मंगळवार, १२ एप्रिल, २०१६

दि हार्ट अँड दि बॉटल

मराठीत बालसाहित्यात हल्ली कुठे नवीन प्रयोग होऊ लागलेत. आपल्याकडे लहान मुलांसाठी असलेली दर्जेदार पुस्तके कमीच आहेत. त्यामानाने इंग्रजी भाषेत  बालसाहित्यात नवनवीन प्रयोग होताहेत. मुलांना लहान वयातच वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या जाणीवा समृद्ध व्हाव्यात यासाठी तिथे प्रयत्न केले जातात. पुस्तकांच्या विषयापासून ते पुस्तक छपाईपर्यंत खोलवर विचार केला जातो. मुलांच्या वयोगटानुसार त्यांनी काय वाचावं, त्यांची शब्दसंपत्ती कशी वाढेल, आजूबाजूच्या जगाची त्यांना ओळख कशी होईल, उत्कृष्ट साहित्याचे लहान मुलांसाठी संक्षिप्तिकरण (Abridged Edition ) जेणेकरून त्यांना साहित्यात रुची वाटेल या सर्व गोष्टींचा  विचार केला जातो.  अक्षरांना सुंदर चित्रांची साथ लाभते आणि वाचन हा एक आनंदानुभव बनतो.

ऑलिवर जेफर्स (Oliver Jeffers) या लेखकाचं " दि हार्ट अँड दि बॉटल " हे पुस्तक काही दिवसांपूर्वी वाचनात आलं.

लहान मुलांना 'मृत्यू' या संकल्पनेपासून आपण दूरच ठेवतो. त्यांच्या कोवळ्या मनावर आघात होईल असे आपल्याला वाटते. रोज आपल्याशी खेळणारे आजोबा आज शांत का झोपलेत या प्रश्नावर 'आजोबा देवाघरी गेले' असे सांगून आपण वेळ मारून नेतो. आपली जवळची व्यक्ती गमावण्याची भावना त्यांना कळू नये असं आपल्याला वाटतं. वाढत्या वयाबरोबर आपोआप त्यांना हे कळत जाईल असा विचार  त्यामागे असतो (काही वर्षांपूर्वी आणि आजही लैंगिक शिक्षणाबाबतही असाच दृष्टीकोन समाजात आहे.)
ज्यांना लहान वयातच आपल्या जवळच्या व्यक्ती गमवाव्या लागतात ते हे दु:ख कसे पचवतात? या दु:खाच्या आघातातून सावरतात का स्वतःला? या विषयावर हे पुस्तक आहे.



प्रत्येक गोष्टीबद्दल जिज्ञासू असलेल्या एका लहान मुलीची ही गोष्ट.Once there was a girl, much like any other.  बाबांची लाडकी लेक असलेल्या या मुलीचं भावविश्व फार अनोखं आहे.बाबा आपल्या खुर्चीवर बसून तिला पुस्तकांतल्या गोष्टी सांगायचे.  तिला आकाशातल्या चांदण्यांत रस आहे, समुद्राच्या तळाशी काय आहे हे तिला जाणून घ्यायचय. तिला नवीन गोष्टी शोधायला आवडतात.

आणि एके दिवशी बाबांची खुर्ची रिकामी होते. बाबांच्या मृत्यूचा आघात पचवताना ती अंतर्यामी कठोर होत जाते आणि ठरवते कि यापुढे असले कुठलेच दु:ख नको. ती आपले हृदय एका बाटलीत काढून ठेवते (या रूपकाचा अर्थ असा कि ती संवेदनशून्य बनत जाते.) आता तिला कुठल्याच गोष्टीची उत्सुकता वाटेनाशी होते.


रोजच्या जगण्यात सुरवातीला काहीच फरक पडत नाही, पण मनाच्या तळाशी दडवलेलं दु:ख बाहेर यायला धडपडत असते. व्यक्त होणंच विसरलेल्या मुलीला आपले बाटलीबंद हृदय कसे काढावे कळत नाही. ती हरतऱ्हेचे प्रयत्न करते पण बाटलीतून हृदय निघेच ना.
आणि एकेदिवशी तिला तिच्याच सारखी जिज्ञासू छोटी मुलगी भेटते आणि तिचे हृदय बाटलीतून बाहेर काढून देते. आता हृदय परत मिळाल्यावर तिला परत जगाविषयी प्रेम वाटू लागते. बाबांची खुर्ची मग कधीच रिकामी राहत नाही.

जवळच्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने आयुष्याबाबत आपण उदासीन होतो, प्रसंगी काहीजणांच्या मनात आत्महत्येचे विचारही येतात. चलती का नाम जिंदगी म्हणत, मृत्यू ह्या सार्वकालिक सत्याला स्वीकारून पुढे चालत राहणं एवढंच आपल्या हातात आहे.
लहान वयातच मुलांना 'मृत्यू' या विषयाची ओळख करून देणं काहींना पटणार नाही. पण निसर्गाचा उत्पत्ती, स्थिती आणि लयाचा नियम त्यांना जितक्या लवकर समजवाल तितक्या लवकर त्यांची भावनिक तयारी होईल.
***

रविवार, २७ मार्च, २०१६

जादुई कुंचला

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी चीनमधे लियांग नावाचा होतकरू मुलगा राहत होता. त्याला घरदार- कुटुंब नव्हतं. लोकांची गुरे सांभाळणे, लाकूडफाटा आणणे अशी कामे करून तो दिवस काढी. त्याचं आयुष्य खडतर असले तरी त्याचा स्वभाव लोकांना मदत करण्याचा होता. त्याचं एक स्वप्न होतं. त्याला फार मोठा चित्रकार व्हायचं होतं. तो चित्रकलेच्या सरावात कधीही खंड पडू द्यायचा नाही. रानात लाकडे तोडताना, गुरे चरायला नेताना तो माळरानात पक्षी आणि प्राण्यांची चित्रे  काढी. तो जे काही पहायचा त्याचं चित्र काढायचा - झाडे -पक्षी-माणसे. त्याला चित्रांशिवाय काही सुचायचंच नाही. लवकरच तो चित्रकलेत तरबेज झाला.

एके रात्री लियांगला स्वप्न पडलं. त्यात एका म्हाताऱ्याने त्याला एक कुंचला दिला. त्या म्हाताऱ्याने म्हटलं कि हा जादुई कुंचला आहे आणि  लियांगने त्याचा लोकांना मदत करण्यासाठी  उपयोग करावा. लियांगला दुसऱ्या दिवशी पहाटे जाग आली तेव्हा आपल्या हातात तो सुंदर कुंचला पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. लियांगला प्रचंड भूक लागली होती म्हणून त्याने ताटभर भाताचे चित्र काढले. अहो आश्चर्यम ! अचानक चित्र जिवंत झाले आणि भाताने भरलेले ताट समोर आले. तो खूप आनंदी झाला. त्याने पक्ष्याचे चित्र काढले. त्या चित्रातून पक्षी बाहेर आला आणि त्याने आकाशात भरारी घेतलीसुद्धा.


लियांग जेव्हा गावात गेला, तेव्हा त्याने पाहिलं कि एक म्हातारा शेतकरी कावड भरून पाणी नेत होता आपल्या शेतात शेंदण्यासाठी. त्या वृद्ध शेतकऱ्यासाठी हे फार कष्टाचे काम होते. लियांगने त्याच्या शेताशेजारी नदीचे चित्र काढले आणि नदी जिवंत झाली. आता तो शेतकरी कितीही पाणी पिकांना देऊ शकत होता. 
थोडं पुढे गेल्यावर लियांगला आणखी एक गावकरी भेटला. तो बिचारा रडत होता. त्याची गाय रात्री वारली होती आता त्याच्या लहान मुलांसाठी दूध कुठून मिळणार? लियांगने गायीचे चित्र काढले आणि क्षणार्धात चित्रातून गाय जिवंत झाली. गावकऱ्याने लियांगचे आभार मानले आणि तो गायीचे दूध काढू लागला. 

त्या दिवसापासून लियांग आपल्या जादुई कुंचल्याचा उपयोग गावातील लोकांच्या मदतीसाठी करी. जेव्हा गावकऱ्यांना कशाची नड भासे, तेव्हा लियांग मदतीला येई. लवकरच गावात भरभराट आली आणि लियांगच्या जादुई कुंचल्याची कीर्ती सर्वदूर पोचली.

लोकं त्याला विचारीत, "तू या जादुई कुंचल्याचा उपयोग करून श्रीमंत का नाही होत?"
"मला कशाची गरज आहे ?"  लियांग उत्तरे,"मला लोकांची मदत करून श्रीमंत असल्यासारखं वाटतं."

थोड्याच दिवसांत लियांगच्या जादुई कुंचल्याची वार्ता शेजारील गावच्या सावकाराच्या कानी पोचली. त्याने विचार केला, या कुंचल्याचा उपयोग करून तो सम्राटापेक्षाही श्रीमंत बनेन. त्याने  लियांगचा कुंचला चोरण्याचा डाव रचला. त्याने त्याच्या गुंडांना लियांगच्या घरी पाठवलं. गुंडांनी लियांगला जेरबंद केलं आणि कुंचला आणून सावकाराला दिला.

सावकाराला आपल्या शक्तीसामर्थ्याचे प्रदर्शन करायचे होते म्हणून त्याने आपल्या काही मित्रांना घरी दावतला बोलावले. त्याने त्या कुंचल्याने खूप चित्रे काढली पण एक चित्र जिवंत होत असेल तर शपथ.
त्याला कळून चुकलं कि यात काहीतरी रहस्य आहे. त्याने गुंडांना फर्मावलं कि लियांगला त्याच्यासमोर हजर करा. लियांग समोर येताच सावकार म्हणाला, " जर तू माझ्यासाठी काही चित्रे काढशील तरच इथून जिवंत घरी जाऊ शकशील !"

लियांगला सावकाराचा इरादा कळला. तो म्हणाला,"मी नक्की तुमची मदत करेन, पण मला मुक्त करा."

"माझ्यासाठी सोन्याचा पर्वत काढ" सावकार म्हणाला. "मी तिथे जाऊन खूप सोने गोळा करेन." त्याला म्हणायचं होतं,"मी या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनेल. सम्राटापेक्षाही"

लियांगने समुद्राचं चित्र काढलं.

"तू समुद्र कशाला काढलास" सावकार म्हणाला. "मी म्हणालो ना कि पर्वताचं चित्र काढ. मला सोनं हवंय, मासे नकोयत."

"पर्वत समुद्राच्या पल्याड आहे. हा पहा." आणि लियांगने समुद्राच्या पल्याड पर्वत काढला.

जेव्हा सावकाराने सोन्याने चमकणाऱ्या पर्वताला पाहिलं, तेव्हा त्याच्या डोळ्यांत आसुरी चमक आली. "पण हा पर्वत तर फार दूर आहे, मी तिथे कसा जाऊ?"

"मी तुमच्यासाठी जहाजाचं चित्र काढतो, जे तुम्हाला तिथवर घेऊन जाईल. " लियांग म्हणाला. आणि त्याने सम्राटाच्याही आरमाराला लाजवेल  असे सुंदर रत्नजडीत जहाज जिवंत केले. सावकार जहाजात चढला आणि म्हणाला, "आता त्या पर्वतापर्यंत नेणाऱ्या वाऱ्याची निर्मिती कर." लियांगने वाऱ्याचे चित्र काढले. जहाज पर्वताच्या दिशेने चालू लागले. त्या सोनेरी पर्वताला आपल्या कवेत घेण्यास सावकार उतावीळ झाला होता. त्याने लियांगला फर्मावले, "जरा जोराचा वारा येऊ दे म्हणजे मी त्या पर्वतावर लवकर पोचेन."

लियांग वाऱ्याचे चित्र काढत राहिला. मंद वाऱ्याचे रुपांतर सोसाट्याच्या वाऱ्यात झाले आणि मोठे वादळ आले. त्या वादळात रत्नजडीत जहाज आणि लोभी सावकार बुडून समुद्रतळाशी गेले.

असं म्हणतात कि लियांगने त्याच्या गावातील  एका सुंदर मुलीशी लग्न केलं आणि त्याच्या कुटुंबासह त्याने उर्वरीत आयुष्य छान घालवलं.
***


( इथे  उपलब्ध असलेल्या या चिनी लोककथेचा हा अनुवाद आहे. माझ्या भाचरांना हि गोष्ट सांगताना मजा आली आणि  वाटलं कि ब्लॉगवर ही गोष्ट पोस्ट करावी म्हणून.)

बुधवार, २३ मार्च, २०१६

मिक्सरेडिओचा अंत


काल संध्याकाळी ई-मेल आला- 'MixRadio is Closing Today'.


मिक्सरेडिओ ही on-line music streaming service. नोकिया कंपनीने आधी ovi music म्हणून ही सेवा सुरु केली. त्यानंतर तिचे नामांतर 'Nokia Music' असे झाले. नोकिया नंतर या सेवेची मालकी 'Line' ने घेतली आणि तिचे rebranding 'MixRadio' असे केले. गेली १७ वर्षे ही सेवा सुरु होती.
  Windows OS च्या आधीच्या सर्व मोबाईल्स मधे pre -installed असणारे हे app. तुमचे इंटरनेट चालू असेल तर मनमुराद गाणी ऐकण्याची हौस पूर्ण करता येई. दोन वर्षांपूर्वी मी माझा पहिला स्मार्टफोन घेतला. त्यानंतर गेली दोन वर्षे मी हे app वापरत होतो. 
टिकाऊ आणि स्वस्त मोबाईल म्हणजे नोकिया हे समीकरण असताना घेतलेला फोन आताही व्यवस्थित चालतोय.अनेक वेळा त्याने आपली टिकाऊपणाची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
मिक्सरेडिओ ची खासियत म्हणजे त्यांचा संग्रह. लाखो गाणी तुमच्या दिमतीला. गजलचा संग्रह तर अप्रतिम होता. फरिदा खानुम आणि इक़्बाल बानोची गझल मी पहिल्यांदा ऐकली ती इथे. बेगम अख्तर ने वेड लावले ते इथे.
सकाळी ऑफिसला निघताना कानात हेडफोन लावून घराबाहेर पडायचे. Favourites मधून एक गायक निवडायचा. मग त्या Genre मधील गाणी ऐकत प्रवास करायचा. ऑफिसमधे आवाज कमी करून classical ऐकायचं. संध्याकाळी home theatre ला मोबाईल जोडून कुठलातरी राग ऐकत बसायचं. कितीही गाणी ऐका. महिन्याची फी नाममात्र.
App चा Interface अत्यंत सहज सुंदर. गायकाची माहिती, त्याचे recent twitter updates, फोटो उपलब्ध असे. मी अनेक कोंकणी, बंगाली, गुजराती गाणी blindly download केली होती. आता जेव्हा बंगाली शिकतोय तेव्हा फार मजा येतेय.
इंटरनेटच्या महाजालात कुठली site, माहिती केव्हा गडप होईल सांगता येत नाही. हे सारं माहितीचं आभासी विश्व. आता या app ची जागा घेण्यासाठी नवीन apps सरसावले आहेत. जुन्या users न आकर्षक योजना देताहेत. On-line music industry  फार मोठी आहे. इथे टिकायचं असेल तर नवीन business models विचारात घेतले पाहिजेत.



मिक्सरेडिओचा अंत मनाला चटका लावून गेला. ज्यांनी हे app वापरलंय त्यांना कळेल कि मला नेमकं काय म्हणायचं आहे. 

शनिवार, १९ मार्च, २०१६

एका चित्राच्या निमित्ताने

एका लहान मुलगा कसलंतरी चित्र काढत बसला होता. त्याला घरातील एका मोठया माणसाने जरा जरबेतच विचारलं, "काय काढतोयस रे ?". मुलगा म्हणाला, "देवबाप्पाचं चित्र काढतोय". त्यावर त्या मोठ्या माणसाने जरा मिश्किल अंदाजात म्हटलं, "अरे पण देव दिसतो कसा हे कुणालाच माहित नाही, मग कसं काढणार तू चित्र ?". मुलगा फार गोड होता. त्याने मग उलटटपाली फार छान उत्तर दिलं. "माझं चित्र पाहून लोकांना कळेल - देवबाप्पा दिसतो कसा ते."

लहान मुलांमध्ये सर्जनशीलता अशी ठासून भरलेली असते. प्रश्नांना वेगळ्या पद्धतीने सामोरे जाण्याची, वेगवेगळी उत्तरं शोधण्याची, नवनिर्मितीची आस त्यांना असते. कधी ती एकटेच स्वताशी बडबडत बसतील. स्वतःच्या मनोराज्यात हुंदडत बसतील. हल्लीच वय वर्ष नऊच्या अद्वैत या मित्राला भेटलो. त्याच्याशी गप्पा झाल्या, त्याने काढलेल्या या चित्राविषयी.  अद्वैत चौथ्या इयत्तेत आहे.


या चित्रात त्याने काय काढलंय ते पूर्णपणे abstract असल्याने व चित्रकलेतले  मला काहीच कळत नसल्यामुळे खुद्द  चित्रकारांना याबद्दल विचारण्यात आले. पहिलं चित्र हे Gun Tank (रणगाडा) आहे. पण त्यात फार वैशिष्ट्ये आहेत. एक तर हा रणगाडा detachable पार्टसचा आहे. याचे सगळे भाग केव्हाही सुटे होऊ शकतात. रणगाड्याला खाली चाके आहेत तेव्हा जमिनीवरील युद्ध त्याने लढता येते. हवाई हमल्यासाठी वरचा भाग आपोआप विलग होऊन जेट बनू शकतो. आणखी मजेशीर बाब म्हणजे  आपत्कालीन परिस्थितीत जेटचा भाग सुटा होऊन आतील व्यक्ती 'धूम' स्टाईल बाईकवरून सुसाट पळूही शकते.

या रणगाड्याच्या खाली दोन Weapon Tanks आहेत. पहिला Tank अल्त्रोन नामक रोबोचा आहे. त्याचं नाव त्याने Tank वर कोरलंय. तो आपल्यासारखे आणखी रोबो बनवू शकतो. तो बॉस आहे. दुसऱ्या Tank मध्ये शस्त्रे आहेत खूप सारी. आणि त्यात एक रखवालदार पण आहे. ही चित्रे पाहून मी ज्याम इम्प्रेस झालो आहे.
मुळात मला चित्रांमध्ये निसर्गचित्र तेवढं काढता येतं. त्यातही दोन डोंगर, त्यातून उगवणारा किंवा मावळतीचा सूर्य,  चार आकडा दर्शवणारी आकाशातील पक्षी, घर, नदी , नदीतील त्रिकोणी मासे आणि घरापुढील सरळ रेषेतील गवत एवढं काढता येतं.  अद्वैतची चित्रकला तुम्ही म्हणाल realistic नसेल. रणगाडा, रोबो जसेच्या तसे वाटत नसतीलही. पण त्याच्याशी बोलताना एक जिवंत चित्र त्याच्या डोक्यातून कागदावर उतरतं आहे हे जाणवत होतं. तो कल्पना जगत होता. डोक्यात चाललेल्या हजारो गोष्टींपैकी एक गोष्ट अल्त्रोनची असेल. त्या अल्त्रोनचं पुढे युद्धही झालं असेल कुणाबरोबर. त्याच्या मनोविश्वात त्याने रोबोंना जगावर ताबा मिळवताना पाहिलंही असेल. एक दिवस हे सर्व तो कागदावर उतरवेल हे नक्की.

मुलांच्या कल्पनांना फुलू दिलं, "आता हा अल्त्रोन कुठे चालला आहे, पुढे काय होईल तेही काढ चित्रात." असं प्रोत्साहन दिलं तर पुढे मागे तो चांगला कलाकार होईल, त्याला आपल्या कल्पना तुमच्याशी शेअर कराव्या वाटतील किंवा "असले नसते धंदे करण्यापेक्षा अभ्यास करा गणिताचा" म्हणत दटावलं तर हा रोबो, त्याबरोबरचं काल्पनिक जग आपोआप गुडूप होऊन जाईल हळूहळू.

जगाला हुशार व्यक्तींबरोबरच वेगळा विचार करणाऱ्यांची, सृजनशील लोकांची  फार गरज असते. स्टीव जॉब्स ने आयफोन आणला बाजारात तेव्हा इतरही कंपन्या होत्याच ना स्पर्धेत. आज Apple आपलं स्थान टिकवून आहे ते सततच्या सृजनामुळे. मानवी प्रगती नवनिर्मितीचा आणि सृजनाचा ध्यास या दोन गोष्टींवर अवलंबून आहे. 

शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

झेनकथा

"A Japanese warrior was captured by his enemies and thrown into prison.That night he was unable to sleep because he feared that the next day he would be interrogated, tortured, and executed. Then the words of his Zen master came to him, "Tomorrow is not real. It is an illusion. The only reality is now." Heeding these words, the warrior became peaceful and fell asleep."
झेनकथा या प्रकारात वरकरणी बोध असा नसतो. त्या कथेचा अर्थ शोधत राहायचं.  कथेत विसंगती असते. मनाला खूप विचार करायला लावायचा.शेवटी विचार करून करून मन थकून जातं. मग विचार येत नाहीत डोक्यात. तो क्षण झेनचा. स्तब्धतेचा. वरची झेनकथा त्यातलीच. उद्या हा भास आहे. खरं वास्तव म्हणजे आताचा क्षण. उद्याची चिंता कशाला? पण हा उद्या येणारच आहे, सैनिकाला त्रासाला तोंड हे द्यावंच लागेल कि हा होणारा त्रास, वेदना हापण केवळ भास आहे? कि सगळं अस्तित्वच एक भास आहे?
झेन शिकणारे शिष्य ध्यानधारणा करत असताना त्यांचे गुरु छोट्याशा दंडुक्याने त्यांच्या डोक्यात टपली मारावे तसे मारतात. लक्ष ध्यानावरून जरा भरकटलं, खा टपली. त्या गुरूंना बरोबर कळत असलं पाहिजे शिष्यांच्या मनात काय चाललंय ते.
या झेनकथांचं पुस्तक हाती लागलंय. पन्नास पानी पुस्तकांत या कथा आहेत. या कथांच्या सोबत त्या कथांवरून लोकांनी काय निष्कर्ष काढले ते पण दिलंय. पण ते फालतूय. लोकांनी काहीही निष्कर्ष काढलेत.
बहुधा जास्त विचार केलेल्या त्या माणसांना तो झेनचा क्षण लगेच अनुभवता आला असणार.
सध्या यातील एकेक कथा रोज मनात घोळवतोय. प्रवासात, लंच करताना इतरांना पण पकवतोय.
मजा येतेय आणि ज्या कुणी अज्ञात लेखकाने त्या लिहिल्या असतील त्या बद्दल कौतुक आहे. हे लोकसाहित्य प्रकारात मोडत असल्याने इतक्या वर्षांत कथांची versions बदलली आहेत. काही कथांचे शेवट वेगळे आहेत, काहीतील संवाद वेगळे आहेत. संपादक महाशयांनी त्या कथांची जितकी versions (प्रारूपे) आहेत तितकी दिलीयेत.
 मला आवडलेली आणखी एक कथा :
"A monk set off on a long pilgrimage to find the Buddha. He devoted many years to his search until he finally reached the land where the Buddha was said to live. While crossing the river to this country, the monk looked around as the boatman rowed. He noticed something floating towards them. As it got closer, he realized that it was the corpse of a person. When it drifted so close that he could almost touch it, he suddenly recognized the dead body - it was his own! He lost all control and wailed at the sight of himself, still and lifeless, drifting along the river's currents. That moment was the beginning of his liberation". 
एकदम आहट स्टाईलची ही कथा आहे. स्वताचे निश्चल प्रेत पाहिल्यावर किंवा त्याचा भास झाल्यावर त्या साधूला मुक्तीची अनुभूती येते. आपल्या इच्छा, वासना देहाशी बांधील असतात. भौतिकतेकडे आपला ओढा असतो. देहाच्या पलीकडे जाता आले पाहिजे. नचिकेत्याने यमराजांना तिसरा वर मागताना विचारलं होतं कि, देह नष्ट झाला कि आत्मा नष्ट होतो कि आत्मा चिरंतन आहे?
A renowned Zen master said that his greatest teaching was this: Buddha is your own mind. So impressed by how profound this idea was, one monk decided to leave the monastery and retreat to the wilderness to meditate on this insight. There he spent 20 years as a hermit probing the great teaching.
One day he met another monk who was travelling through the forest. Quickly the hermit monk learned that the traveller also had studied under the same Zen master. "Please, tell me what you know of the master's greatest teaching." The traveller's eyes lit up, "Ah, the master has been very clear about this. He says that his greatest teaching is this: Buddha is NOT your own mind."
या कथेत  काय सुचवायचय? ज्ञान कसं obsolete होतं ? कि जे मिळालंय ते अंतिम ज्ञान नव्हतं? कि गुरुने सांगितलेलं सुद्धा स्वतच्या कसोटीवर तपासलं पाहिजे अंधानुकरण न करता?
"Once there was a well known philosopher and scholar who devoted himself to the study of Zen for many years. On the day that he finally attained enlightenment, he took all of his books out into the yard, and burned them all."
ही मला न पटलेली कथा आहे. पुस्तके म्हणजे  ज्ञानाची साधने. जे साध्य करायचं आहे ते मिळवल्यावर पुस्तके जाळून टाकायची?  पुस्तकांच्या निर्जीव पानांत खरंच माणूस बदलवण्याची क्षमता असते? त्या संशोधकाला खरंच ज्ञानप्राप्ती झाली होती का?
डोक्याचं भजं होतं ते असं !
***

सोमवार, २१ सप्टेंबर, २०१५

एक अकेला ईस शहर में

त्याने दरवाजा उघडला. बूट काढून भिरकावले.  जरावेळ पलंगावर बसला. पंखा टॉप स्पीडला.  घड्याळात पाहिलं तेव्हा रात्रीचे  पावणे एक झाले होते म्हणजे साडे बारा वाजलेत. घड्याळ पंधरा मिनिटे पुढे ठेवलंय. बाकी घड्याळ कितीही मिनिटे पुढे ठेवा उशीर होणारच, खिशातला मोबाईल काढला आणि चार्जीगला लावला. उद्या शनिवार.  battery डेड झालेला फोन चालू झाल्यावर त्याने facebook आणि whatsapp uninstall केले. आता पुढचे दोन दिवस कुणाचेच updates नकोत.फुकटच्या गप्पा नकोत. पुढचे दोन दिवस  निवांत.
बेसिनचा नळ चालू करून त्याने चेहऱ्यावर सपासप पाणी मारले. ट्रेनमधे काय झोप लागली होती ! कशाला मरायला आपण इतक्या लांब राहायला आलोत. इतक्यात कुकरच्या शिट्टीचा आवाज आला. च्यायला !!यावेळेलापण माणसे जेवणाच्या तयारीत. बरंय. इतकं दमून घरी आल्यावर कुकर लावायचा stamina नक्की एका बाईतच असणार. अलार्म बंद करून त्याने पलंगावर स्वतःला फेकून दिले,
शनिवारचा दिनक्रम :
शनिवारची सकाळ अकरा वाजता उजाडली. आरामात ब्रश करत तो उघडाबंब घरभर फिरला. अंघोळीसाठी कडक पाणी तापवलं. विवस्त्र होऊन अर्धा तास अंघोळ केली. बादलीतलं पाणी संपलं तरी दिगंबर अवस्थेत तो बराच वेळ बसला. चहाचं आधण तापत ठेवलं. चहा कढस्तोवर पेपरातल्या बातम्या चाळल्या. संपादकीय पानावर कुठल्या विषयावर अकलेचे प्रदर्शन केलंय ते पाहिलं. कॉलेजला असताना डिबेटिंग सोसायटीच्या सभांत तो तावातावाने अमुक एका संपादकाने आजच्या संपादकीयात हे मांडलंय असं ठासून सांगायचा. लोकं काय आयतं ऐकायला मिळतंय म्हटल्यावर ऐकायची. जोरदार भाषण करायचा. आता अग्रलेख वाचायला घेतला कि झोप येते. चहा घेतला. दोन बिस्किटे चघळली.
बाल्कनीतल्या झाडांना पाणी घातलं. पिकलेली पाने खुडून टाकली. पेपराची जमलेली रद्दी नीट बांधून ठेवली.
कशाला हवेत घरात  दोन दोन पेपर. एक मराठी आणि त्याचा आंग्ल बंधू. रद्दीचा भाव चांगला येतो म्हणून ठीक आहे एकवेळ.
आठवडाभराचे कपडे मशीनला टाकले. पाच शर्ट, तीन पँट, तीन जोडी पायमोजे, तीन रुमाल. कपडे बाल्कनीत वाळत घातले. एका टोपात मुगाची खिचडी शिजायला टाकली.  फ्रीज आवरलं. खराब झालेल्या सॉसच्या बाटल्या कचऱ्यात टाकल्या. केव्हा आणल्या होत्या, देवास ठावूक. पुढच्या वेळेपासून त्यावर स्टीकर लावला पाहिजे. खिचडी झाल्यावर बकाबका जेवला. बटाटा साल न काढता खिचडीत टाकल्यावर वेगळीच चव येते. ओर्गनिक का काहीसी.
जेवल्यावर सुस्ती आली तेव्हा candy crush च्या दोन levels पार केल्या. मग लादीवर पहुडला. संध्याकाळी पाचला जाग आली. सकाळचाच उरलेला चहा गरम करून पिला. मग त्याने बाजारात जाऊन काही जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली उदा. कांदे, बटाटे, लसूण, ब्रेड, दूध  इत्यादी.
संध्याकाळी सातला देवासमोर दिवा लावला. आठवडयातून याच दिवशी देवाची सेवा घडते. भात शिजायला टाकला. दूध गरम केलं. दूधभात खाल्ला. दूधाला त्याची स्वतंत्र चव आहे. भाताला आहे. लोक साखर टाकून चव बिघडवतात. सकाळची आणि आत्ता जेवलेली भांडी एकदम घासली. साडे आठ वाजलेत आतासे. या वेळेला आपण काय करत असलो असतो? chatting, टीम मीटिंगचे भयाण minutes लिहून सगळ्यांना मेल पाठवत, किंवा कुठल्यातरी न दिसणाऱ्या client साठी माथेफोड करत.  
त्याने मोबाईलच्या playlist मधे जाऊन बेगम अख्तरची गाणी लावली. शनिवारची संध्याकाळ व्याकूळ आणि उदास व्हायला एकदम चांगली. या बाईच्या आवाजात असा काय जादू आहे कि आपण एकदम हळवे होऊन जातो. ये मुहब्बत तेरे अंजाम पे रोना आया. . असं का वाटत राहावं कि आपले शंभर ब्रेकअप झालेत आणि आपण तनहाईत आहोत. इन्सान बगैर रोये तो नही उठना चाहिये ।
केव्हा झोप लागली कळलं नाही. मधे रात्री जाग आली तेव्हा Yanni ची गाणी चालू होती म्हणजे गाण्यांनी पण B to Y चा प्रवास केला होता. मोबाईल मध्ये पाचाचा अलार्म लावला.
रविवारचा दिनक्रम : 
रविवारी पहाटे पाचला Wake me up ने झोप उतरवली. त्याने भराभरा दात घासले आणि पँट चढवली. रविवारचा सूर्योदय पहायची त्याची जुनी सवय. ट्रेनही रिकाम्या असतात. मरीन लाईन्सच्या त्या कठड्यावर बसून हळू हळू उगवतीस येणारा सूर्य पाहणे त्याला खूप आवडतं. आठवड्याच्या इतर दिवशी कळतही नाही सुर्य केव्हा अगवतो ते. नुसतं निवांत बसून राहायचं. कशाचाच फार विचार करायचा नाही. या महानगरातलं आपलं वास्तव्य किती दिवस असेल कुणास ठावूक. आपण पहिल्यांदा इथे आलो तेव्हा या समुद्रानेच मन मोकळं करायला जागा दिली. शेंगदाणे खात उद्याची काळजी करत इथेच किती रात्री घालवल्या. एकदाचे आपण इथले चाकरमानी झालो. ट्रेनच्या वेळापत्रकाशी जुळवून घेतलं. इथे सगळ्यांना जागा आहे. इथल्या ह्या उंच इमारती आणि त्यातले धनाढ्य लोक. प्रत्येकाच्या स्वप्नांना इथे वाव आहे.
नऊ वाजले तेव्हा त्याची तंद्री भंगली. स्टेशनवर पाणी कम चहा घेतला, घरी पेपर येणार आहे हे ठावूक असूनसुद्धा पेपरवाल्या समोर उभा राहून जमेल तितक्या हेडलाईन्स वाचल्या. इडलीवाल्या अण्णाकडे रस्त्यावर उभे राहून दोन प्लेट इडल्या खाल्ल्या. समाधानाची ढेकर दिली.
इडल्या खाल्ल्यावर आईची आठवण आली, तिला फोन करून इथे आपले कसे सुरळीत चालले आहे याची खात्री करून दिली.
घरी पोचल्यावर लादी पुसून घेतली. घरात बाईमाणूस नसताना केसांचे पुंजके कुठून येतात बरं. काही भुताटकी तर नसेल ना? गावी लोक सर्रास असे करायचे. कुणाची नखे चोरून ने तर कुणाची केसं. इथे सगळे सुसंस्कृत वाटतात. शेजारचा माणूस मेला तरी चौकशीस जाणार नाहीत. privacy महत्वाची.
भूक तर नाहीये इतकी. रेडीमेड सूप प्यावं. दोन मिनिटांत रेडी.
दुपारी घरातला पसारा आवरला. पुस्तकं नीट रचून ठेवली. कपड्यांच्या घड्या घातल्या. एका महान लेखकाची एपिक समजली जाणारी कादंबरी वाचायचा आटोकाट प्रयत्न केला. डोळ्यावर झोप आली तेव्हा झोपला.
संध्याकाळी मित्राने भेट दिलेली जास्मिन टी बनवली. त्याने चीनवरून आणली होती. चहाला मस्त वास येतो जास्मिनच्या फुलांचा. त्यानिमित्ताने सर्व मित्रांची आठवण काढून झाली. शिव्या देऊन झाल्या. काय करताहेत *** देव जाणे !!
 डिनरसाठी कर्ड राईस. साउथ इंडिअन बॉस कडून शिकलेली रेसिपी. खाणार तेवढा भात शिजवून घ्यायचा पहिल्यांदा. त्यात सढळ हाताने दही ओतायचं. जिरे,मोहरी, कढीपत्ता, मिरचीची कढत फोडणी द्यायची वरून. जमल्यास तुळशीची पाने टाकायची. झाला कर्ड राईस तयार.  दही गोड असेल तर भारीच.
जेवल्यावर भांडी घासताना U2 ची गाणी सोबतीला. त्याचं I still haven't found what I'm looking for फेवरेट.
आपल्याला तरी कुठे कळलंय काय शोधतो आहोत ते.
बिछाना टाकायचा. दोन दोन अलार्म लावायचे सोमवार साठी. झोपताना George Harrison चं All things must pass away ऐकायचं. येणाऱ्या आणखी एका दिवसासाठी  तयार व्हायचं.
All things must pass
None of life's strings can last
So, I must be on my way
And face another day.
All things must pass away

***

सोमवार, ७ सप्टेंबर, २०१५

गर्दी

गर्दी लोकल ट्रेनमधली, गर्दी सरकारी कचेऱ्यातली, गर्दी शाळा, महाविद्यालये, युनिवर्सिट्यातली,
गर्दी बाजारातली, गर्दी बगिच्यातली,
गर्दी थेटरांतली,  गर्दी माणसांची.
या गर्दीत एक तोच तो पणा आहे, ठोकळेबाजपणा.
नेत्यांची भाषणे ऐकून भारावून जाऊन टाळ्या पिटणारी  गर्दी !
हिरोने विलनला ठोकल्यावर 'हाण तिच्या s आयला' म्हणत खुश होणारी गर्दी !
संध्याकाळी घरी परतत असताना, रस्त्यांवरील दुकानांसमोर उभे राहून म्याच पाहणारी गर्दी !
ट्रेन, बसच्या विंडोसीट साठी धडपडनारी गर्दी !
राशनच्या लायनीत, सुलभच्या लायनीत नंबर येण्याची वाट बघत तिष्टत असलेली गर्दी !
परीक्षा सुरु असताना डोक्यात विचारांची गर्दी !
गर्दी हा हाडामासांच्या माणसांचा समुच्चय.
यातील प्रत्येक जीव वेगळा, वेगळ्या चिंतांनी ग्रासलेला.
कुणाला मुलीच्या लग्नाची चिंता
कुणाला संध्याकाळी काय रांधावं याची .
कुणी उद्याचे सूर आळवीत,
तर कुणी जुन्या जखमांची खपली काढीत
कुणाला सिरियलमधल्या नामिताचं पुढं काय होणार याविषयी उत्सुकता
तर "कांद्याचे भाव असेच वाढत राहिले तर. . काय?"
हा सामान्य व्यक्तीचा जागतिक महत्त्वाचा प्रश्न.
गर्दीचं सुंदर साजीरं रूप.