीतल्या मुलीने मला विचारलं "सर, हे मन नेमकं असतं कुठे?" मी तर क्लीन बोल्ड. आपण मारे मनाच्या स्वास्थाविषयी बोलायचं, मनाच्या श्लोकाचा दाखला द्यायचा भाषणात, पण मन कुठे असतं, शोधलं का कधी?
ती मुलं सात आठ किलोमीटर चालत येतात शाळेत आजूबाजूच्या गावांतून. संध्याकाळी साडे पाच वाजले कि यांचा घोळका काट्याकुट्यातून वाट काढत दिवेलागणीपर्यंत घरी पोचायला निघतो. पहिल्यांदा original सूर्यास्त आणि सूर्योदय  पाहिला या दौर्यात आणि कातरवेळ कशी असते तेही अनुभवलं रे मित्रा. मस्तच.
आपण फार मोठे वक्ते आहोत या माझा गर्व मोडला या भटकंतीत. आपण शब्दांच्या फुलोर्यांनी भले महाराष्ट्रातल्या अनेक वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या असतील पण नि:शब्द करायला लावणारे प्रेम आणि आपुलकी काय असते, इथे कळलं. रात्री निवांत घोंगडी पांघरून मोकळ्या आभाळात तारे पाहण्यात अजब मजा आहे.
शाळेत माझं व्याखान संपलं कि, मी मुलांकडे उगाच गुरुदक्षिणा मागतो, मस्करीत. त्यांनी मला काही द्यावं ही अपेक्षा नाही पण त्यांची reaction पाहण्यासारखी असते. सधन तालुक्याच्या शाळांतली मुले सहज तयार होतात, "देऊ की, काय हवंय सांगा सर?" म्हणतात. परवा एका शाळेतली मुलं मात्र वेगळी होती. आई-वडील मजुरीवर जाणारे. त्यांच्याकडे गुरुदक्षिणा मागताच त्यांचा चेहरा सपशेल पडला. अगदी शांतता. आता सरांना काय द्यायचं असा विचार त्यांच्या मनात आला असेल. मी पण हे समजून लगेच विषय बदलला.
शाळेच्या मुख्याध्यापकांच्या छोट्याशा खोलीत गुळाने गुळमाट ठाण केलेला चहा कसाबसा संपवायच्या बेतात असताना आणि सरकारी निधी कसा मिळत नाही यावर हो हो करत असताना एक शिक्षक आत आले आणि मला म्हणाले. "सर, एका मुलीला तुम्हाला भेटायचंय". मी म्हटलं, "पाठवा कि तिला आत". एक धीट मुलगी आत आली. शिक्षक म्हणाले,"सर ही नववी 'अ' मधे आहे, तिला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायचीय." तिने आपल्या मुठीत दुमडलेली दहाची नोट मला देऊ केली. मला काय बोलू कळेनाच. अरे या मुलांसाठी दहा रुपये म्हणजे फार मोठी रक्कम. सगळ्या हौसमौजा पैशापाशीच येउन थांबतात. लिनेनचा आठशेचा शर्ट सहज विकत घेतो आपण दर महिन्याला, येथे वर्षाला दोन युनिफोर्म वापरायचे शाळेसाठी. इस्त्री हा प्रकार नाही. basic गरजाच भागवायला इतके कष्ट घ्यावे लागतात.  अशा वेळी एक चिमुरडी मला गुरुदक्षिणा म्हणून दहा रुपये देतेय, जे की तिने किती दिवस जपले असतील काहीतरी घेण्यासाठी. मला तिला दुखवायचं नव्हतं पैसे नाकारून. मी ते घेतले आणि तिला एक पुस्तक भेट दिलं.
मी ती दहाची नोट जपून ठेवलीय. धाड्कन मी जमिनीवर येतो ती नोट पाहून. degree चा आणि शहाणपणाचा संबंध नाही हे कळलंय."
***


"ऐक ना नव Counselling करताना ज्याम धमाल येते यार."
 ही जी मुलं आहेत ना, कसली हलकट आहेत. पण तितकीच गोड. त्यांच्याशी बोलणं सुरुवातीला कठीण गेलं. पण नंतरच्या sessions ला जेव्हा काही games घेतले तेव्हा त्यांची कळी खुलली. तुला तर idea आलीच असेल त्यांना गेल्यावेळी भेटलास तेव्हा. एकदम व्यक्त होत नाहीत रे  कुणाशीही. आपलं माणूस कुणी नाही म्हणून किंवा आई वडील नसल्याचं दु:ख असेल. त्यांची पार्श्भूमी संस्थेच्या register मधे आहे. पण मला ती मुलं त्यांच्या भूतकाळाला कशी पाहतात हे पहायचं होतं, मनात काही शल्य आहे का?, न्यूनगंड आहे का?, तिरस्कार आहे का? हे जोखायचं होतं. मग मी आताच्या session ला प्रत्येकाला एक चित्र काढायला सांगितलं. रंग दिले, कागद दिला. चित्रात एक निळी नदी काढायचीय, आणि ही नदी म्हणजे तुमचं आयुष्य आहे असं सांगितलं.  आता या सरळ प्रवाही नदीला कुठे वळण लागलं, कुठे खूप मोठा  बदल घडवणारा प्रसंग घडला ते काढायचं.  आणि ते त्या वळणाच्या बाजूला थोडक्यात लिहायचं. साल आठवत असेल तर ते पण लिहा. काही चांगलं घडलं असेल, ते पण लिहा. वळणावळणाची नदी.निळीशार. खडूने काढलेली रखरखीत.
मुलं गुंतली चित्र काढण्यात. आता चित्र काढून झाल्यावर एकेकाला बोलावलं आणि चित्र explain करायला लावलं.

एकाने सुरुवातीलाच नदीच्या उगमाजवळच लिहिलेलं "आई जन्म देतानाच मेली"
पुढचं वळण दोन वर्षांनी "बाबा मेले".
पुढचं वळण आठ  वर्षांनी "काका काकूंच्या त्रासाला कंटाळलो आणि मुंबईला आलो"
मग आता संस्थेत.

एकाने काढलेलं पहिलं वळण - "आईला बाबांनी मारलं"
मला वाटलं domestic violence असेल, पण नाही रे.  इथे खून केला होता, तोही चिमुरड्या मुलासमोर. भयानक.
मग "बाबा तुरुंगात"
मग मोठं वळण "बाबांचा मृत्यू".  बाबांविषयी तिरस्कार नाही. त्यांनी दारूच्या नशेत आईला मारलं, तसे ते चांगले होते असा म्हणाला. वाढदिवसाला सायकल आणली होती ही चांगली गोष्ट.
आई जेवण चांगलं बनवायची. संस्थेतल्या जेवणाला तिच्या हातची चव नाही.
संस्थेत येउन चांगल्या विद्यार्थ्याचा पुरस्कार मिळणं हे आताचं आयुष्याला मिळालेलं मोठं वळण.

एका दंगेखोर मुलाने नदीत मासे काढले होते, बोट काढली होती. आजूबाजूला निसर्ग म्हणता येईल अशा गोष्टी पण काढल्या होत्या. इथे नदी सरळ होती. एकही वळण नाही. कसं शक्य आहे. त्याला बोलावलं. तेव्हा त्याचा डायलॉग  "दीदी, अपुन कि जिंदगी एक खुली किताब है, ऐसे एक painting मे नही आयेगी" एक नंबर चाप्टर. बघतेच त्याला नंतरच्या session ला.
काही जण गुन्हेगारी background चे. अनाथ म्हणून गुंडांच्या तावडीत सहज सापडलेले.  आपण चोरी करायचो हे accept केलं काहींनी. बहुतेकांच्या नदीला संस्थेत मोठं वळण मिळालं होतं.

त्यांच्याशी बोलून कळलं की जगणं सोपं नाहीये. तू एक शेर सांगितलेलास सुरेश भटांचा "मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते".

आपल्या सरळसोप्या आयुष्याला इतकी वळणं परवडणार नाहीत. साध्या साध्या गोष्टीनी खचणारे आपण.
या मुलांनी हे कसं पचवलं असेल? कल्पना नाही करवत.
एक मात्र नक्कीय, या मुलांनी जगण्याचा धीर दिलाय मला."
 ***

२ टिप्पण्या: