गुरुवार, ९ जानेवारी, २०१४

दृष्टी

विरार रेल्वे स्टेशन वर फलाट क्र. १ च्या पुढे फलाट क्र ६ व ७ सुरु होतात. डहाणूला जाणार्या मेमू  इथून सुटतात. तासाभराच्या अंतराने गाडी सुटत असल्याने लोकांना फलाटावर असलेली गाडी पकडणे गरजेचे  वाटते.  नाहीतर मग पुढल्या मेलची वाट पाहावी लागते . गाडी सुटायच्या वेळी  तर जी धांदल उडते ती पाहण्यासारखी असते. गावी चाललेली मंडळी बाजाराचे सामानाचे गाठोडे डब्यात कोंबत असतात.  कुणाचे हमालाशी वाद चाललेले असतात, गाडी सुटणार म्हणून भेळवाल्याकडून कुणाला पटकन भेळ हवी असते, कुणाला आपण पाण्याची बाटलीच विसरलो आहोत याची जाणीव होते. काही बायका घाईत लेडीज डबा कुठे आहे ते शोधत असतात. तरणी पोरं दरवाज्यात उभे राहून काय सिद्ध करीत असतात देव जाणे ! पण त्यांची मस्ती चालू असते.
गाडीचा सिग्नल पडला आणि भोंगा वाजला की कुणीतरी फलाटावरच राहिलेला भिडू धावत पळत गेट पकडतो. दुसरा त्याला हात देतो. ज्याची गाडी सुटली असेल तो आपला हताश चेहर्याने थोडा वेळ गाडीकडे बघतो आणि मग नेहमीचा नसल्यास कुणाला तरी "या नंतर कितीची गाडी?"  असे विचारतो आणि वाट पाहणे सुरु. आणि समजा, गाडी आपल्यासोबत असलेल्या अर्धांगिनीच्या कृपेमुळे सुटली असेल तर तिचा उद्धार होतो. नविन लग्न झालेल्या जोडप्यांना याचा काहीच फरक पडत नाही. त्यांची आजन्म सोबत फलाटावर वाट बघण्याची तयारी  दिसून येते आणि ही जोडपी गर्दीत उठून दिसतात. विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत.
असचं काहीसं होते जेव्हा डहाणूवरुन सुटलेली मेमू  विरारला येते. अशा वेळी जर तुम्ही पूर्वेला जाताना  फलाट क्र ६ व ७ वर असाल तर शहाणपणाचा सल्ला म्हणजे पाच मिनिटं बाकावर बसा. गर्दीच्या विरुद्ध जाऊ नका. पूर्ण फलाट माणसांनी भरून जातो आणि जर तुम्ही या गर्दीतून जाण्याचे धैर्य दाखवत असाल तर  वाटेतील सामानाच्या ढिगाला पूर्ण वळसा घालून जावे लागणे, लोकांचे धक्के खाणे  इ  गोष्टी सहन कराव्याच लागतील.
मला तो मनस्ताप अजिबात नको असतो, म्हणून जर या फलाटावर गाडी येताना किंवा जाताना दिसली की मी लगोलग एक बाक पकडतो. कानात हेडफोन घालून एक पूर्ण गाणं ऐकतो. गर्दी गेली की आरामात जातो.
माणसं का अशी धावतात, कशाच्या पाठी  कळत नाही.  मोबाइलवर पण टेम्पल रन खेळतात.  जिवाच्या आकांताने आपणच पळत आहोत अशी समज करुन  घेतात. असो.
तर काही दिवसांपूर्वी असंच संध्याकाळी सहाच्या  सुमारास घरी परतत होतो. ६ नंबरच्या फलाटावर दूरुन मेमू  येताना दिसली आणि मनात म्हटलं 'चला आता पाच मिनिटं इथेच बसू.. धक्के खाण्यापेक्षा'.  गाडी फलाटाला लागली आणि माणसे नेहमीप्रमाणे धावू लागली.  इतक्यात माझं लक्ष दोन व्यक्तींकडे गेलं.  एक स्त्री आणि एक पुरुष. दोघांच्या हातातील लाल काठीमुळे आणि डोळ्यांवरील चष्म्यामुळे ते अंध आहेत हे लगेच कळलं. एकमेकांचा हात धरला होता आणि ते गर्दीच्या विरुद्ध जात होते. अचानक  दोघांचा हात सुटला आणि कुठे आणि कसं जावं ते त्यांना कळेना. मग मी माझा नियम मोडला. जागेवरून उठलो  आणि त्यांच्याकडे गेलो.  दोघांचाही एकेक हात माझ्या हातात घेतला आणि फलाटावर चालू लागलो.  बाजूने जाणार्या लोकांच्या धक्क्यांची त्यांना पर्वा नव्हती किंवा सवयीचं झाले असेल म्हणा.  आम्ही तिघे असे चाललो होतो.  तीन माणसांनी अशी वाट धरल्यामुळे समोरुन येणारे आधी गोंधळायचे मग लगेच मार्ग बदलायचे.  या दोघांच्या गप्पा चालल्या होत्या. त्या पुरुषांने त्या स्त्रीला विचारलं की  "आज बाईंनी शिकवलेलं कळलं का?" सौजन्याचे नियम दोघेही पाळत होते आणि म्हणूनच कि काय दोघेही नवरा बायको आहेत असं वाटत नव्हते.
 मी मनात म्हटलं की 'कुठल्या यांच्या बाई आणि कुठलं शिकवणं?" त्या स्त्रीने उत्तर दिलं "हो, कळलं की"
"काय शिकवलं आज?" तो.
"आज बाईंनी चपात्या भाजल्यात कि नाही ते ओळखायला शिकवलं, स्पर्श करून.  सकाळी  माझ्या  चपात्या नेहमी करपतात आणि मग मुलांना त्या तशाच डब्यात न्याव्या लागतात.  हे एक बरं झालं आता."
'चपात्या लाटायला केव्हा शिकवलं?" तो.
"डोळे जायच्या आधी मला यायच्या कि हो ! आता सहा महिन्यांपूर्वी नजर गेली.  चपात्या लाटता येतात अंदाजाने.  सुरुवातीला कळायचं नाही.  आता सवय झाली" ती.
एवढ्यात फलाट संपला त्यांना पूर्वेकडे आणलं. रिक्क्षास्टॅंड जवळ तो तिला "चला बाय" म्हणाला आणि गेला.ती पण रिक्क्षासाठीच्या रांगेत उभी राहिली.
आणि मी मात्र त्यांचे संभाषण मनात घोळवत चालू लागलो.
या बाईची दृष्टी आता सहा महिन्यांपूर्वी गेली होती तर.  कशामुळे गेली असेल? कुठला आजार?
म्हणजे सहा महिन्यांपूर्वी ही माझ्याच सारखं पाहू शकत होती.
अचानक दृष्टी  गेल्याने तिला त्रास नक्कीच झाला असणार.  डोळ्यापुढे एकदम अंधार आला असेल.
 घरी लाइट गेली तर क्षणभर बावरल्या सारखं करतो आपण, मेणबत्ती शोधेपर्यन्त.
इथे तर काळोख आता आयुष्याचा सोबती आहे ही जाणीव किती दुःख देणारी असेल?
तशाही परिस्थितीत ही बाई शिकतेय आणि यापुढे चपात्या करपणार नाहीत याचा तिला आनंद आहे.
अशी जगण्याची जिद्द असलेली माणसे कुठे आणि जराशा प्रतिकूल गोष्टीने हात पाय गाळून बसणारे आम्ही कुठे!   कुंतीने कृष्णाकडे असीम दुःख मागितलं होतं. तितकं दुःख मागायचं धैर्य नाहीय रे कुणात ! आमची दुःखे पण छोटीशीच. हसत हसत त्यांना भिडण्याची शक्ती दिलीस तरी पुरे!!

1 टिप्पणी: